
९७ घरांची पडझड; विजेचे खांब कोसळले
पालघर : पालघर जिल्ह्यात गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे तीन तालुक्यांत ९७ घरांची पडझड झाली असून, अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात दमदार हजेरी लावलेल्या पावसाने महिनाभराची उसंत घेतली. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पालघर, डहाणू तसेच विक्रमगड व जव्हार तालुक्यात विजेच्या गडगडाटांसह जोरदार पाऊस झाला.

महाराष्ट्रात पाऊस परतला, मुंबईसह या जिल्ह्यांना झोडपणार पुणे: महाराष्ट्रात आज दिवसभर वेगवेगळ्या जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू होणार आहे. ...
वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. त्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले आहेत. पालघर आगारात वादळी वाऱ्यामुळे दोन बसवर झाड पडले त्यामुळे बसचे नुकसान झाले आहे, तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाड पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. डहाणूसह मोखाडा व जव्हार तालुक्यातील परिसरात रात्री ११ च्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यांसह पावसाने अनेक झाडे उन्मळून पडले व विद्युत वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. संतोषी येथे एका विद्युत वाहिनीवर झाड कोसळल्याने त्वरित वीज पुरवठा बंद करण्यात आला.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पहाटे उशिरापर्यंत झाडे कापण्याचे काम सुरू ठेवल्याने हा संपूर्ण परिसर अंधारात राहिला. वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील जवळपास १५ विद्युत खांब पडले असून यामध्ये बोईसर येथील चार उच्च विद्युत वाहिन्या व सफाळे, माहीम, उमरोळी या भागातील विद्युत खांब कोसळले आहेत. ढेकाळे येथे देखील विद्युत वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले असून त्याठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे. पालघर तालुक्यातील २२, डहाणू तालुक्यातील ७० तलासरी १ आणि विक्रमगड तालुक्यातील ४ घरांचे वादळी वारा व पावसामुळे नुकसान झाले आहे.