Thursday, June 12, 2025

भारतीयांच्या जन्मदरात लक्षणीय घट, ही आहेत प्रमुख कारणे

भारतीयांच्या जन्मदरात लक्षणीय घट, ही आहेत प्रमुख कारणे
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालानुसार १४६ कोटी लोकसंख्येच्या भारताच्या जन्मदरात मागील काही वर्षांमध्ये सातत्याने घट होऊ लागली आहे. आता भारताचा जन्मदर १.९ टक्के एवढा कमी झाला आहे. याचा अर्थात भारतात एक महिला दोन किंवा त्यापेक्षा कमी मुलांना जन्म देत आहे. किमान २.१ टक्के जन्मदर असेल अर्थात प्रत्येक महिला किमान दोन मुलांना जन्म देत असेल तर संबंधित देशाच्या नव्या पिढ्या जन्माला येणे आणि त्यांनी उज्ज्वल भविष्यासाठी काम करणे हे प्रत्यक्षात घडू शकते. पण जन्मदर १.९ असेल तर नव्या पिढ्या निर्माण होण्याच्या प्रमाणातच घट होईल. यामुळेच ही चिंतेची बाब असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जन्मदरात घट होण्याची प्रक्रिया अशीच पुढे सुरू राहिली तर आणखी काही दशकांनी भारतापुढे गंभीर आव्हानं निर्माण होण्याची शक्यता आहे.

संयुक्त राष्ट्रांनी जगातील १४ देशांचा आढावा घेतला. प्रत्येक देशाची लकसंख्या, तिथला जन्मदर अशी अनेक माहिती संकलित करण्यात आली. प्रत्येक देशातील नागरिकांशी चर्चा करुन त्यांचे पुढल्या पिढीला जन्म देण्याबाबतचे मत जाणून घेण्यात आले. यातूनच जन्मदरातील वाढ आणि घटीची प्रमुख कारणे समजली आहेत. भारतात जन्मदर १.९ टक्के एवढा कमी होण्याची काही प्रमुख कारणे आहेत. ही कारणे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून हाती आली आहेत.

भारतात १३ टक्के दांपत्य निपुत्रिकपणाच्या समस्येमुळे पुढील पिढीला जन्म देण्यास असमर्थ आहेत. देशातील १४ टक्के दांपत्य गरोदरपणाशी संबंधित काही शारीरिक समस्यांमुळे पुढील पिढीला जन्म देण्यास असमर्थ आहेत. भारतातील १५ टक्के दांपत्य विशिष्ट आजारांमुळे पुढील पिढीला जन्म देणे टाळत आहेत. देशातली ३८ टक्के दांपत्य आर्थिक अस्थिरतेमुळे पुढील पिढीला जन्म देणे टाळत आहेत. विशेष म्हणजे जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेतही ३८ टक्के दांपत्य आर्थिक अस्थिरतेमुळे पुढील पिढीला जन्म देणे टाळत आहेत.

भारतातील २२ टक्के दांपत्य हक्काचे घर नाही म्हणून बाळाला जन्म देणे टाळत आहेत. देशातील २१ टक्के दांपत्य नोकरी - व्यवसायातील अस्थिरतेमुळे बाळाला जन्म देणे टाळत आहेत.
Comments
Add Comment