Friday, June 13, 2025

रायगड जिल्ह्यात अकरावी प्रवेशप्रक्रियेचा गोंधळ संपेना

रायगड जिल्ह्यात अकरावी प्रवेशप्रक्रियेचा गोंधळ संपेना

पोर्टल बंद झाल्यानंतर ऑफलाईन प्रक्रियेवर आशा


कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी अडवणूक


अलिबाग :अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रियेची सक्ती अनेक पालकांसह विद्यार्थ्यांना चिंतेत टाकत असून, ऑनलाईन प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतरही विद्यार्थी पर्यायी प्रवेशासाठी प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात इंटरनेटचा अभाव, पडणारा पाऊस यामुळे प्रवेश घेण्यास अडचणी आल्या. या अडचणीने नव्या शैक्षणिक वळणावर असताना या विद्यार्थ्यांना चिंतेत टाकले आहे. दोन वेळा ऑनलाईन प्रवेश नोंदणी करण्याची प्रक्रिया वाढवून देण्यात आली.



मात्र, वाढीव एक तारखेबाबत पालकांना योग्यती माहिती मिळत नसल्याने गोंधळात वाढ होत आहे, तर, याच संधीचा फायदा घेत, काही कॉलेजेस विद्यार्थ्यांना थेट घरी संपर्क करून आपल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी उद्युक्त करीत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना योग्यतो पर्याय निवडण्यास संभ्रम निर्माण होत आहे.


अकरावी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची शुक्रवारी काही महाविद्यालयांमध्ये यादी जाहीर झाली. मात्र, या पहिल्या यादीत नावे नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम वाढत चालला आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ४१९ शैक्षणिक संस्थांमध्ये ४० हजार ७० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची क्षमता आहे; परंतु चांगल्या शिक्षणासाठी चांगले गुण मिळवणारे विद्यार्थी मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणच्या संस्थांमध्ये प्रवेश घेत असल्याचे दिसून येत आहे.


यंदा दहावीमध्ये ३४ हजार ६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाईन सक्तीमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी खूपच धावपळ करावी लागली. १३ मे रोजी निकाल लागल्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे कागदपत्र जमवण्यात अडचणी आल्या.



विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धडपड


विज्ञान शाखेत प्रवेशासाठी सर्वाधिक विद्यार्थ्यांची धडपड, प्रयत्न विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेची क्षमता १५ हजार २३८ इतकी आहे. मागील वर्षी यातील १२ हजार ७२ जागांसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यंदाही विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचे आकर्षण असल्याचे दिसून येत आहे.


Comments
Add Comment