Friday, June 13, 2025

रक्ताचे नाते

रक्ताचे नाते

रंजना मंत्री : मुंबई ग्राहक पंचायत


प्रत्येक व्यक्तीचा एक ठरावीक रक्तगट असतो. हा रक्तगट ठरवताना रक्तातील अनेक घटक लक्षात घेतले जातात. प्रत्येकाला स्वत:चा रक्तगट कोणता हे माहिती असणे आवश्यक आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही कारणाने बाहेरून रक्त घेण्याचा प्रसंग येतो किंवा दुसऱ्याला रक्त देण्याची निकड निर्माण होते, तेव्हा त्या व्यक्तीला त्याचा स्वत:चा रक्तगट माहीत असण्याचा फार मोठा फायदा होऊ शकतो. ज्या गुणधर्मामुळे रक्तगट ठरवले जातात त्याच गुणधर्माला अनुसरून रक्तगट 'ओ' असलेली व्यक्ती इतर सर्व रक्तगटाच्या व्यक्तींना रक्त देऊ शकते. म्हणून 'ओ' रक्तगटाच्या व्यक्तीला 'वैश्विक रक्तदाता' म्हणतात. त्या उलट त्या व्यक्तीला मात्र फक्त 'ओ' रक्तगटाच्या व्यक्तीचेच रक्त चालते. तसेच 'एबी' रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर कोणालाच चालणारे नसते; परंतु त्या व्यक्तीला इतर सर्व रक्त गटांच्या व्यक्तीचे रक्त चालते.


म्हणून 'एबी' रक्तगट असलेली व्यक्ती 'वैश्विक रक्त घेणारा' असे संबोधले जाते. ॲनिमिया, रक्ताचा कर्करोग, थॅलिसिमिया किंवा तत्सम गंभीर आजार असलेल्या रुग्णावर उपचार करण्यासाठी रक्ताची सतत गरज पडत असते. आपल्या देशात ही गरज फार मोठ्या प्रमाणात आहे. तसेच काही वेळा बाळाला जन्म देताना किंवा अपघातादरम्यान अति रक्तस्त्राव झाल्यानेही रक्त द्यावे लागते. अशा अनेक कारणासाठी रक्ताची आवश्यकता वारंवार भासत असते आणि म्हणूनच रक्ताची साठवणूक रक्तपेढ्यातून केली जाते. परंतु तुलनेने यासाठी रक्तदानातून प्राप्त होणारे रक्तदानाचे प्रमाण आपल्याकडे केवळ ०.९९ टक्के एवढेच आहे.


प्रत्येक राज्यातील, 'राज्य रक्त संक्रमण समिती' रक्त पेढ्याकडून साठवलेल्या रक्ताचा तपशील वेळेवर सादर करत असते. या समितीने नुकत्याच दिलेल्या अहवालानुसार २०२४ सालात महाराष्ट्र राज्यात एकूण एकवीस लाख बत्तीस हजार युनिट एवढेच रक्त संकलित झाले. त्यात पुरुष रक्तदात्यांची संख्या ९३.९८% तर स्त्री रक्तदात्यांची संख्या केवळ ६.१% एवढीच होती. अनेक सरकारी रुग्णालयातील रक्तपेढ्या गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार रक्त आणि रक्त उत्पादने (घटक) पुरविण्याची कामगिरी करत सामुदायिक आरोग्याची भूमिका बजावत असतात. खासगी रुग्णालये व स्वयंसेवी संस्थातर्फेही रक्तपेढ्यास चालवणे, रक्तदान शिबिरे आयोजित करत जागरूकता निर्माण केली जाते. रक्तपेढी चालविण्यासाठी १९४० च्या औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्यांतर्गत नोंदणी करून नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.


रक्त पेढ्यातून रक्ताची चाचणी करणे, रक्तावर प्रक्रिया करणे, गरजेनुसार पुरवता यावे यासाठी प्लेटलेट्स, प्लाझ्मा, लाल रक्तपेशी साठवून ठेवणे इत्यादी गोष्टी केल्या जातात. कोणत्याही रक्तपेढीतून प्राप्त करून घेतलेल्या चुकीच्या रक्त संक्रमणामुळे संस्था किंवा संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदवता येते. योग्य प्रतिसाद न मिळाल्यास पुढे ग्राहक न्यायालयाकडे दाद मागता येते. रक्तदान न करण्यासाठी अनेक गैरसमज कारणीभूत ठरतात. जसे की, वजन कमी होणे, आयुष्य कमी होणे वगैरे; परंतु हे गैरसमज दूर करुन रक्तदानाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन समाजात निर्माण झाला पाहिजे.


खरे तर रक्त दान केल्याने रक्ताभिसरण सुधारणे, नवीन रक्त पेशी तयार होण्याची प्रक्रिया सुधारणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढणे, हृदयविकाराचा धोका कमी होणे, लोहाचे प्रमाण नियंत्रित राहाणे असे अनेक फायदे असतात; परंतु हृदयाशी संबधित आजार असलेली व्यक्ती, कर्करोगाचा रुग्ण, एचआयव्ही बाधित व्यक्ती, गर्भार व स्तनपान करणारी महिला व अमली पदार्थाचे सेवन केलेली व्यक्ती यांना मात्र रक्तदान करता येत नाही.


तसेच, दातावर उपचार चालू असताना व नंतर एक महिन्यापर्यंत, टायफॉइड किंवा कॉलराची लस घेतल्यावर पंधरा दिवस किंवा मलेरिया आजारावर तीन महिने आधी उपचार घेतलेले असेल, तर तसेच रेबीसवर एक वर्षापूर्वी लस घेतलेली असेल तर अशा व्यक्ती रक्तदान करू शकत नाही. रक्तदान करण्यासाठी हिमोग्लोबीनचे प्रमाण कमीतकमी १२.५ ग्रॅम/मि.ली. व वयोमर्यादा १८ ते ६५ एवढी असावी लागते. रक्तदानाच्या वेळी एका व्यक्तीचे ३५० मि.ली एवढे रक्त घेतले जाते आणि तीन महिन्याने पुन्हा रक्तदान करता येऊ शकते.


इतरांच्यासाठी रक्तदान करणारी व्यक्ती स्वत:ला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. त्यासाठी रक्ताची नियमित चाचणी करून घेण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. वयाच्या तीस वर्षांनंतर सीबीसी हिमोग्लोबीनसाठी, एचबीए १ सी डायबीटीससाठी, तर रोगप्रतिकारकशक्तीसाठी डब्ल्यूबीसी, त्याशिवाय थायरॉईड या गोष्टींची चाचणी जरूर करून घ्यावी. कायद्याने पैशासाठी रक्तदान करता येत नाही. कर्तव्य भावनेतून रक्तदान करणाऱ्या निरोगी व्यक्तीला काही कारणांनी रक्ताची गरज निर्माण झालीच, तर त्याला हक्काने (कायद्याने) रक्त उपलब्ध करून घेणे सुलभ होते. रक्ताचे नाते कितीही महत्त्वाचे असले तरी, रक्तदान करून एक माणुसकीचे नाते आपण समाजात नक्कीच निर्माण करू शकतो. शिवाय भविष्यात आपणही रक्ताचे ग्राहक होऊ शकतो हे लक्षात ठेऊन आधीच रक्तदान करून ठेवलेले चांगले.


[email protected]

Comments
Add Comment