
महाराष्ट्रात पाऊस परतला, मुंबईसह या जिल्ह्यांना झोडपणार
पुणे: महाराष्ट्रात आज दिवसभर वेगवेगळ्या जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू होणार आहे. हवामान खात्याने पुढील २४ तासांत कोल्हापूर, पुणे, रायगड, सांगली, सातारा आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर, पुन्हा एकदा महाराष्ट्राला मान्सून झोडपणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याद्वारे वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आता आयएमडीचा एक नवीन अंदाज समोर आला आहे. या नव्या अंदाजानुसार हवामान खात्याने ६ जिल्ह्यांना हाय अलर्टवर ठेवले आहे, पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
जिल्ह्यांना हाय अलर्ट
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, पुढील २४ तासांत कोल्हापूर, पुणे, रायगड, सांगली, सातारा आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. या पार्श्वभूमीवर, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या वर्षी मान्सून वेळेपूर्वी राज्यात दाखल झाला आहे. साधारणपणे दरवर्षी ७ जूनच्या सुमारास मान्सून महाराष्ट्रात प्रवेश करतो, परंतु यावेळी तो १२ दिवस आधी म्हणजे २५ मे रोजी पोहोचला. त्यानंतर, चार ते पाच दिवस राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला, दरम्यान नागरिकांची बरीच गैरसोय झालेली पाहायला मिळाली.
शेतकऱ्यांना दिलासा
वेळेआधी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व शेतीशी संबंधित तयारींना थोडा विलंब झाला जरी असला तरी, पावसाने त्यानंतर काही दिवसांसाठी विश्रांती घेतली, ज्यामुळे शेतकऱ्यांना शेताची तयारी पूर्ण करण्यास आता चांगला वेळ मिळाला. आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे पुनरागमन झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता पेरणीची कामे वेगाने सुरू होऊ शकतात.
अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा
दुसरीकडे, हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईत पाऊससदृढ वातावरण असणार आहे. काल दिवसभर मुंबईत आकाश ढगाळ होते. अखेर संध्याकाळी मुंबई आणि काही उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस झाला होतं. या अल्प पावसामुळे वातावरणात थंडावा तर आला आणि लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. आजही मुंबईत मुसळधार पाऊसाची शक्यता आहे, तर रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला उद्या (जून 15, रविवारी) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात १४ ते १९ जून, मध्य महाराष्ट्रात १४ व १५ जून, मराठवाड्यात १७ जून, तर विदर्भात १६ ते १९ जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याची द्रोणीय रेषा वायव्य राजस्थानपासून मध्यप्रदेश, विदर्भ मार्गे मराठवाड्यापर्यंत गेल्यामुळे महाराष्ट्र, गोवा आणि कोकणात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवारी आणि रविवारी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.