
दोन महिन्यांत निम्म्या विहिरींची कामे पूर्ण
पालघर : पालघर जिल्ह्यामधील विविध गाव पाड्यांमधील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यात ४०४ विंधन विहिरींची कामे मंजूर आहेत. मात्र यापैकी निम्मे म्हणजेच २०० कामे पूर्ण करण्यात आली आहेत. ३० जूनपर्यंत सर्व विंधन विहिरींची कामे पूर्ण करावी लागणार असल्याने २० दिवसांत राहिलेली कामे पूर्ण होणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. नवीन विंधन विहीर बांधणे, विंधन विहिरींची दुरुस्ती, नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती, तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना तयार करणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अशा उपाययोजनांचा समावेश कृती आराखड्यामध्ये करण्यात आला आहे.
पाणीपुरवठा कृती आराखड्यात प्रस्तावित ४४२ विंधन विहिरींपैकी ३४९ विंधन विहिरींच्या खोदकामास तत्कालीन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी मंजुरी दिली होती. तर ९३ विंधन विहिरीची कागदपत्रे पूर्ण नसल्याने त्या अपात्र करण्यात आल्या होत्या. अपात्र करण्यात आलेल्या विंधन विहिरींपैकी मोखाडा तालुक्यातील ५३ आणि वाडा तालुक्यातील २ विंधन विहिरींचे कागदपत्र नव्याने सादर करण्यात आले.
त्यानुसार पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी मोखाडा तालुक्यातील ५३ आणि वाडा तालुक्यातील दोन अशा एकूण ५५ विंधन विहिरींच्या कामास ९ एप्रिल रोजी मंजुरी दिली आहे.
दरम्यान, ९ एप्रिल ते ९ जून या दोन महिन्यांच्या कालावधीत २०० विंधन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत तर २०४ कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. विशेष म्हणजे पाणीटंचाई उपायोजनांची कामे २०२४-२५ यावर्षीच्या कालावधीत पूर्ण होऊन याच वर्षी उपयोगात येतील या दृष्टीने कामे करण्याचे निर्देश सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते. विंधन विहिरीचा उपयोग ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणासाठीच करावा अन्यथा विंधन विहीर घेण्यात येऊ नये यासोबतच ही कामे कोणत्याही परिस्थितीत ३० जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात यावी असे आदेशही जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी दिले आहेत. मात्र ९ जून पर्यंत २०० विंधनविहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता २० दिवसांमध्ये विंधन विहिरींची कामे पूर्ण होणार कशी याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.
पैसे उशिराने मिळत असल्याने निरुत्साह
यावर्षी केलेल्या पाणीटंचाईच्या कामाचे देयक पुढच्या वर्षी मिळते. त्यामुळे पाणीटंचाईची कामे करण्यास कंत्राटदार सहज तयार होत नाहीत. शासनाच्या शेकडो योजनांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्या जातो. मात्र अत्यंत आवश्यक असलेल्या पाणीटंचाईच्या कामासाठी वेळेवर निधी दिला जात नाही. त्याचा परिणाम पाणीटंचाईच्या कामावर होतो. करिता या संदर्भात शासनाने पुनर्विचार करण्याची मागणी जोर धरत आहे.
तालुका मंजूर विंधन विहीर
- पालघर ४७
- वसई १३
- तलासरी २५
- वाडा १११
- जव्हार ६०
- मोखाडा ५३
- डहाणू ४१
- विक्रमगड ५४