Thursday, June 12, 2025

Bhandup History : भांडुप - इतिहास, वारसा आणि रम!

Bhandup History : भांडुप - इतिहास, वारसा आणि रम!
सात बेटांनी बनलेली मुंबई ही सर्वांना माहीत आहे. याच मुंबईतल्या भांडुपचा आपण आज इतिहास पाहणार आहोत. विशेष म्हणजे सालसेट बेट. याच सालसेट बेटावर पहिली रम तयार केली. कुणी बनवली पहिली रम ? रम बनवायला कुणी दिली परवानगी? काय आहे भांडुपचा समृद्ध इतिहास ? चला जाणून घेऊया भांडुपचा इतिहास, वारसा आणि रम

?si=6gHsMxpzYzceQHOD

भांडुप...१८८१ मधलं आणि मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर वसलेलं एक जुनं गाव. आजच्या वेगवान शहराच्या सावलीत भांडुप हरवलेला परिसर असला तरी इतिहासाच्या पानांमध्ये भांडुप हा एक झळकलेला परिसर आहे. १८८१ मध्ये भांडुपची लोकसंख्या होती अवघ्या ८८४ इतकी. ठाण्यापासून अवघ्या चार मैलांवर आणि नॅशनल पार्कमध्ये असलेल्या काण्हेरी लेण्यांपासून फक्त दोन मैलांवर हे भांडुप गाव वसलेलं. आज भांडुप हे पर्यटक आणि इतिहासप्रेमींसाठी महत्त्वाचं ठिकाण आहे.



तुलसी तलाव आणि काण्हेरी लेणी यांच्यामुळे भांडुपला निसर्ग आणि इतिहास यांचा अनोखा संगम लाभलाय. १८०३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने म्हणजेच इंग्रजांनी भांडुप आणि आसपासचा गाव ल्यूक ॲशबर्नर यांना भाड्याने दिला. ल्यूक ॲशबर्नर हे बॉम्बे कुरियर या वर्तमानपत्राचे संपादक. इंग्रजांनी भाडुंप त्यांच्याकडे सोपवतानाच वेगळी आणि विचित्र अट घातली. ती म्हणजे रम तयार करायची. त्यामुळे वर्तमानपत्र सांभाळायचं की रम तयार करायची असा मोठा प्रश्न लूक ॲशबर्नर यांच्यासमोर उभा राहिला. त्यांनी रम बनवायची जबाबदारी त्यांचे सहकारी कावसजी यांच्यावर सोपवली आणि जगातील पहिल रम भारतात अर्थात भांडुपमध्ये सुरू झाली. ही रम पिण्यासाठी अनेक इंग्रज रेल्वेने भांडुपला येत असायचे. भांडुपमध्ये बनत असलेली रम ही ब्रिटिश सैन्यालादेखील पुरवली जात होती.

१८०३ मध्ये भांडुप, नाहूर आणि कांजूरमार्ग यांचा समावेश असलेली भांडुप इस्टेट अस्तित्वात होती. त्यामुळे १८५३ मध्ये भारतात पहिली रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे धावली, त्या पहिल्या रेल्वेगाडीच्या मार्गावर भांडुप हे महत्त्वाचं रेल्वेस्टेशन होतं. या रेल्वे स्टेशनवर रमचा आस्वाद घेण्यासाठी ब्रिटिश उतरत असतं. आश्चर्याची बाब म्हणजे त्याकाळी साडेचार लाख लिटिर रम बनवली जात असे. मात्र मॉरिशिअसमध्ये स्वस्त रम तयार व्हायला लागली त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने १८५७ मध्ये रमची ऑर्डर रद्द केली. शेवटी भांडुपमध्ये तयार होणारी रम १८७८ मध्ये बंद झाली.

सन १८२९ मध्ये फ्रामजी कावसजी यांनी भांडुपमधील काही जमीन विकत घेतली. त्यांनी विहिरी, परदेशी वनस्पती आणि सुंदर बागा तयार केल्या, मात्र त्यांचा १८५१ मध्ये मृत्यू झाला. १८३५ मध्ये भांडुपजवळ ताम्रपट सापडला. त्यामुळे भांडुपचा इतिहास उलघडला. १०२६ मध्ये शिलाहार राजा छित्तराजदेव यांनी नौर गावात म्हणजे आताचं नौरीमध्ये जमीन दान दिल्याची नोंद सापडली. यात गोव्हण आणि गोरपवली यांचाही उल्लेख आहे. मुंबईच्या सर्वात जुन्या उपनगरांपैकी एक, भांडुप. त्याच्या नावाचा उगम झाला भांडुपेश्वर या शिवाच्या नावावरून. येथील प्राचीन भांडुपेश्वर महादेव मंदिर आजही भक्तांचं श्रद्धास्थान आहे. भांडुपचा हा प्रवास इतिहास, संस्कृती आणि निसर्गाचा एक सुंदर मिलाफ आहे. प्राचीन ताम्रपटांपासून ते रेल्वेच्या गजबजाटापर्यंत. तरीही भांडुपने इतिहास जपला आहे. भांडुप हे केवळ एक रेल्वेस्थानक नाही. तर इतिहास, संस्कृती, आणि विस्मरणात गेलेल्या स्मृतींचा एक जिवंत दस्तऐवज आहे. रम कारखाना असो किंवा ताम्रपटातली नोंद – भांडुपचं अस्तित्व हा मुंबईच्या इतिहासातला मैलाचा दगड आहे.
Comments
Add Comment