मुंबई : संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतही शुक्रवारी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. दरम्यान, मुंबईसह ठाणे भागात शनिवारी अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच राज्यातील इतर भागातही पुढील तीन ते चार दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यंदा लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने जूनच्या सुरुवातीपासून विश्रांती घेतली होती. काही वेळा अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. दरम्यान, मुंबईसह ठाणे परिसरात शनिवारी अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
याबरोबर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागातही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीस पोषक वातावरण असल्याने विदर्भासह, छत्तीसगड आणि ओडिशा राज्यांच्या काही भागात मोसमी वाऱ्यांची वाटचाल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.