Saturday, June 14, 2025

कोकणातील विजेचा लपंडाव थांबणार कधी...?

कोकणातील विजेचा लपंडाव थांबणार कधी...?

रवींद्र तांबे


आपल्या देशातील विकसनशील राज्यांपैकी एक म्हणजे महाराष्ट्र राज्य. त्याच राज्यातील कोकण विभागाचा विचार करता कोकण विभागात आजही विजेचा लपंडाव होत आहे. कोकण विभागात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड म्हणजे महावितरण कंपनी वीज पुरवठा करीत असते. असे असले तरी कोकणातील विजेचा लपंडाव आजही का होतो याची कारणे शोधून त्यावर तातडीने उपाय योजना करणे गरजेचे आहे.


कोकण विभागात महावितरण कंपनी वीज पुरवठा करीत असली तरी आजही विजेच्या लपंडावामुळे नागरिकांना बऱ्याचवेळा त्रास सहन करावा लागतो. तसेच वीज ग्राहकांकडून जर बिल उशिरा भरल्यास त्याला दंड आकारला जातो. मात्र दंड भरून सुद्धा विजेचा लपंडाव संपलेला नाही. हे अनेक वर्षे चालत आले आहे. तेव्हा महावितरण कंपनीचे जे अधिकारी आहेत त्यांनी वीज पुरवठ्याची समस्या समजून घेऊन ती तत्काळ सोडविणे आवश्यक आहे. त्यासाठी ज्या समस्या आहेत त्याचा त्या त्या विभागामध्ये सर्व्हे करून ज्या समस्या निर्माण होत आहेत त्यावर उपाय सुचवून ताबडतोब दीर्घकालीन उपाय योजना करायला हव्यात. म्हणजे विजेचा जो लपंडाव आहे तो कमी होऊन नागरिकांना वीज समस्येला तोंड देण्याची वेळ येणार नाही.


याचा चांगला परिणाम महावितरणातील वीजपुरवठा सुरळीत चालण्यास मदत होईल. तेव्हा महावितरण कंपनीने नागरिकांना वीज पुरवठ्याची समस्या सोडवण्यात कोणत्या प्रकारे अपयशी येत आहे त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे, तरच कोकणातील विजेचा लपंडाव थांबण्यास मदत होईल. कोकण विभागातील ग्रामीण भागात आजही अधूनमधून वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त असताना दिसून येतात. वीज खंडित झाल्याने आपल्या अंगातील घामाच्या धारा वाहू लागतात. उन्हाळ्याचा विचार करता कडक उन्हामुळे आपल्या अंगाची लाहीलाही झाल्याचे उन्हाळ्यात आपणा सर्वांना अनुभव आला असेल.


आता पावसाला सुरू झाला तरी विजेचा लपंडाव थांबलेला नाही. ही कोकणातील सर्वात मोठी समस्या आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक वेळा नागरिकांना नुकसान सहन करावे लागते. अशा वेळी कोकणातील ग्रामीण भागात वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे विजेचा लपंडाव थांबणार कधी असा प्रश्न नागरिक महावितरण कंपनीला विचारत आहेत. तसेच वीज पुरवठा नियमित होत नसेल, तर त्या विजेचा उपयोग काय? असे असताना सुद्धा नियमित वीज बिले भरावी लागतात. काही वेळा वीज पुरवठा बंद असून सुद्धा विजेच्या बिलात कपात केली जात नाही. काही ठिकाणी मीटर बंद असताना सुद्धा जास्त भाडे आकारले जाते. म्हणजे एकप्रकारे महावितरण कंपनी नागरिकांच्या जीवाचा खेळ खेळत आहे, असेच म्हणावे लागेल.


कोकणामध्ये विजेचा लपंडाव ही आजची समस्या नाही, तर कोकणात वीज पुरवठा सुरू झाल्यापासून कोकणी जनता विजेच्या लपंडावाने त्रासली आहे. अनेक वेळा महावितरण कार्यालयावर मोर्चे काढण्यात आले. अनेक राजकीय नेत्यांनी विजेचा पुरवठा नियमित करण्यात यावा अशा आशयाची पत्रे दिली तरी वीज पुरवठा सुरळीतपणे चालत नाही. फक्त आश्वासने दिली जातात. ही आजची परिस्थिती आहे. असे किती वर्षे चालणार आहे. तेव्हा महावितरणाच्या समस्या जाणून घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपाय सुचविण्यात आले पाहिजेत.


यासाठी वीज पुरवठा खंडित का होतो? काम योग्य प्रकारे झाले आहे का? योग्य पात्रताधारक स्टाफ आहे का? कार्यालये नियमित चालू असतात का? वीज ग्राहकांच्या आलेल्या तक्रारी वेळच्या वेळी सोडवल्या जातात का? कायमस्वरूपी व प्रशिक्षित स्टाफ आहे का? कार्यालयात आवश्यक सुविधा सेवकांना आहे का? विजेला आवश्यक साधनसामग्री उपलब्ध आहे का? स्टाफचे भवितव्य काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे महावितरण कंपनीला शोधावी लागतील. मात्र तसे होताना दिसत नाही. जर झाले असते, तर आज विजेचा लपंडाव झाला नसता.


आजच्या धावपळीच्या जीवनात वीज महत्त्वाची झाली आहे. असे असताना सुद्धा आजही ग्रामीण भागात विजेचा लपंडाव दिसून येतो. त्यात रात्रीचे अधिक प्रमाण दिसून येते. तेव्हा वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीने सतर्क राहणे गरजेचे आहे. सध्या वीज नागरिकांची मूलभूत गरज झाली आहे. प्रत्येक गोष्ट विजेवर चालत आहे तेव्हा वीज पुरवठा खंडित झाल्यास जनतेला त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.


ग्रामीण भागात दर सोमवारी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळात वीज पुरवठा खंडित केला जातो. मी मे महिन्यामध्ये काही दिवस गावी होतो. सोमवार सोडा संध्याकाळी दहा मिनिटे लाईट चालू, तर वीस मिनिटे लाईट बंद असा उपक्रम रात्री दहापर्यंत चालत असे. त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास व पहाटेच्या चार साडेचारच्या सुमारास लाईट खंडित होत होती. काही ठिकाणी तीस तास लाईट नाही, २४ तास लाईट गायब, महिनाभर लाईटचा खेळखंडोबा अशा बातम्या वर्तमानपत्रात वाचायला मिळाल्या. तेव्हा ग्रामीण असो वा शहरी विभाग विजेचा पुरवठा खंडित होता कामा नये.


वीजेचा पुरवठा खंडित झाल्यास त्याचा परिणाम व्यवसायावर होतो. इतकेच नव्हे, तर आपल्या विभागातील विविध दुकाने, विविध व्यावसायिक, सरकारी कार्यालये, बँका आणि दवाखाने यांना २४ तास लाईटची गरज असते ही महत्त्वाची बाब आहे. त्याप्रमाणे वेळीच बदल करून आपली सेवा सुरळीतपणे महावितरण कंपनीने सुरू ठेवावी. त्यासाठी योग्य ती काळजी कंपनीने घेणे गरजेचे आहे. यात देखभाल महत्त्वाची असते. असे जर झाले, तर कोकणातील विजेचा लपंडाव होणार नाही.

Comments
Add Comment