Thursday, June 12, 2025

खासदार असदुद्दीन ओवैसींनी पंतप्रधान मोदींसोबतची भेट का टाळली ?

खासदार असदुद्दीन ओवैसींनी पंतप्रधान मोदींसोबतची भेट का टाळली ?

नवी दिल्ली : पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या कारवाईनंतर भारताने ऑपेशन सिंदूर राबवले. यानंतर दहशतवाद प्रकरणी देशाची अधिकृत भूमिका जगाला सांगण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी सर्वपक्षीय नेत्यांची सात शिष्टमंडळे निवडक देशांमध्ये पाठवली होती. यातील एका शिष्टमंडळात खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानचा दुटप्पीपणा, खोटेपणा उघड केला. दहशतवाद प्रकरणी पाकिस्तान सांगतोय काय आणि करतोय काय ही बाब जगापुढे ठामपणे मांडली. सर्व शिष्टमंडळे मोहीम यशस्वी करुन मायदेशी परतली. पंतप्रधान मोदींनी मंगळवार १० जून २०२५ रोजी शिष्टमंडळांतून परदेशी गेलेल्या सर्व राजकीय नेत्यांची भेट घेतली. याप्रसंगी शिष्टमंडळांचे सदस्य उपस्थित होते पण खासदार असदुद्दीन ओवैसी गैरहजर होते. असदुद्दीन ओवैसी यांच्या अनुपस्थितीवरुन चर्चेला उधाण आले होते. अखेर ओवैसी यांनीच परदेशातून त्यांची बाजू मांडली.



ओवेसींनी सांगितले अनुपस्थितीचे कारण


माझ्या बालपणीचा मित्र दुबईत रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. यामुळे तातडीने दुबईत जाऊन मित्राची विचारपूस करण्याचा निर्णय घेतला. यामुळेच पंतप्रधान आणि शिष्टमंडळ यांच्यातील चर्चेच्या कार्यक्रमाला गैरहजर होतो, असे खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले. अनुपस्थितीबाबत आधीच माझ्या शिष्टमंडळाचे नेते बैजयंत पांडा यांना माहिती दिली होती, असेही खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले.


अनेक देशांना भेट देऊन पाकिस्तानची गुपिते उघड केली


पहलगाम हल्ल्यानंतर, ओवैसी सरकारला पाठिंबा देताना दिसले. ते शिष्टमंडळ गटाचा भाग बनले आणि जगभरातील अनेक देशांमध्ये भारताची बाजू धाडसीपणे मांडली. त्यांनी सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन आणि अल्जेरियाला भेट दिली आणि पाकिस्तानचा पर्दाफाश केला. त्यांनी पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला आणि सांगितले की पाकिस्तान केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी धोका आहे. त्यांच्यासोबत शिष्टमंडळात भाजपा खासदार बैजयंत पांडा, निशिकांत दुबे, फांगनॉन कोन्याक, रेखा शर्मा, सतनाम सिंग संधू होते. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद आणि मुत्सद्दी हर्षवर्धन श्रृंगला होते.


देशहित महत्त्वाचे


पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांनी पाकिस्तानविरुद्ध तीव्र टीका केली. ते म्हणाले की, पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. ते पुढे म्हणाले की, एआयएमआयएम आणि भाजपाच्या विचारसरणी वेगवेगळ्या आहेत हे खरे आहे, आम्ही नेहमीच त्यांच्याविरुद्ध लढू. ही आमची अंतर्गत बाब आहे. पण जेव्हा देशाचा प्रश्न येतो आणि दुसरा देश आपल्या घरात घुसून आपल्याच लोकांना मारतो, तेव्हा वैचारिक मतभेद किंवा राजकारणाचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा वेळी, आम्ही भारत आणि भारतातील लोकांसोबत उभे राहू.


पंतप्रधानांना लोकांचे मत माहित आहे


पंतप्रधान मोदींच्या या भेटीचा उद्देश फक्त त्यांच्या शिष्टमंडळांबद्दल लोकांचे मत जाणून घेणे हा होता. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पंतप्रधानांना सांगितले की त्यांनी ज्या देशांना भेट दिली त्या देशांच्या लोकांना ही कल्पना खूप आवडली. थरूर म्हणाले की, आम्ही सर्वांनी पंतप्रधानांना असे सुचवले की भविष्यातही अशाच प्रकारची कल्पना स्वीकारली पाहिजे. ते म्हणाले की, पंतप्रधानांसोबतची ही एक अतिशय अनौपचारिक बैठक होती. आम्ही सर्वजण अनौपचारिक पद्धतीने बोलत होतो आणि आमचे विचार शेअर करत होतो.

Comments
Add Comment