Wednesday, June 11, 2025

रोज मरे त्याला कोण...

रोज मरे त्याला कोण...

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर


मुंबईच्या विस्तारीत पूर्व उपनगरातील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या भीषण दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले. या घटनेने सारी मुंबई हादरली. मुंबईची रेल्वे उपनगरी सेवा म्हणजेच लोकल ही या महानगराची लाइफलाइन आहे. दोन कोटी लोकसंख्येच्या महामुंबईची जनवाहिनी आहे. सर्वात स्वस्त आणि सर्वात जलद अशी ही रेल्वे सेवा आहे. म्हणूनच चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी)पासून विरार-पालघर-डहाणू, कसारा-कर्जत, पनवेल अशी धावणारी लोकल सेवा ही मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे.


मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो-मोनो दाखल झाली, हार्बरच्या जोडीला ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बर आली. नऊ डब्यांचे बारा डबे झाले, आता अनेक गाड्यांना पंधरा डबे आहेत. दर चार ते पाच मिनिटांच्या अंतराने लोकल सेवा आहे. तरीही सर्व देशांतून मुंबईवर लोंढे आदळतच असल्याने वाढती लोकसंख्या व वाढत्या प्रवासी संख्येला उपनगरी रेल्वे सेवा अपुरी पडत आहे.


रोज खचाखच गर्दीतून रेल्वे प्रवास ही तर मुंबईकरांची मोठी परीक्षा असते. रोज धक्काबुक्कीतून लोकल डब्यात प्रवेश करणे आणि आपल्या स्टेशनवर कसे तरी प्लॅटफॉर्मवर उतरणे यासाठी रोज मुंबईकरांना मोठी कसरत करावी लागते. डब्यात चौथी सीट सोडाच पण नीट उभे राहायला मिळावे म्हणूनही देवाकडे प्रार्थना करावी लागते. आपले रोजचेच हाल सांगणार तरी कुणाला? मध्य, पश्चिम व हार्बर-ट्रान्स आणि हार्बर लोकलमधून रोज पंचाहत्तर लाख मुंबईकर प्रवास करतात. हे कोणी मजा म्हणून लोकलमधून फिरत नाहीत. कोणी हौस म्हणून गर्दीत घुसत नाही.


रोजंदारीसाठी, पोटापाण्यासाठी, व्यापार-व्यवसायासाठी, शाळा-कॉलेजसाठी ही गर्दी लोकलमधून जा-ये करीत असते. त्यात भाजीवाले, मच्छीवाले, फेरीवाले, कामगार- कारकुनांपासून ते टायवाले असतात. याच गर्दीत भजन करणारे नि पोथी वाचणारे असतात आणि मालाची आवक- जावक व शेअर्सचे भाव फोनवर विचारणारे असतात. बहुसंख्य प्रवासी बसायला सीट मिळाली नाही तरी उभे राहूनच मोबाईलवर चॅटिंग करीत असतात. लोकलच्या डब्यात हौशे-गवशे आणि नवशेही भरपूर असतात. त्यात विनातिकीटही बिनधास्त प्रवास करीत असतात.


पाकीटमार आणि मोबाईल चोरांचा वावर असतो. भिकारी, फेरीवाले, नशेडे आणि गर्दुल्लेही याच गर्दीत त्यांच्या धुंदीत असतात. डब्यात शिरायला जागा नाही किंवा येणाऱ्या स्टेशनवर उतरायचे म्हणून लोकलच्या दरवाजात लोक उभे असतात पण त्याचबरोबर काही गणेगंपे आणि रंगेल दरवाजात हातवारे करीत त्यांच्या मस्तीत उभे दिसतात. मुंबईचा लोकल कल्लोळ हा शब्दाने वर्णन करता येणार नाही पण या मुंबईकर प्रवाशांकडे रेल्वे प्रशासनाचे आणि राज्य व केंद्र सरकारने म्हणावे तसे लक्ष नाही... गर्दी व चेंगराचेंगरीतून लक्षावधी मुंबईकरांचा रोजचा प्रवास रामभरोसे चालू आहे. लोकलच्या अपघातात रोज सात ते आठ माणसे चिरडली जात आहेत किंवा गाडीखाली सापडून मृत्युमुखी पडत आहेत. काहींचे हात-पाय कायमचे निकामी होत आहेत, पण त्याची कधी चर्चाही होत नाही, कारण रोज मरे त्याला कोण रडे... असे मुंबईचे जीवन आहे.


युद्धात किती मृत्युमुखी पडले? प्रयागराजच्या महाकुंभमध्ये किती जणांनी अखेरचा श्वास घेतला? नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या चेंगराचेंगरीत किती जण ठार झाले? बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर लाखोंच्या अफाट गर्दीत नेमके किती घुसमटून मेले? कोविड काळात मुंबई, महाराष्ट्रात किती जणांचा मृत्यू झाला? अशा प्रश्नांचा भडीमार ऐकायला मिळाला. पण मुंबईच्या लोकल अपघातात रोज आणि दरवर्षी किती मृत्युमुखी पडतात किंवा गेल्या दहा वीस वर्षांत किती मरण पावले असा प्रश्न कोणी जाहीरपणे किंवा संसदेत विचारत नाही. कारण रोज मरे त्याला कोण रडे... अशीच भावना झाली आहे.


गेल्या वीस वर्षांत मुंबईत लोकल अपघातात ५२ हजार लोकांचा मृत्यू झाला तरीही केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या कोणत्याही सरकारला त्याचे गांभीर्य वाटत नाही का? मुंबईच्या उपनगरी रेल्वे अपघातात आणखी किती बळी जायला हवेत म्हणजे सरकार आणि रेल्वे प्रशासनाला त्याची गंभीर दखल घ्यावीशी वाटेल ?


मुंब्रा रेल्वे स्टेशनवरून सकाळी ९.३० च्या सुमारास म्हणजे ऐन गर्दीच्या वेळी दोन फास्ट लोकल धावत होत्या. एक लोकल कसाऱ्याहून मुंबईकडे तर दुसरी मुंबईहून कसाऱ्याकडे धावत होती. दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या बॅगा दोन्ही लोकल्सच्या प्रवाशांना घासल्या गेल्या, त्यातून तेरा जण धावत्या लोकलमधून खाली पडले व त्यात चौघांचा मृत्यू झाला. स्टेशनवर उभ्या असलेल्या प्रवाशांनी या घटनेचे केलेले व्हीडिओ शूटिंग व्हायरलही झाले म्हणून नेमके काय झाले हे समजले. या घटनेनंतर मुंबईतील लोकल अपघाताची रेल्वे मंत्रालयाला सुद्धा दखल घ्यावी लागली.


रेल्वे मंत्र्यांनी दिल्लीत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दरवाजात उभे असलेल्या प्रवाशांचा खाली पडून मृत्यू झाला म्हणून मुंबईतील लोकल्सना स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार, अशी घोषणा झाली. मुंबईत मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर एअर कंडिशन्ड लोकल्स धावत आहेत. त्यांना स्वयंचलित दरवाजे आहेत. मुंबईत मेट्रो-मोनो रेल्वे धावत आहेत त्यांनाही स्वयंचलित दरवाजे आहेत. आता विना वातानुकूलित म्हणजेच साध्या लोकल्सना स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार आहेत. पण त्याला आतापासूनच विरोध सुरू झाला आहे. एअर कंडिशन्डचे तिकीट परवडत नाही म्हणून लोकांचा ओढा साध्या लोकलकडे असतो.


एसी लोकल्सना मागणी चांगली आहे, त्याही गर्दीने भरलेल्या दिसतात. पण खचाखच गर्दी ही साध्या लोकल्सना असते. स्टेशनवर अवघ्या वीस सेकंद थांबणाऱ्या लोकलमध्ये हजारो लोकांची चढ-उतार शक्य आहे का, हा कळीचा मुद्दा आहे. लोकल्सला दरवाजे म्हणजे रोगापेक्षा औषध जालीम असे होऊ नये असे प्रवाशांना वाटते. पण लोकलसंबंधी निर्णय घेणारे कधी लोकलमधून प्रवास करीत नसतात, ते त्यांच्या एसी केबिनमधे बसून प्रवाशांची सुरक्षितता ठरवत असतात, त्यामुळे प्रवाशांच्या नेमक्या भावना रेल्वे प्रशासनाला कळत नाहीत. मुंबईत रेल्वे प्रवासी संघटना डझनभर तरी आहेत. त्यांच्याशी रेल्वे प्रशासनाचा संवाद कितपत आहे? प्रवासी संघटना निवेदने देतात पण त्याचे पुढे काय होते? प्रवासी संघटनांशी रेल्वे प्रशासन कितपत संवाद ठेवते? पत्र देऊन व निवेदने देऊन चर्चेला रेल्वे प्रशासन वेळ देत नाही ही प्रवासी संघटनांची तक्रार असते.


सीएसटीहून शेवटची लोकल पूर्वी रात्री १२.४५ वाजता सुटत असे, आता ती १२.१५ वाजता सुटते. यामुळे प्रवाशांची किती गैरसोय होते, याचा प्रशासनाने कधी विचार केलाय का? एसी लोकल्स वाढवून साध्या लोकल्स रद्द करण्यात येतात तेव्हा प्रवाशांमध्ये असंतोष प्रकट होतो, त्याची दखल प्रशासनाने कधी घेतली आहे का? विशेषत: मध्य रेल्वेच्या उपनगरी गाड्या कधीच वेळेवर धावत नाहीत, रोज त्या उशिरा धावतात व अनेक गाड्या रद्द होतात, हे दुष्टचक्र कधी थांबणार? मेट्रोच्या गाड्या मिनिटांवर धावतात मग टाइमटेबलनुसार मध्य रेल्वेच्या उपनगरी गाड्या का धावू शकत नाहीत? लांब पल्ल्याच्या गाड्या किंवा मेल-एक्स्प्रेसला प्राधान्य देण्यासाठी लोकल्स रखडवल्या जातात तेव्हा प्रवासी संतप्त होतात. राजधानी, शताब्दी, वंदेभारत, अमृत भारत यांना कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही, पण मुंबईच्या लोकल्स ट्रेनचे वेळापत्रक पाळले गेले पाहिजे हा प्रवाशांचा आग्रह असतो.


लोकलच्या प्रत्येक डब्यात विनातिकीट प्रवासी असतात. प्रथम श्रेणीच्या डब्यातही बिनधास्त परप्रांतीय व त्यांचा परिवार प्रवास करीत असतो. गर्दीच्या वेळी तर प्रत्येक डब्यात दहा-वीस विनातिकीट प्रवासी सीट बळकावून बसलेले असतात. अशा वेळी तिकीट तपासनीस कुठे असतात? चालत्या गाडीत तिकीट तपासनीसांना तिकिटे वा पास तपासण्याचा रेल्वेने अधिकार दिलेला आहे, असे फलक डब्यात दिसतात, मग टीसी का दिसत नाहीत? रेल्वे स्टेशनवर विनातिकीट प्रवेशच मिळणार नाही अशी यंत्रणा बसवली तर लोकल डब्यातील अनवॉन्टेड गर्दी कमी होऊ शकेल.


मुंबईच्या विस्तारीत उपगरात लोकसंख्या प्रचंड वाढली आहे, दादर, ठाणे, दिवा, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, कुर्ला, अंधेरी, बोरिवली, वसई-विरार, पालघर, नेरूळ, खारघर-पनवेल येथे लोकसंख्येबरोबर प्रवासी संख्या प्रचंड वाढली आहे, हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नियोजन केले पाहिजे. मुंबईत रेल्वे अपघातात चारजण ठार झाले म्हणून रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करणे हास्यापद आहे. सार्वजनिक जीवनात आज कोणी लालबहादूर शास्त्री नाहीत आणि अटलबिहारी वाजपेयीही नाहीत...


[email protected]
[email protected]

Comments

Dr Shweta Chitnis    June 11, 2025 01:28 AM

छान लेख

Add Comment