
विकासकामांमुळे प्रशासनाचा निर्णय; पर्यटकांमध्ये नाराजी
वाशी : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने गवळीदेव परिसराचा विकास करण्यात येत आहे. त्यामुळे गवळीदेव परिसरात पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाच्या निर्णयामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ जून रोजी काश्मीरसाठी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि ७ जूनपासून ही ट्रेन ...
फेसाळलेला धबधबा, हिरवाईने नटलेला डोंगर असे वर्णन गवळीदेव परिसराचे केले जाते. घणसोली शहराच्या पूर्व सीमेवर कल्याण आणि नवी मुंबईच्या मध्यभागी ‘घणसोलीचा वॉटरफॉल’ म्हणजेच ‘गवळीदेव धबधबा’ पर्यटनस्थळ मागील अनेक वर्षांपासून पर्यटकांना आकर्षित करीत आहे. गवळीदेव धबधब्याला येथील नागरिक ‘घणसोली टेकडी’ही म्हणतात. एका बाजूला औद्योगिक परिसर असल्याने या ठिकाणी धबधबा असेल, असे कुणाला वाटणारही नाही; मात्र हा डोंगर जसजसे आपण वर चढत जातो, तसतशी येथील निसर्गसौंदर्याने नटलेल्या वनराईचे दर्शन होत जाते. काहीसा डोंगर चढल्यानंतर समोर दिसतो तो उंच कड्यावरून कोसळणारा फेसाळलेला धबधबा. या धबधब्यावर येण्याची सर्वोत्तम वेळ पावसाळ्यात असते. अन्यथा, इतर ऋतुमध्ये हा धबधबा एक शांत टेकडी म्हणून ओळखली जाते. हिवाळा आणि उन्हाळ्यात सभोवतालचे जंगल क्षेत्र फिरता येऊ शकते.
गवळीदेव पर्यटनस्थळाचा विकास अनेक वर्षांपासून रखडला होता. अखेर वनविभागाच्या सहकार्याने नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून या परिसराचा विकास करण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. पालिकेने या आधी गवळीदेव पर्यटनस्थळाच्या ठिकाणी प्रवेशद्वार, दीपस्तंभ उभे केले आहे; मात्र आता पालिकेकडून गवळीदेव पर्यटनस्थळाच्या ठिकाणी स्वच्छतागृहे, पाण्याची व्यवस्था, डोंगर कड्यांना संरक्षण कठडे, डोंगर माथ्यावर चढण्यासाठी आकर्षक पायऱ्या, विहिरी, तलावांची स्वच्छता, पर्यटन विश्रांती कक्ष, थकलेल्या पर्यटकांसाठी आणि निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी बसण्याची व्यवस्था, पक्षीप्रेमींसाठी माहिती फलक, पथदिवे, कचराकुंडी, ठिकठिकाणी देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. या ठिकाणी पालिकेकडून ही कामे प्रगतिपथावर सुरू आहेत.