
माझे कोकण : संतोष वायंगणकर
परमेश्वराला पहाटेच्या वेळी पडलेलं सुंदर स्वप्न असं यथार्थ वर्णन अनेक साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून कोकणचं केलेलं आहे. ऋतुचक्राप्रमाणे कोकणचं मोहक सौंदर्य बदलत जातं. अगदी पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत कोकणच्या सौंदर्याच्या नजाकती आपणाला पाहायला मिळतात. गेल्या काही वर्षांत कोकणातील सृष्टीसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येऊ लागले आहेत. दरवर्षी पर्यटकांची ही संख्या वाढत आहे. राजकीय भाषणातील कोकणचं कॅलिफोर्निया करण्याच्या ‘गजाली’च्या स्वप्नात कोकणवासीय अनेक वर्षे रमून गेला; परंतु जेव्हा जगातील अनेक सौंदर्यवान देशांपेक्षाही कोकणचं सौंदर्य फार वेगळं आहे. निसर्गाने कोकणाला भरभरून तर दिलंच आहे; परंतु सृष्टीतील वेगळेपण आणि काही अशा सौंदर्याच्या खाणी दिल्या आहेत. ज्यामुळे कोकणात एकदा आलेल्याला पुन्हा-पुन्हा येण्याचा मोह काही आवरता येत नाही. कोकणातील १२१ कि.मी.चा समुद्र, पांढऱ्या शुभ्र मोत्यांचा भास व्हावा असा वाळूचा किनारा, समुद्राची गाज याचं एक वेगळंच संगीत किनाऱ्यावर ऐकायला मिळतं. माड, पोफळीच्या बागा खाडीकिनारी या माडांच्या बागांमध्ये असलेली घरं हे सारं अनुभवतांना एका भावविश्वाचा निश्चितच आनंद मिळून जातो.
पर्यटकांना यापलीकडे हव्या असतात पर्यटनाला जातानाच्या सुखसोयीची उपलब्धता... आजही पर्यटकांना कोकणात आल्यावर अनेक पर्यटनस्थळांवर जातानाचे अरुंद रस्ते, वाहनांची पार्किंग व्यवस्था, आपलेपणाची भाषा अशा अनेक गोष्टींचा आजही अभाव आहे. कोकणात पर्यटनाला प्रचंड मोठा वाव आहे. याची चर्चा नेहमीच होत असते; परंतु पर्यटन विकासावर केवळ चर्चा आणि पर्यटनाला वाव आहे म्हणून चालणार नाही, तर त्यासाठीची कृतीची जोड असणं आवश्यक आहे. दुर्दैवाने महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पर्यटनमंत्री जे होतात त्यांना एकतर पर्यटन विभागाच्या कामात स्वारस्य नसते. किंवा पर्यटन व्यवसायाने महाराष्ट्राच अर्थकारण कसं बदलू शकत हे जाणून घेण्याची मानसिकता नसते. हे काही विद्यमान स्थितीविषयीचं मत नाही, तर यापूर्वीही वेगळी स्थिती नाही. काही नवं करण्याची धडपड असावी लागते. ती कोकणात पर्यटनाला किती वाव आहे त्यात नव्याने कोणती भर घालू शकतो. काय करणं आवश्यक आहे याचा विचार सत्तास्थानावर असलेल्यांकडून होण्याची आवश्यकता आहे. आजवर पर्यटनमंत्री येतात ते फक्त कोकणातील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी; परंतु त्यानंतरही काही करण्याची इच्छाशक्ती दिसत नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती भागामध्ये जलपर्यटन प्रकल्प पर्यटन विकासामार्फत राबविण्यात येत आहे. समुद्रच्या तळाशी जलपर्यटन प्रकल्प होत आहे. भारतातील हा पहिलाच प्रकल्प आहे. गोवा राज्याच्या सीमेवर असणाऱ्या कोकणामध्ये पर्यटक येत आहेत. गोव्यापेक्षाही पर्यटकांची पसंती कोकणाला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यटक येत आहेत. देशी-परदेशी पर्यटक कोकणात येत आहेत. कोकणात पर्यटन वाढत असताना येणाऱ्या पर्यटकांची दरवर्षी संख्या वाढत असताना आता पर्यटन व्यवसाय वाढवण्याची जबाबदारीही आपली कोकणवासीयांची आहे. ‘व्हया तर घेवा नाय तर जावा’ हा आपल्या व्यवसायातील बेफिकीरपणा बदलायला हवा. येणाऱ्या पर्यटकांना अनेक पर्याय खुले आहेत. याचं भान आणि जाणीव आपण ठेवली पाहिजे. कोकणातील काही ठरावीक पर्यटनस्थळ जरी लोकचर्चेत असली तरीही, कोकणातील अनेक पर्यटनस्थळांकडे आजही पर्यटक जाताना दिसत नाहीत. त्या पर्यटनस्थळांवर पर्यटक कसे जातील यासाठीच्या सुविधा तिथे निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
कोकणातील जनतेनेच आपल्याकडील पर्यटनस्थळ पर्यटन नकाशावर कशा पद्धतीने येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. रायगडपासून सिंधुदुर्गपर्यंत अनेक घाटमार्ग हे देखील अतिशय सुंदर पर्यटनस्थळ आहेत. ज्यांना पर्यटनाची दृष्टी आहे असे येणारे पर्यटक या घाटमार्गांचाही आनंद घेतात. यामुळे कोकणातील पुरातन मंदिर, कातळशिल्प, उंच डोंगर-दऱ्या या सर्वांमध्ये पर्यटनस्थळ आहेत. कोकणामध्ये सर्वकाही आहे; परंतु ज्याची कमी आहे ती व्यावसायिकता... जी व्यवसायिकता पश्चिम महाराष्ट्रात पाहायला, अनुभवायला मिळते. त्याचं अनुकरण कोकणामध्ये करण्याची आवश्यकता आहे. सर्व जग आपणालाच कळतंय, समजतंय, आम्हाला कोणी शहाणपणा शिकवण्याची आवश्यकता नाही. या मानसिकतेतून कोकणवासीयांनी बाहेर येण्याची आवश्यकता आहे. कस्तुरी मृगासारखीच आपली अवस्था झालेली आहे. सर्वकाही आपणापाशी आहे; परंतु बहुधा याची जाणीवच आपल्यामध्ये नाही आहे. घाटमाथ्यावर गेल्यावर कोल्हापुरात एखाद्या वस्तूखरेदीसाठी आपण गेल्यावर तिथला व्यावसायिक ज्या आपलेपणाने आपणाला सेवा देतो, ज्या पद्धतीने त्याचा ग्राहकाशी संवाद असतो तो संवाद, तो आपलेपणा, अनुभवण्यासारखा असतो. एक साध उदाहरण आपणाला पुरेस आहे. कोल्हापूरकडच्या कुठल्याही हॉटेलमध्ये मिसळपावचा जरी आस्वाद घेण्यासाठी तुम्ही पोहोचलात तरी वेटर पाच-दहा वेळा आपल्या टेबलापाशी येऊन साहेब, रस्सा देऊ का? म्हणून विचारेल. याउलट आपणाकडे कोणतीही वस्तू परत मागितली की डोक्यावर आठ्या पडतात. खरं तर असं काही करण्याची, होण्याची आवश्यकता नसते. जादाचे पैसे घेतले म्हणून ग्राहक कधी नाराजी व्यक्त करत नसतो. (एखाद्या अपवादाचा विचार आपण करायचा नसतो.) परंतु सर्वसाधारणपणे आपला अनुभव काय असतो. याचा विचारही आपण करण्याची आवश्यकता आहे.
परप्रांतातून येणारे व्यवसायिक जर आपल्यापेक्षा वेगळ्या पद्धतीची सेवा देत असतील तर आपण गुजराती, मारवाड्यांच्या नावाने बोट मोडण्यात काहीच अर्थ नाही. आपलं काय चुकतंय हे शोधल्याशिवाय आपण व्यवसाय करू शकणार नाही. कोकणातील पावसाळा तर मनाला आनंद देणारा असाच असतो. निसर्गाने सर्वत्र हिरवेगार गालीचे अंतरले आहेत. असाच भास आपणाला झाल्याशिवाय रहात नाही. पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्याही कोकणात वाढेल कशी हा व्यावसायिक हिशोबीपणा आपण खऱ्याअर्थाने जपला पाहिजे. जे निसर्गाने कोकणाला दिलय त्या सृष्टीसौंदर्याचा आपण पुरेपूर उपयोग करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर आमच्यासारखे आम्हीच !