Saturday, June 14, 2025

पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांवर २०० कॅमेरे ठेवणार नजर

पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांवर २०० कॅमेरे ठेवणार नजर
मुंबई : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी राज्यातून सुमारे सहा लाख वारकरी सहभागी होण्याची शक्यता असल्याने आळंदी पोलिसांच्या वतीने शहरामध्ये सर्व चौकांत पोलीस मदत केंद्र कार्यरत केले जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी बेवारसपणे ठेवल्या जाणाऱ्या संशयास्पद वस्तूंवर तसेच चोरांवर नजर ठेवण्यासाठी सुमारे दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. वारी काळात मंगळवार (दि. १७) ते शुक्रवार (दि. २०) स्थानिक नोकरदार आणि भाविक दिंडीकऱ्यांच्या वाहना व्यतिरिक्त अन्य प्रकारच्या वाहनांना आळंदीत प्रवेश करण्यास मज्जाव केल्याची माहिती यावेळी आळंदी पोलीस प्रशासनाने दिली.

आळंदी शहरात सध्या भोसरी, मरकळ, चाकण, महाळुंगे, रांजणगाव औद्योगिक भागात ये-जा करणाऱ्या कंपन्या तसेच कामगारांच्या वाहनांची संख्या लक्षणीय आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांची वाहनेही आता सुरू झाली आहेत. यामुळे नियोजनाचा भाग म्हणून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी आणि त्यांच्या सहकारी अधिकारी यांनी आळंदीतील इंद्रायणी परिसर, देऊळ वाड्यास भेटी दिल्या.



आळंदीत वाहनतळ अपुरे असल्याने रस्त्यावर कोणत्याही प्रकारची वाहने उभी केली जाणार नाहीत. परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत त्यांनी त्यांच्याकडील वाहने धर्मशाळेत उभी करावीत. दिंड्यांची वाहने प्रस्थान काळात आळंदीत वाहनपास पाहून सोडण्यात येतील. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्थानिक नागरिकांना गुलाबी रंगाचा, तर दिंड्यांच्या वाहनांना पिवळ्या रंगाचा पास देण्यात येणार आहे.

...असा असेल बंदोबस्त


वारीसाठी यंदाच्या वर्षी सात सहायक पोलीस आयुक्त, ४२ पोलीस निरीक्षक, १६४ पोलीस उपनिरीक्षक, १३४० पोलीस अंमलदार, ६०० होमगार्डस, एनडीआरएफची एक तुकडी, बीडीडीएसच्या दोन तुकड्या बंदोबस्तासाठी नेमल्या आहेत.
Comments
Add Comment