
मुंबई : मुंबईतील एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्या कुटुंबियांकडून दीड कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत नागालँडमधून तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी या तिघांकडून अपहृत व्यावसायिकाची सुटका केली असून आरोपींना पुढील तपासासाठी मुंबईत आणले जात आहे.
व्यावसायिकाच्या कुटुंबीयांनी अपहरणाची तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हे शाखेने विशेष पथक तयार करून समांतर तपास सुरू केला. खंडणीसाठी आलेल्या फोन कॉल्सचं विश्लेषण केलं असता ते नागालँडहून होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांचं पथक नागालँडकडे रवाना करण्यात आलं आणि तिथून तिघांना अटक करण्यात आली.
या आरोपींनी चौकशीत सांगितले की, अपहृत व्यावसायिकाने एका व्यवसाय करारात त्यांची २५ लाख रुपयांची फसवणूक केली होती आणि त्या प्रकरणाची तक्रारही नागालँडमधील स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल आहे. मात्र, पोलिसांनी या दाव्यांची पडताळणी सुरू केली आहे.
अटक करण्यात आलेले तिघे नागालँडमधील स्थानिक रहिवासी असून, त्यांच्या अटकेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने आरोपींना विमानतळावर आणून मुंबईकडे रवाना केलं.
या प्रकरणात खंडणी मागण्याच्या गंभीर आरोपांबरोबरच व्यावसायिकाविरुद्धही काही दावे समोर येत असून, पोलिसांकडून दोन्ही बाजूंची चौकशी सुरू आहे.