
अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबाद येथून लंडनच्या गॅटविक येथे जात असलेले एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान AI-171 गुरूवारी टेक ऑफ करतात लगेचच क्रॅश झाले. आतापर्यंत या अपघातात २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. डेप्युटी कमिशनर यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. या विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्ससह एकूण २४२ लोक होते.
रडार डेटाच्या माहितीनुसार विमानाने दुपारी १.३९ मिनिटांनी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. मात्र समुद्रतळापासून ६२५ फूटच्या उंचीवर पोहोचल्यानंतर त्यात तांत्रिक बिघाड आला आणि त्याचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी असलेला संपर्क तुटला. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे देखील प्रवास करत होते.
विमान दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू
गुरूवारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच हे विमान क्रॅश झाले आणि मेघानीनगर येथील मेडिकल कॉलेजच्या मेस बिल्डिंगला आदळले. यानंतर अतुल्यम हॉस्टेलला हे विमान आदळले. यामुळे विमानाचे आगीच्या गोळ्यात रुपांतर झाले. चारही बाजूंनी धुराचे लोळ आणि मलबा पसरला होता. एकच हल्लाकल्लोळ झाला.
विमान दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद पोलिसांनी सांगितले की विमान दुर्घटनेनंतर सिव्हिल रुग्णालयात २६५ मृतदेह आणण्यात आले. मृतांमध्ये हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या लोकांचाही समावेश आहे.
एक प्रवासी सुखरूप
विमान दुर्घटनेत एक प्रवासी सुखरूप असल्याची बातमी समोर आली आहे. या प्रवाशाचे नाव रमेश विश्वास कुमार आहे. या रुग्णावर उपचार सुरू आहेत.