
शिल्पा अष्टमकर
निर्धार करणं म्हणजे निश्चय करणं, मनाशी पक्क ठरवणं, दृढ निश्चय केला की “ सुंभ जळो की पारंबी तुटो” निर्धारापासून आपलं मन मग ढळत नाही, विचलित होत नाही. कविवर्य मोरोपंतांनी देवाची आळवणी करताना म्हटलं आहे, ‘हे देवा, न निश्चय कधी ढळो”.

डी. प्रभाकर शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव आणि मनसेचे अध्यक्ष राज हे ठाकरे बंधू एकत्र येणार याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. ...
जीवनात यशस्वी व्हायचा कानमंत्र म्हणजे निर्धार पक्का हवा. कुठल्याही प्रसंगी मग आपण खंबीरपणे उभे राहू शकतो, संकटाशी टक्कर देऊ शकतो, शर्थीचे प्रयत्न करून यश खेचून आणू शकतो. निर्धाराचे सामर्थ्य आपल्या पाठीशी असले म्हणजे मग आपल्याला कसलेच भय नसते. मन कमकुवत असेल तर मध्येच हात-पाय गाळले जातात, मध्येच प्रयत्न सोडून दिले जातात. या उलट मनानं निर्धार केला की, आपण संकटाची तमा बाळगत नाही, संकटांनी खचून जात नाही, माघार घेत नाही, हताश होत नाही. खंबीर मनाने ताठ मानेने उभे राहून प्रयत्नांची शिकस्त करून अंती यशापर्यंत पोहोचतो.
मात्र निर्धार दुसऱ्यांनं नाही, आपला आपण निर्णय घ्यायचा, मार्ग आपण शोधायला हवा, ध्येय आपण ठरवायला हवं आणि ध्येयसिद्धीपर्यंत न कंटाळता, न खचता, प्रयत्न करत पुढची वाटचाल करीन असा निर्धार आपण करायला हवा.
छोट्या ध्रुवाने मनाशी निर्धार करून त्याच्या पूर्तीसाठी घरदार सोडलं, त्याच्या त्याच निर्धाराने कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही असं अढळ स्थान ध्रुव बाळाला मिळालं. वीर बाजीप्रभूंने शर्थीने खिंड लढवली कारण त्याचा निर्धार ठाम होता. इंग्रजांना “चले जाव’’ म्हणून ठणकावून सांगण्यामागचा देशभक्तांचा, क्रांतिकारकांचा निर्धार ठाम होता. ‘‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच, मिळवीन” असं जुलमी इंग्रजी सत्तेला सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांचा निर्धार असामान्य होता. ‘‘मेरी झांसी नही दूंगी” हा झाशीच्या राणीचा निर्धार म्हणजे जणू काळ्या दगडावरची रेघ.
निर्धार म्हणजे मनात एखाद्या गोष्टीबद्दल घेतलेला ठाम निर्णय - तोही कोणत्याही अडचणींवर मात करत यशस्वी होण्यासाठी. निर्धार हा यशाचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा असतो. मनात एकदा ठरवलं की “हे मला करून दाखवायचंच!”, तर अर्ध यश तिथेच मिळालं असं समजावं.
निर्धाराचे महत्त्व :
१. ध्येय निश्चित करतो : ज्याचं जीवन ध्येयविना असतं, त्याचं जीवन दिशा हरवलेल्या जहाजासारखं असतं. निर्धार आपल्याला योग्य दिशेने वाटचाल करायला शिकवतो.
२. अडचणींवर मात करतो: निर्धार असल्यास संकटं छोटी वाटतात. उदाहरणार्थ, अपंग असूनही खेळात सुवर्णपदक जिंकणारे खेळाडू हे निर्धाराचं उत्तम उदाहरण आहेत.
३. स्वतःवर विश्वास निर्माण होतो :
एकदा निर्धार केला की, आपोआप आत्मविश्वास निर्माण होतो. स्वतःवर विश्वास ठेवणारा व्यक्ती जग जिंकू शकतो.
४. सतत प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते : अपयश आलं तरी निर्धार टिकून राहिला की, यश नक्की मिळतं.
उदाहरण :
स्वामी विवेकानंद : “उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका!” हे त्यांचं वाक्य निर्धाराचं उत्तम उदाहरण आहे.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम : गरिबीतून शिक्षण घेऊन भारताचे राष्ट्रपती होणे हे त्यांच्या निर्धाराचं फळ आहे.
विद्यार्थ्यांनी कसा निर्धार करावा?
१) दररोज एक छोटं ध्येय ठरवावं. मोबाईल, टीव्ही यासारखे व्यत्यय टाळावेत.
२) आत्मचिंतन करावं - “ मी काय करू शकतो?” याचा विचार करावा.
३) यशस्वी लोकांच्या गोष्टी वाचाव्यात आणि शिकावं.
निर्धार हा आयुष्य बदलणारा मंत्र आहे. तो जसा विद्यार्थ्यांच्या यशात मदत करतो, तसाच मोठ्या माणसांनाही यशाकडे घेऊन जातो. त्यामुळे “मी हे करू शकतो” हा निर्धार मनात ठेवून सतत प्रयत्न करावे. यश नक्की मिळेल!
निर्धाराची तार जर आत्मविश्वासाने छेडलीत, तर यशाचे सुमधुर संगीत ऐकू शकाल.
अडू नका, खचू नका, निर्धार करा पक्का जीवनात यशस्वी होण्याचा निर्धार हाच हुकमी एक्का.