
श्रद्धा बेलसरे खारकर
पुण्यात २००७/८ सालात गुन्हेगारांचे उदात्तीकरण होत होते. शहरात त्यांचे मोठमोठे फ्लेक्स लागत. अनेक चांगल्या घरातील मुले गुन्हेगारीकडे आकर्षित होत होती. या घटना सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांना विचलित करत होत्या. मग त्यांनी सरळ अनेक गुन्हेगारांशी चर्चा केली. माणसे गुन्हेगारीकडे का वळतात याचा अभ्यास केला, अनेकांचे समुपदेशन केले. दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये आदर्श मित्रमंडळाच्या वतीने पोलिसांच्या मुलांसाठीही अनेक उपक्रम राबवले. त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला.
या दरम्यान गडचिरोली येथील नक्षलवाद्यांनी निरपराध लोकांच्या हत्या केल्याच्या बातम्या जगतापांच्या वाचनात आल्या आणि आपण तिथे जाऊन काही करावे असे त्यांना वाटू लागले. त्यांनी गडचिरोलीतील सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले, ‘या विषयात आम्हीच काम करत नाही. तर तू १००० किलोमीटरवरून येऊन कसे काही करू शकशील?’ परंतु तिथेच जाऊन काम करायचे असा जगतापांचा निश्चय झाला होता. नक्षलवाद्यांनी ज्यांची हत्या केली आहे त्यांच्या मुलांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले. ही मुले शाळेसाठी ५ / ५ किलोमीटर चालत जात असत. अशा ११० मुलांना सायकली घेऊन देण्यात आल्या. त्यावेळेचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, राहुल खाडे, सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास सुंचूवार यांनी खूप मदत केली. मुलांसाठी केलेल्या कार्यक्रमाला तेव्हाचे गृहमंत्री हंसराज अहीरही उपस्थित होते.
जे नक्षलवादी शरण येतात त्यांना आणि जे शहीद होतात त्यांना सरकारी मदत मिळते पण जे पोलिसांच्या चकमकीत मारले जातात अशांच्या कुटुंबीयांना मदत मिळत नाही. सरकार मदत करत नाही आणि नक्षलवादी त्यांच्याकडे ढुंकून बघत नाहीत. या लोकांची अवस्था फार दयनीय असते. हे लक्षात घेऊन अशा ४६ घरांना सर्वतोपरी मदत करण्यात आली.
अहेरी येथे ‘रोटरी क्लब पुणे वेस्टएंड’च्या मदतीने अंगणवाडी सुरू करण्यात आली. मुलांना ई-लर्निंगद्वारे शिकवण्यात आले. हेमलकसा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ४० शिक्षकांची बैठक घेण्यात आली. काही शाळांना ई-लर्निंगचे कीट देण्यात आले, खेळातून, ग्राफिक्समधून मुलांना शिक्षण दिले गेले. पुस्तक दहीहंडीचा कल्पक कार्यक्रम राबवून १३,०००
पुस्तके वाटली.
गडचिरोलीत असणारी पोलीस ठाणी ही कडेकोट किल्यासारखी बांधलेली असतात. तिथे फारसे कुणी येत-जात नाही. कधीकधी इथले पोलीस कर्मचारी नैराश्यात जातात. इथे वर्दळ नसते. जगतापांच्या संस्थेने मग पोलीस ठाण्यात ग्रंथालये सुरू केली. लहान मुले पुस्तके वाचण्यासाठी येऊ लागली. मुलांबरोबर आपोआपच पोलीसही वाचू लागले! पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, सागर कवडे यांनी ‘खाट लायब्ररी’ ही संकल्पना पुढे आणली. म्हणजे एका गावात गाडीतून पुस्तके नेऊन एका खाटेवर ती मांडून ठेवायची, लोक येऊन पुस्तके वाचतात. याला चांगला प्रतिसाद मिळाला. मुलांना प्रथमच आपल्या गावात इतकी पुस्तके बघायला मिळाली. इथले रस्ते छोटे आहेत. तिथून चारचाकी गाड्या जाऊ शकत नाहीत. आजारी माणसाला दवाखान्यात नेणे अवघड जाते. त्यासाठी या कल्पक लोकांनी टू-व्हीलर अम्बुलंस सुरू केली!
आजही अनेक गावात दिवे नाहीत. आजूबाजूला घनदाट जंगल असल्यामुळे विजेच्या तारा नेता येत नाहीत आणि एखादा प्रयत्न केल्यास नक्षलवादी तो हाणून पाडतात! यावरही जगतापांनी कल्पक इलाज काढला. सौरऊर्जेवर चालणारे दिवे ७२ गावात बसवले. त्याला सेन्सर लावल्यामुळे माणूस जवळ आल्यावर आपोआप दिवा लागतो. पुण्यातील अनेक लोकांनी आपल्या प्रियजनांच्या स्मरणार्थ हे सोलर दिवे तिथे लावले आहेत. हे काम मोठे कठीण होते. घनदाट जंगलामुळे साहित्य नेण्यास अडचण यायची. काही ठिकाणी छोट्या ओहळातून सामान वाहून नेण्यात आले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इथे प्रथमच अशी वीज आली!
आज शाळा, आश्रमशाळा अशा २७३ ठिकाणी मुलांना समुपदेशन दिले जाते. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जातात. अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. आदिवासींमध्ये ऋतुमती स्त्रीयांसाठी एक भयंकर प्रथा आहे. मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना जंगलात एखाद्या घाणेरड्या झोपडीत राहावे लागते. तिथे पाणी नसल्यामुळे स्वच्छताही करता येत नाही. लाईट नाही, सुरक्षा नाही त्यामुळे अनेक स्त्रिया साप चावूनही मरतात. गावकऱ्यांचे समुपदेशन करून स्त्रियांसाठी गावात स्वच्छ ‘कुर्माघर’ बांधण्यात आले. असे कितीतरी उपक्रम केले आहेत यासाठी रोमित तांबोलवार, संतोष मंथनवार, डॉक्टर सलुजा आणि पुण्यातील गणेश मंडळांनी विशेष योगदान दिले आहे.
नक्षलवादी भागात नेहमी रक्तरंजित घटनांच्या बातम्या वाचायला मिळतात. लोक सतत दहशतीखाली वावरतात. इथे शांतता नांदणे आवश्यक आहे असे वाटून विविध धर्मातील धर्मगुरूंना एकत्र बोलावून शांततेचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी ६८७६ लोक उपस्थित होते. त्या भागातली लोकसंख्या ही विखुरलेली आहे. त्यामुळे इतकी कमी वाटणारी संख्यासुद्धा विक्रमी ठरते. यांची नोंद एक विक्रम म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये करण्यात आली. यापूर्वी टर्कीमध्ये ५००० हजार लोक एकत्र जमले होते.
आता अनेक नक्षलवादी सामान्य जीवन जगू लागले आहेत. ज्यांच्या हातात ए. के. ४७ बंदुका होत्या ते लोक ‘गांधी विचार’च्या परीक्षा देऊ लागले. आजपर्यंत ५६ जणांनी ही परीक्षा दिली आहे. कुठलेही काम करत असताना स्थानिक अधिकारी आणि गावकऱ्यांची मदत मिळाल्याशिवाय ते पुढे जाऊ शकत नसते. संदीप पाटील, अभिनव देशमुख या पोलीस अधिकाऱ्यांनी जगतापांना फार मदत केली. शहिदांचे कुटुंबीय, पत्रकार व्यंकटेश दुडूमवार, खारकेले गुरुजी यांचा उल्लेख करावाच लागेल. पुण्यातील आदर्श मित्र मंडळ आणि रोटरी क्लब, पुणे वेस्टएंड यांच्या मदतीनेच हे काम होऊ शकले असा गौरवपूर्ण उल्लेख उदय जगताप करतात. या सगळ्या कामाचे फलित म्हणून गेल्या अनेक वर्षांत जिथे कधीही झेंडावंदन झाले नव्हते तिथे ते सलग ३ वर्षांपासून मोठ्या गौरवाने होत आहे. आता जगतापांतर्फे पुण्यात युवकांना ‘न्यू स्टार्ट-अप’द्वारे मदत दिली जाते. तसेच कृतिम बुद्धिमत्ता वापरासाठी प्रशिक्षणही दिले जाते. पुणे शहर एकेकाळी विद्येचे माहेरघर मानले जायचे. आज परिस्थिती वेगळी आहे.राजकारणाचा स्तर घसरला आहे. यातून काय मार्ग काढता येईल अशा अनेक विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात येतात. त्याला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. पुण्यासारख्या शहरात राहून व्यवसाय सांभाळत उदय जगताप, त्यांचे सहकारी आदर्श मित्रमंडळाच्या मार्फत हे आगळे काम शांतपणे करीत आहेत. आपल्या कामाची प्रसिद्धी व्हावी असेही त्यांना वाटत नाही! केवळ आदिवासी आपले भाऊ आहेत त्यांनाही आपल्यासारखाच जगण्याचा अधिकार आहे, असे मानून जगतापांचे काम निरलसपणे सुरू आहे.