Friday, June 13, 2025

Ahmedabad plane crash: टाटा सन्स मृतकांच्या वारसांना देणार १ कोटींची मदत

Ahmedabad plane crash: टाटा सन्स मृतकांच्या वारसांना देणार १ कोटींची मदत

अपघातात क्षतीग्रस्त झालेले रुग्णालय देखील उभारणार


टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची घोषणा


मुंबई : गुजरातच्या अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा (फ्लाईट क्र. एआय 171) आज, गुरुवारी अपघात झाला. यात क्रू-मेंबर्ससह 242 जणांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर यांनी शोक व्यक्त करत अपघातातील मृत प्रवाशांच्या वारसांना १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. यासंदर्भात टाटा सन्सकडून संध्याकाळी ७.३० वाजता अधिकृत घोषणा करण्यात आली.


एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलायनर हे विमान कोसळून प्रवासी आणि क्रू मेबर्स अशा २४२ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या ५ मिनिटामध्ये हे विमान कोसळले. या विमान अपघातानंतर टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी एक शोक व्यक्त केला. आपल्या शोकसंदेशात एन. चंद्रशेखरन म्हणाले की, आम्हाला एअर इंडियाच्या अपघाताचे मनापासून दु:ख झाले आहे.


या क्षणी आम्हाला झालेले दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, तसेच जे जखमी झाले आहेत, त्या सर्वांच्या आमच्या सहवेदना आणि प्रार्थना आहेत. तसेच या दुःखद घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला टाटा समूह १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देईल. तसेच जखमी झालेल्यांच्या वैद्यकीय खर्च आम्ही करू आणि त्यांना सर्व आवश्यक वैद्यकीय उपचार व सहकार्य मिळेल याची काळजी घेऊ. याशिवाय, बी जे मेडिकलच्या होस्टेलच्या उभारणीसाठीही आम्ही मदत करू, असे चंद्रशेखरन यांनी सांगितले. या कठीण काळात ज्या कुटुंबांवर हे दुःख कोसळले आहे, त्यांच्या आम्ही ठामपणे उभे आहोत अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Comments
Add Comment