
प्रा. प्रतिभा सराफ
जपानला उतरल्यावर एअरपोर्टवरच आमच्या टूर मॅनेजरने आम्हाला काही माहिती दिली. (माहिती म्हणायचे की सूचना?) तर त्यानुसार आपण आपल्या हॉटेलमधल्या रूममध्ये गेल्यावर डोक्याला जर विशिष्ट तेल लावत असू तर एखादा नॅपकिन उशीवर ठेवून त्यावर झोपावे. आपल्याला काही तंबाखू खाण्याची किंवा मशेरी लावायची सवय असेल, तर शक्यतो बिछान्यावर बसून ते करू नये. याशिवाय दुखऱ्या अंगाला जर बाम व तत्सम औषधे लावत असाल, तर ती व्यवस्थित पुसून मग झोपा. कोणतीही अशी गोष्ट करू नका की जेणेकरून तिकडच्या चादरींवर कुठचे डाग पडतील!

डी. प्रभाकर शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव आणि मनसेचे अध्यक्ष राज हे ठाकरे बंधू एकत्र येणार याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. ...
ही माहिती मी शांतपणे ऐकत होते, हो आणि माझ्यासोबत इतर चाळीसजणसुद्धा! मनात विचार आला अशा सूचना देण्याची गरज का बरे पडत असेल? त्यांना निश्चितपणे याविषयी काही पूर्वानुभाव आलेले असतील आणि म्हणून त्यांना अशा सूचना आधी द्याव्याशा वाटतात, हे त्यांच्याकडून मी समजू शकते; परंतु माणसे अशी का वागतात? इतक्या सुंदर, स्वच्छ पांढऱ्याशुभ्र चादरीवर चढताना ती आपल्याच्याने ती कशी खराब होणार नाही याची स्वतःहून का काळजी घेत नाही?
आता हे फक्त आपण उशी, चादर आणि बेडबद्दल नाही. आपण जेव्हा मित्र-मैत्रिणी मिळून एखाद्या हॉटेलमध्ये जातो आणि शेजाऱ्याच्या रूममध्ये सहज फेरी मारतो तेव्हा त्या रूममध्ये खुर्ची किंवा टेबलावर त्यांनी ओले कपडे वाळत घातलेले दिसतात. लाकडी उंची फर्निचर आणि त्यावरचे पॉलिश यामुळे निश्चितपणे खराब होते. असे ओले कपडे आपण आपल्या घरच्या फर्निचरवर टाकतो का? कधीच नाही. याचे कारण आपल्याला निश्चितपणे माहीत असते की लाकडी फर्निचर ओलाव्याने खराब होते. याचा अर्थ दुसऱ्यांच्या वस्तूंची आपल्याला काळजी नसते, असा होतो का? की आम्ही मोठी रक्कम देऊन या हॉटेलमधीलही रूम घेतली आहे तर ती आम्ही कशीही वापरू शकतो? की याशिवाय त्यांना असे वाटते की आम्ही असे ओले कपडे लाकडी फर्निचरवर टाकले, तर हॉटेलच्या स्टाफ किंवा मालकाला थोडीच कळणार आहे? अशी काहीशी त्यांची भावना असते.
एकदा दोन-तीन दिवसांच्या सहलीसाठी गेल्यावर, एका छोट्या ग्रुपबरोबर मी एका हॉटेलमध्ये उतरले होते. माझी मैत्रीण म्हणाली की, तू माझ्याच रूममध्ये चहासाठी ये! मी तिच्या रूममध्ये चहासाठी गेले तेव्हा तिने चहाचा कप हातात दिला आणि मी आश्चर्याने तिला विचारले की या चहात, चहा पावडर भरलेली कागदी पिशवी बुडवलेली दिसत नाही, तू काढून टाकलीस का? तर ती शांतपणे म्हणाली, “नाही चहाच्या किटलीमध्ये त्या कागदी पिशव्या कापून मी आपण घरी करतो तसा उकळून चहा केलेला आहे.” मी तिला म्हटले, “अगं त्या किटलीवर व्यवस्थित इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये लिहिलेले आहे की, ही किटली फक्त पाणी उकळण्यासाठी आहे.”
ती म्हणाली, “चहा कसा फक्कड झालाय घरच्यासारखा... त्याची मजा घे ना, त्यांना थोडीच कळणार आहे की या किटलीमध्ये मी चहा पावडर आणि दुधाची पावडर टाकून, उकळून चहा बनवला आहे?”
समोर ठेवलेले वेफर्स तोंडात टाकत ती तिचा चहा आनंदाने पीत होती ते पाहून माझे आणखी डोके फिरले. मनात आले हिच्या घरातील इलेक्ट्रिक किटलीमध्ये ही अशा स्वरूपात चहा बनवेल का? तर निश्चितच नाही. पण मी काहीच बोलले नाही.
या निमित्ताने या लेखातून मला मांडायचे आहे की सार्वजनिक ठिकाणी वापरण्याच्या वस्तूंची आपण कितपत काळजी घेतो? आम्ही शाळेतल्या मैत्रिणी कर्जतच्या एका फॉर्मवर एका दिवसाच्या पिकनिकसाठी गेलो होतो. आम्ही तिथे कोणतेही रूम बुक केलेली नव्हती. आम्ही स्विमिंग पूल व काही वॉटर गेम्स खेळून पाण्याबाहेर निघालो तेव्हा चेंजिंग रूम म्हणजे जिथे कपडे बदलून आपण कोरडे कपडे घालतो त्या ठिकाणी प्रचंड गर्दी होती. मी सहज रिसेप्शनमध्ये जाऊन सांगितले, “आम्ही सहा मैत्रिणी आहोत, आमचा चेंजिंग रूममध्ये नंबर यायला अजून तास जाईल. आम्ही परत जाण्यासाठी गाडी बोलवली आहे तर आम्हाला घाई आहे. आम्हाला आणखी कुठेतरी रूम देऊ शकाल का जिथे आम्ही पटकन कपडे बदलून इथून निघून शकू?” आमची समस्या त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी ताबडतोब आम्हाला एक रूम उघडून दिली आणि सांगितले की इथे कपडे बदला. त्या रूममध्ये गेल्यावर आमची एक मैत्रीण त्या बेडवर बसली. तिचे कपडे ओले होते ते पाहून माझी दुसरी मैत्रीण तिला म्हणाली, “तुझ्या घरी अशा ओल्या कपड्याने तू बेडवर बसली असतीस का? त्याबरोबर ती तिथून पटकन उठली आणि ‘सॉरी’ म्हणाली. हे जे माझ्या मैत्रिणीला जमले ते मला जमलेले नाही. मला हेही माहीत आहे की आपल्यापैकी अनेकांना ते जमत नाही. चार लोकांसमोर आपण अशा तऱ्हेने कोणाला बोलू शकणे फार महत्त्वाचे आहे. मला वाटते त्याचा परिणाम असा झाला असेल की त्यानंतर आमची कोणतीही मैत्रीण कधी ओल्या कपड्याने दुसऱ्यांच्या बेडवर बसली नसेल!
चारचौघांसमोर एखाद्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देणे, फार महत्त्वाचे आहे. मला कधी-कधी समोरचा व्यक्ती चुकीचा वागतो हे कळते पण अशी जाणीव करून देणे जमत नाही. पण मला असे वाटते की प्रत्येकाला हे जमलेच पाहिजे! त्या दृष्टीने मी आता प्रयत्नही करणार आहे कदाचित त्यामुळे माझ्या शत्रूपक्षात वाढ होईल! परंतु आपण काही चांगली नागरी भावना (सिविक्स सेन्स) समाजात रुजवू शकलो याचे समाधानही निश्चितपणे मिळेल! या लेखाच्या निमित्ताने मी वाचकांनाही विनंती करते की, त्यांनी सार्वजनिक मालमत्ता चुकीच्या पद्धतीने हाताळताना माणसांना पाहिले आहे. का? आणि त्यांना कधी दुसऱ्या माणसांना ‘अशा तऱ्हेने हाताळू नका’, याची जाणीव करून देता आली आहे का?