
मुंबई : एअर इंडियाच्या AI-171 विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी DNA चाचण्या करण्याचा निर्णय अधिकृतरीत्या घेण्यात आला आहे. अपघात इतका भीषण होता की अनेक मृतदेह ओळखण्याच्या पलीकडे आहेत. त्यामुळे नातेवाईकांची अधिकृत ओळख आणि मृतांचे अवशेष सुपूर्त करण्यासाठी DNA तंत्राचा वापर करण्याची गरज भासली आहे.
या प्रक्रियेची सुरुवात मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या कुटुंबीयांपासून करण्यात आली आहे. मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी सरकारी वैद्यकीय अधिकारी आणि तज्ज्ञांची टीम पोहोचली असून, DNA नमुने घेण्यात आले आहेत. याचप्रमाणे इतर मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून हळूहळू ही प्रक्रिया विस्तारित केली जाईल.
वैद्यकीय सूत्रांनुसार, DNA मॅचिंग ही अत्यंत काटेकोर आणि वेळखाऊ प्रक्रिया असली, तरी तीच सध्या मृतांची अचूक ओळख पटवण्यासाठी सर्वात विश्वसनीय माध्यम आहे. सरकारी यंत्रणांनी मृतांच्या कुटुंबीयांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, सर्व माहिती गोपनीय ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले होते की, मृतांची अधिकृत यादी फक्त DNA चाचणी पूर्ण झाल्यानंतरच प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे अनेक कुटुंबीय सध्या प्रतीक्षेत आहेत.
एअर इंडिया AI-171 अपघातात २४२ जण होते, त्यातील २०० पेक्षा अधिकांचा मृत्यू झाला असून केवळ एकच प्रवासी बचावला आहे. सरकारी पातळीवर या दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.