
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर
दि. १२ जून, गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे विमान बोइंग ड्रीमलायनर ७८७ गुजरातमधील अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनकडे जाण्यासाठी निघाले आणि टेक ऑफ (उड्डाण) करताच काही सेकंदातच ते मोठ्या संकटात सापडले. विमान उंचीवर जाण्याऐवजी वेगाने खाली येऊ लागले. विमानाचे गिअर्स जाम झाले, विमानाच्या टायर्सची चाके आत खेचली गेलीच नाहीत. विमानात सव्वालाख लिटर इंधन होते. काही क्षणातच विमानाने मोठा पेट घेतला आणि आगीच्या लोळाने विमानाला लपेटले. विमानातील एक प्रवासी वगळता क्रू मेंबरसह २४१ जण भडकत्या ज्वाळांमध्ये होरपळून मरण पावले.
विमानतळावर आपल्या नातेवाइकांचा निरोप घेऊन आणि मोठी स्वप्ने उराशी बाळगून लंडनला निघालेल्या या प्रवाशांच्या शरीरांचा विमानाला लागलेल्या आगीत अक्षरश: कोळसा झाला. विमानात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज, १ कॅनडाचे नागरिक होते. आकाशात उडालेले ड्रीमलायनर ६२५ फुटांवरून वेगाने खाली आले आणि बी. जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर जाऊन धडकले. वसतिगृहाची भिंत तोडून हे ड्रीमलायनर इमारतीत घुसले. त्यावेळी वसतिगृहाच्या भोजनगृहात जेवत असलेले काही डॉक्टर्स व मेडिकल कॉलेजचे विद्यार्थीही मृत्युमुखी पडले व बरेच जण जखमी झाले. या भयंकर अपघातात विमानातील प्रवासी व वसतिगृहातील मेडिकलचे विद्यार्थी अशा मृतांची संख्या २७५ वर गेली.
अहमदाबाद - लंडन या ड्रीमलायनर ७८७ विमानाच्या भीषण अपघाताने साऱ्या जगाला हादरा बसला. अमेरिकेच्या बोइंग कंपनीने ड्रीमलायनर विमान बनवले होते, हे विमान ब्रिटनला चालले होते आणि हा भयावह अपघात भारतात, अहमदाबाद विमानतळावर घडला. अहमदाबाद विमातळावरचा हा दुसरा मोठा विमान अपघात आहे. दि. १९ ऑक्टोबर १९८८ रोजी इंडियन एअरलाइन्सच्या मुंबईहून आलेल्या विमानाला अहमदाबाद विमानतळावर उतरताना अपघात झाला होता व त्यात १३० प्रवाशांचा मृत्यू झाला.
दि. १२ जून २०२५ रोजी अहमदाबाद विमानतळावर झालेल्या विमान अपघाताचे नेमके कारण अजून बाहेर आलेले नाही. ड्रीमलायनरचे उड्डाण होताच पक्ष्यांनी विमानाला धडक दिली असे सुरुवातीला कारण पुढे आले होते, नंतर टेक ऑफ करताना तांत्रिक बिघाड झाला अशी शक्यता व्यक्त केली गेली. विमान आकाशात झेप घेताना इंजिनच बंद पडले किंवा दोन्ही इंजिने खराब झाली असतील तर हे खूपच गंभीर आहे. विमानाचे उड्डाण होत असताना वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला आपत्कालीन संदेश दिला होता पण त्याच क्षणाला विमानाशी संपर्कच तुटला. मेघाणीनगरमधील निवासी क्षेत्रावर पाच मजली इमारतीवर आगीने पेटलेले ड्रीमलायनर धडकले तेव्हा हाहाकार उडाला.
ड्रीमलायनर ७८७ च्या अपघातानंतर प्रवाशांची विमान प्रवासातील सुरक्षा किती धोक्यात आहे हे वास्तव पुढे आले. या अपघातानंतर विमान प्रवास व विमान कंपन्या यांच्यावरील विश्वासाला मोठा तडा गेला आहे. विमान वाहतूक क्षेत्रात जगभर जीवघेणी स्पर्धा आहे. विमानांची संख्या, प्रवासी संख्या आणि विमानतळांची संख्याही सतत वाढते आहे. विमान वाहतूक क्षेत्रालाही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते आहे. स्पर्धा मोठी म्हणून कमी भाडे आकारून प्रवाशांना आकर्षित केले जाते. साधनसामग्री, सुटे भाग व इंधन यांचे दर सतत वाढत आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी विमान कंपन्यांना मोठी गुंतवणूक करावी लागते आहे.
अनेक विमान कंपन्या तोट्यात आहेत. दुसरीकडे विविध स्तरावर विमान कंपन्यांचा संवाद कमी आहे. व्यवस्थापनाकडे दूरदर्शीपणाचा अभाव आहे. कुशल नेतृत्व व कमजोर व्यवस्थापन यातून विमान कंपन्यांची घसरण होते आहे. कर्मचारी व प्रवासी यांना गृहीत धरून विमान कंपन्यांचा कारभार चालवला जात आहे. व्यवस्थापन, दुरुस्ती देखभाल, वक्तशीरपणा याकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचा परिणाम प्रवाशांच्या सुरक्षिततेवर होतो. अहमदाबाद विमानतळावरील ड्रीमलायनरच्या भीषण अपघाताने विमान प्रवाशांच्या सुरक्षितेचा मुद्दा हा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
यापूर्वीही ड्रीमलायनरमध्ये छोट्या-मोठ्या त्रुटी आहेत किंवा काही बाबी खराब आहेत अशा १३६ तक्रारींची नोंद आहे व २०१४ ते २०१५ या काळात बोईंग ७८७ मध्ये तक्रारींच्या ३२ घटना आहेत, हे जर खरे असेल तर ड्रीमलायनरची अधिक काळजीपूर्वक देखभाल करायला हवी होती. इंजिन बंद पडणे, फ्लाइट कंट्रोलमध्ये अडचणी, गिअर न उघडणे, केबिनमध्ये धूर, दळवळणात खंड पडणे, केबिन प्रेशरच्या समस्या, टायर फुटणे, वगैरे वगैरे अशा तक्रारी आता ऐकायला मिळत आहेत. अहमदाबाद विमानतळावर कोसळलेले विमान हे बारा वर्षे सेवेत होते. या विमानाचे नेमके आयुष्य किती असते यावर आता उलट-सुलट चर्चा होत आहे. दिल्लीत डिझेलवर धावणाऱ्या व दहा वर्षे पूर्ण झालेल्या मोटारीला रस्त्यावर आणायला बंदी आहे मग विमान उड्डाणासाठी काही कालमर्यादा नाही का?
ड्रीमलायनर विमानाचे मौत की उडाण किंवा बोईंग बॉम्ब असे वर्णन केले जात आहे. २७५ बळी घेणाऱ्या विमान अपघाताला जबाबदार कोण, तांत्रिक चूक की कोणाचा निष्काळीपणा? ड्रीमलायनर विमानाच्या उत्पादनातच त्रुटी आहेत, त्याचे साचे जोडताना जुळणी बरोबर झालेली नाही, असे बोईंग कंपनीत अनेक वर्षे काम केलेल्या एका अभियंत्यानेच म्हटले होते. दोन इंजिन असलेल्या ड्रीमलायनरच्या अपघाताचा रेकॉर्ड नाही, पण बोइंगच्या दुसऱ्या विमानांचे जगात सहा हजारांपेक्षा जास्त अपघात झालेले आहेत, त्यात नऊ हजारांपेक्षा जास्त मृत्युमुखी पडलेत.
जगात विमान उत्पादन करणाऱ्या अमेरिकन कंपनी बोइंग व युपोपियन कंपनी एअरबस या दोनच मोठ्या कंपन्या आहेत. जगातील दीडशे देशांत बोइंगची विमाने वापरली जातात. सन २०१४ मध्ये अपघातग्रस्त विमान एअर इंडियाकडे आले. या विमानाने आठ हजार उड्डाणे केली आहेत. जगभरात अकराशे ड्रीमलायनर विमाने विविध देशांत प्रवासी सेवेत कार्यरत आहेत.
भाजपाचे माजी खासदार डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांनी अहमदाबाद विमान अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व नागरी वाहतूकमंत्री राममोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. मोदी व शहा यांचा या विमान अपघाताशी काहीही सुतराम संबंध नाही. नायडू हे तेलुगू देशम पक्षाचे. चंद्राबाबू नायडू यांचा हा पक्ष एनडीएचा घटक पक्ष त्यांनी हे खाते आपल्या पक्षाला मागून घेतले, एवढाच नायडूंचा संबंध. डॉ. स्वामी यांच्याकडे भाजपामधील एक अस्वस्थ आत्मा म्हणून बघितले जाते.
अहमदाबादच्या अपघातानंतर विमानप्रवासात आपण सुखरूप पोहोचू शकतो या विश्वासाला तडा गेला आहे. विमानातील एअर कंडिशन्ड बंद आहे, सीटसमोरील टीव्ही बंद आहे, सीटमध्ये खराबी आहे, विमानात मिळणारे भोजन चांगले नाही, विमानात पाहिजे ती वृत्तपत्रे, मासिके मिळत नाहीत, या कारणांचा विमान अपघाताशी काहीही संबंध नसतो. विमातळावर तिकिटाच्या काऊन्टरवर एक मिनीट जरी प्रवाशाला उशीर झाला तर त्याला बोर्डिंग कार्ड दिले जात नाही. बोर्डिंग कार्ड असूनही उशीर झाला तर सिक्युरिटी चेकसाठी त्याला परवानगी दिली जात नाही. बॅगेचे वजन थोडेही जास्त असलेले तिथे चालत नाही, लगेचच जादा पैसे भरावे लागतात.
प्रवाशांबाबत विमान कंपन्या एवढ्या काटेकोर वागतात, मग त्यांच्या सुरक्षिततेविषयी बेपर्वाई का? कोणत्याही एका कारणामुळे अपघात घडत नाहीत, अनेक कारणे साचत राहिली की, अपघाताकडे वाटचाल होते. एका बिघाडातून दुसरा बिघाड - तिसरा बिघाड अशी मालिका सुरू होते, तेव्हा संकटाकडे मार्गक्रमण सुरू होते. त्रुटी, कमतरता नि बिघाड वेळीच दुरुस्त करणे हे महत्त्वाचे आहे. पण बेपर्वाई आणि फाजिल आत्मविश्वास अनेकदा नडतो व प्रवाशांच्या जीवावर उठतो. देखभाल व दुरुस्ती यांचा दर्जा कमी असेल किंवा कामचलावू काम असेल तर ते विमानसेवेत कसे चालू शकेल? विमान प्रवास, विमानतळ, कारभारावर डीजीसीए लक्ष ठेऊन असते आणि नियंत्रण ठेवते.
या संस्थेत ५६ टक्के पदे रिक्त आहेत, अशी माहिती यानिमित्ताने बाहेर आली आहे. नागरी विमान वाहतूक संबंधित ज्या ज्या यंत्रणा आहेत तिथे पुरेसे मनुष्यबळ नसेल, तर केवळ पाट्या टाकण्याचे काम चालू राहील व त्याचा परिणाम शेवटी विमान सेवेवर होईल याची कल्पना संबंधितांना नाही काय? अपघातानंतर रोज टीव्ही चॅनेलवर चर्चा चालू आहे, त्यात निवृत्त अधिकारी चर्चेत भाग घेतात. नागरी विमान वाहतूक मंत्री, राज्यमंत्री, सचिव वा अन्य वरिष्ठ पदांवर असलेले अधिकारी स्वत: जनतेला विश्वासात घेण्यासाठी पुढे का येत नाहीत? अपघात झाला की, सर्व दोष प्रथम वैमानिकांना दिला जातो हे चुकीचे आहे. मृतांच्या नातेवाइकांना किती नुकसानभरपाई मिळणार, एक कोटी की दोन कोटी यावर चर्चा अधिक होते, पण एवढे पैसे मिळाल्यावर अपघातात गमावलेला जीव परत येणार आहे का?
नॅशनल इनव्हेस्टिगेशन एजन्सी, गुजरात पोलीस, एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेटिव्ह ब्युरो, डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन, युनायटेड किंगडम एअर अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिकेटिव्ह ब्रॅच, युनायटेड स्टेटस नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्ड, फेडरल एव्हिगेशन अॅडमिनिस्ट्रेशन अशा यंत्रणा ड्रीमलायनर विमान अपघाताची चौकशी करीत आहेत. यापूर्वीच्या विमान अपघातानंतर अनेक चौकशा झाल्या, त्यांचे अहवाल आले. संसदेत चर्चा झाली पण त्यातून दोषी कोणा-कोणाला शिक्षा झाली, नेमकी चूक कोणाची? त्यातून काय बोध घेतला? अन्यथा चौकशी व त्यांचे अहवाल हा एक केवळ उपचार ठरेल... अपघातग्रस्त विमान पॅरिसहून दिल्लीला आले, दिल्लीहून अहमदाबादला आले मग तेथून लंडनला जाण्यासाठी उड्डाण होताच त्याचा मृत्यूगोल का झाला?
[email protected]
[email protected]