विमान दुर्घटना भयावह; कशामुळे नि कोणामुळे?

  150

१२ जून २०२५ ही तारीख, सर्व देशवासीयांसाठी एक भयावह मृत्यूचा थरार ऐकविणारी ठरली. कोणाच्या मनीध्यानी नसताना गुरुवारी दुपारी गुजरातमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर देशाचे वातावरण हादरून गेले. परदेशी प्रवाशांना घेऊन लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात काही मिनिटांत कोसळल्याची दुर्घटना घडते. या अपघाताची माहिती ज्यांच्या ज्यांच्या कानावर पडते त्यांची एक सार्वत्रिक प्रतिक्रिया असते, "बापरे". बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरते अन् सारा देश सुन्न झाल्याचे चित्र पाहायला मिळते. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यासह एकूण २४२ प्रवासी होते.


ज्या डॉक्टरांच्या हॉस्टेलच्या इमारतीवर विमान आदळले, तिथे किती नुकसान झाले. डॉक्टरांसह किती जणांचे बळी गेले हा आकडा कानावर येण्याअगोदर विमानातील २०० हून अधिक मृत्युमुखी पडल्याची बातमी हृदय हेलावणारी होती. सुदैवाने दोन प्रवासी नशीब बलवत्तर म्हणून वाचला. आता विमान जळून खाक झालं. त्यामुळे प्रवाशांची ओळख पटणे हे जिकिरीचे काम असल्याने, जे प्रवासी मृत्युमुखी पडले त्यांचे अंत्यसंस्कार कसे होणार हा नातेवाइकांच्या दृष्टीने भावनिक मुद्दा आहे. विमान प्रवाशांबरोबर काळाने डॉक्टरांच्या समूहावरही घाला घातला. दुपारचे जेवण करताना तोंडात घास पडण्याऐवजी २० हून अधिक डॉक्टरांना मृत्यूने कवटाळल्याचा प्रकार हा स्थानिक गुजरातच्या जनतेवर दु:खाचा डोंगर कोसळल्यासारखाच होता.


हा अपघात कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, एअर इंडियाचे विमान टेकऑफनंतर काही मिनिटांत दुर्घटना घडली. लगेच ६२५ फुटांवरील विमान अहमदाबाद हॉर्स कॅम्पजवळ कोसळले. बोईंग विमानाने आधी पेट घेतला आणि नंतर ते कोसळले. विमानाचा मागचा भाग झाडाला धडकल्याने अपघात झाला की, विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याने हा अपघात झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भारतात आतापर्यंत झालेल्या विमान अपघाताच्या दुर्घटनांमध्ये अहमदाबादचा अपघात ही अलीकडची मोठी दुर्घटना मानली जात आहे. मात्र या विमान अपघाताच्या बातमीनंतर मुंबईकरांना घाटकोपरसारख्या गजबजलेल्या परिसरामध्ये २०१८ साली कोसळलेल्या विमान अपघाताची आठवण झाली.


घाटकोपरमध्ये कोसळलेले विमान हे लहान आकाराचे म्हणजेच चार्टर विमान होते. चाचणी उड्डाणादरम्यान म्हणजेच टेस्ट फ्लाईटदरम्यान किंग एअरचे चार्टर विमान अपघातग्रस्त होऊन वस्तीत शिरले होते. तसे पाहिले तर भारतात पहिला विमान अपघात १९३८ मध्ये झाला होता. एअर फ्रान्सचे पोटेझ विमान मध्य प्रदेशातील दातियाजवळ कोसळले. त्यात सात जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या पंधरा वर्षांतील भारतातील दुसरा मोठा अपघात कर्नाटकातील मंगळूरु येथे मे २०१० मध्ये घडला, या अपघातात १५८ जण मृत्युमुखी पडले होते. फेब्रुवारी १९९० मध्ये बंगळूरुमध्ये एअरबस ए ३२० विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरले आणि शेतात पडले, त्यात ९२ जणांचा मृत्यू झाला होता. पायलटच्या चुकीमुळे आतापर्यंत अनेक दुर्घटना घडल्या आहेत. मात्र, याआधी विमानावर दहशतवादी हल्लाही झाला होता. तो जून १९८५ साली खलिस्तान समर्थकांनी विमानावर दहशतवादी हल्ला केला होता.


एअर इंडिया फ्लाइट १८२ त्यावेळी आयर्लंडच्या किनाऱ्याजवळ अटलांटिक महासागरात बॉम्बस्फोटात उडवून देण्यात आले होते. त्यात ३२९ लोकांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत झालेल्या विमान अपघाताची कारणे पाहिली तर वैमानिकाची चूक हे विमान अपघातांचे एक प्रमुख मानले जाते. वैमानिकांकडून जेव्हा टेकऑफ दरम्यान वेग, धावपट्टीच्या लिफ्ट ऑफ पॉइंट किंवा पिच अँगलचा चुकीचा अंदाज घेतला जातो, तेव्हा अपघात होतात. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक अहवालांनुसार, टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान होणाऱ्या बहुतेक अपघातांमध्ये मानवी चूकही कारणभूत ठरली आहे. त्याचे कारण, टेकऑफ अपघातांपैकी ६५% मानवी चुकांमुळे होतात आणि २०% तांत्रिक बिघाडामुळे तर, १०% हवामानामुळे होतात, ५% इतर कारणांमुळे होतात, अशी जगभरातील आकडेवारी सांगते.


संपूर्ण टेकऑफ प्रक्रिया पायलटच्या नियंत्रणाखाली असते. प्रत्येक निर्णय काही सेकंदांत घ्यावा लागतो. टेकऑफ दरम्यान ऑटो-पायलट नसतो, सर्व नियंत्रण मॅन्युअल असते. टेकऑफचे नियोजन आणि आपत्कालीन स्क्रिप्ट देखील पायलटच्या योजनेवर अवलंबून असते. म्हणूनच टेकऑफ दरम्यान अपघात झाल्यास, विमान वाहतूक तज्ज्ञ प्रथम पायलटच्या निर्णयाची आणि प्रतिक्रियेची तपासणी करत असतात. तसेच खराब हवामानामुळे टेकऑफ दरम्यान विमान अपघात होण्याची कारणे पुढे आलेली आहेत. टेकऑफ दरम्यान जोरदार वारे, गडगडाट, कमी दृश्यमानता किंवा मायक्रोबर्स्ट ही अपघातांची प्रमुख कारणे असतात. इंजिनमध्ये समस्या असल्यास, पक्षी आदळल्यास किंवा सिस्टममध्ये बिघाड झाल्यास, पायलटला काही सेकंदांत निर्णय घ्यावा लागतो की टेकऑफ सुरू ठेवायचे की धावपट्टीवर विमानाला काही प्रकारे थांबवण्याचा प्रयत्न करायचा.


अहमदाबाद विमान दुर्घटनेतील पायलट सुमित सबरवाल हा सुद्धा आज जगात नाही. नक्की काय घडले हे आता सांगता येणार नसले तरी, ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षांत विमान प्रवाशांची संख्या वाढलेली आहे. ते पाहता, भविष्यात अपघात होऊ नये यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर व्हायला हवा. जीवाची किंमत मोठी आहे. एका क्षणार्धात होत्याचे नव्हते... असे एका विमान अपघातातून घडू शकते. अपघात टाळण्यासाठी विमान कंपन्यांबरोबर केंद्र सरकारनेही अधिक लक्ष घालायला हवे.

Comments
Add Comment

विकास आणि प्रगतीची, मोदी सरकारची ११ वर्षे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारला अकरा वर्षे

टेनिस कोर्टचा नवा सितारा

क्लेकोर्टवरील सर्वात दीर्घ लांबीचा सामना पाच सेटमध्ये जिंकून स्पेनच्या कार्लोस अल्काराझने विजेतपदावर आपले

लोकलची जीवघेणी गर्दी, निरपराध प्रवाशांचे बळी

मुंबईची विस्तारीत उपनगरे असलेल्या दिवा-मुंब्रा दरम्यान खचाखच गर्दीने धावणाऱ्या लोकलमधील दरवाजात उभे असणारे

राहुल गांधींना निवडणूक आयोगाची चपराक

सातत्याने एकच गोष्ट खोट बोलत राहिलो की, तीच गोष्ट लोकांना खरी वाटू लागते. असेच तत्त्वज्ञान गोबेल्स या हिटलरच्या

चिनाब रेल्वे पूल, विकासाचे नवे पर्व

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरला आता थेट रेल्वेने जाता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी

विजयाच्या जल्लोषावर बंगळूरूमध्ये शोककळा

आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (आरसीबी)च्या विजयाचा जल्लोष साजरा करत असतानाच बंगळूरुमध्ये एक अत्यंत