
मुंबई : यंदा सुरू असलेल्या अकरावी प्रवेशामध्ये रोज नवीन अडचणी विद्यार्थ्यांसमोर येत आहेत. वेगवेगळ्या कारणाने अडथळे आलेल्या अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकात पाचव्यांदा बदल करण्यात आला आहे. आता सुधारित वेळापत्रकानुसार थेट २६ जूनला महाविद्यालयनिहाय विद्यार्थी वाटप गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.
१२ ते १४ जूनपर्यंत दोन दिवस कोटा प्रवेश होणार असून २७ जूनपासून प्रवेशाची पहिली फेरी सुरू होणार आहे. अकरावी प्रवेशामध्ये पहिल्या दिवसापासून प्रवेशाचे संकेतस्थळ कोलमडले आहे. प्रवेश नोंदणीच्या शेवटच्या दिवशीही संकेतस्थळावर अडचणी आल्या होत्या. त्यामुळे अनेकदा प्रवेशाचे वेळापत्रकही बदलण्यात येत आहे. प्रवेश वेळापत्रकात वारंवार बदल होत असल्याने विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नवीन वेळापत्रकानुसार ७ ते ९ जून- प्राथमिक यादीवर आक्षेप व तक्रारी घेणे व निराकरण केले जाईल. ११ जून रोजी निवडलेल्या महाविद्यालयांची अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होईल. १२ ते १४ जून रोजी अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्याचे प्रवेश असतील.१७ जून रोजी गुणवत्ता यादीच्या आधारे विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळांची निवड प्रक्रिया व विभागीय समितीद्वारे परीक्षण होईल.२६ जून रोजी प्रवेश फेरीसाठी उच्च माध्यमिक विद्यालयनिहाय विद्यार्थी वाटप यादी जाहीर होणार आहे.२७ जून ते ३ जुलै पर्यंत पहिल्या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात कागदपत्रांची पडताळणी व प्रवेश होईल.५ जुलै रोजी फेरी क्रमांक २ साठी रिक्त जागांची यादी जाहीर होणार आहे.