
इराण विरुद्ध इस्रायल, दोन्ही देशांच्या वादात भारताची तटस्थ भूमिका
नवी दिल्ली: इराणवर अलिकडेच झालेल्या इस्रायली हल्ल्यांचा निषेध करणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेने (एससीओ) जारी केलेल्या निवेदनापासून भारताने शनिवारी स्वतःला दूर ठेवले असून, या गटातील टिप्पण्यांकडे नेणाऱ्या चर्चेत आपण सहभागी नसल्याचे स्पष्ट केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) एका निवेदनात म्हटले आहे की, "शांघाय सहकार्य संघटनेने (SCO) इस्रायल आणि इराणमधील अलीकडील घडामोडींवर एक निवेदन जारी केले आहे. वर उल्लेख केलेल्या SCO निवेदनावरील चर्चेत भारताने भाग घेतलेला नाही."
परराष्ट्र मंत्रालयाने दिनांक १३ जून रोजी पहिल्यांदा व्यक्त केलेल्या इस्रायल-इराण तणावाबाबत भारताच्या तटस्थ भूमिकेची पुष्टी केली आहे. तसेच दोन्ही देशांना शांतता आणि संवाद साधण्याचे आवाहन पुन्हा केले. "आम्ही आग्रह करतो की तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि राजनैतिक मार्गांचा वापर केला पाहिजे. आंतरराष्ट्रीय समुदायाने त्या दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे," असे निवेदनात म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) यांनी अलिकडच्याच चर्चेदरम्यान त्यांच्या इराणी समकक्षांशी चर्चा केली होती, त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाची खोल चिंता व्यक्त केली होती. तसेच आणखीन वाद टाळण्याची आणि राजनैतिक प्रक्रियांद्वारे प्रश्न सोडवण्याची गरज पुन्हा व्यक्त केली होती.
एससीओच्या निवेदनात काय होते?
एससीओच्या निवेदनात इस्रायलने इराणी भूभागावर केलेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करण्यात आला होता, त्यांना "ऊर्जा आणि वाहतूक पायाभूत सुविधांसह नागरी लक्ष्यांविरुद्ध आक्रमक कारवाई" असे वर्णन करण्यात आले होते, ज्यामुळे नागरी जीवितहानी झाली आणि आंतरराष्ट्रीय कायदा व संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे उल्लंघन केल्याचे म्हंटले होते. तसेच इराणच्या अणुकार्यक्रमाभोवतीचा तणाव शांततापूर्ण आणि राजनैतिक मार्गाने सोडवण्याच्या समर्थनाची पुष्टी करत इराणी जनता आणि सरकारला संवेदना व्यक्त केल्या होत्या.
भारताची तटस्थ भूमिका
भारताने १३ जून रोजी पहिल्यांदा जाहीर केलेल्या आपल्या तटस्थ भूमिकेचा पुनरुच्चार केला, ज्यामध्ये संयम, संवाद आणि राजनैतिकतेवर भर देण्यात आला. "भारत दोन्ही बाजूंना कोणतेही उत्तेजनात्मक पाऊल टाळण्याचे आवाहन करतो. तणाव परिस्थिती कमी करण्यासाठी आणि मूलभूत समस्या सोडवण्यासाठी संवाद आणि राजनैतिकतेच्या विद्यमान माध्यमांचा वापर केला पाहिजे," असे पूर्वीच्या एमईएच्या निवेदनात म्हटले होते.
भारताचे दोन्ही देशांसोबत घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध
भारताचे दोन्ही देशांबरोबर चांगले संबंध असल्यामुळे, या दोन्ही देशांच्या वादात एकाचा पक्ष घेऊन दुसऱ्याला निराश करणे भारतीय परराष्ट्र धोरणात बसणारे नाही. त्यामुळे भारताने "दोन्ही देशांसोबतचे घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध" यावर भर दिला आणि शांततेच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली. परराष्ट्र मंत्रालयाने असेही नमूद केले की इराण आणि इस्रायलमधील भारतीय दूतावास भारतीय समुदायाच्या संपर्कात असून, तेथील भारतीय नागरिकांना सावध राहण्याचा आणि स्थानिक सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देतात.