Wednesday, June 11, 2025

Rajasthan: पिकनिकसाठी गेलेल्या ८ जणांचा बुडून मृत्यू

Rajasthan: पिकनिकसाठी गेलेल्या ८ जणांचा बुडून मृत्यू

जयपूर : राजस्थानच्या जयपूरहून टोंकमध्ये पिकनिकसाठी आलेले ११ तरुण बनास नदीत अंघोळीसाठी उतरलेले असताना वाहून गेल्याची घटना घडली आहे. यापैकी ८ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्वजण बुडाले आहेत.सोमवारी (दि.१०)दुपारी १२ वाजण्याच्या सुमाराची ही घटना आहे. बनास नदीच्या एका जुन्या पुलापाशी हे तरुण पिकनिकसाठी आले होते.


स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व तरुण एकत्रच पाण्यात उतरले होते. परंतू, काही वेळातच पाण्याचा वेग वाढला आणि सर्वजण एकामागोमाग एक पाण्यात खेचले गेले. स्थानिकांनी आरडाओरडा करत पोलिसांना याची माहिती दिली. टोंक पोलीस आणि एसडीआरएफची टीम तिथे पोहोचली परंतू तोवर उशीर झाला होता. या तरुणांना शोधण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले. यावेळी ८ तरुणांचे मृतदेह सापडले आहेत.


या सर्वांना सआदत ह़ॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून डॉक्टरांनी या सर्व आठही जणांना मृत घोषित केले आहे. एसपींनी सांगितले की, तीन तरुण जिवंत आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सध्या मृतांची ओळख पटवली जात आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली जात आहे.गावकऱ्यांनुसार ज्या भागात ते उतरले होते तो खोलगट आहे. यामुळे अनेकजण तिथे बुडालेले आहेत. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने मृतांचे नातेवाईक, स्थानिक जमा झालेले आहेत. सर्वजण जयपूरचे असल्याचे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment