
नवी दिल्ली : पाकिस्तानने दहशतवादी हल्ल्याची आगळीक केल्यास आम्ही पाकिस्तानात घुसून मोठा हल्ला करू असा इशारा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिला आहे. जयशंकर सध्या युरोप दौऱ्यावर असून बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे जयशंकर यांनी हे वक्तव्य केलेय.
याप्रसंगी सुब्रमण्यम जयशंकर म्हणाले की, पाकिस्तान हजारो दहशतवाद्यांना उघडपणे प्रशिक्षण देतो आणि त्यांना भारतात हल्ले करण्यासाठी पाठवतो. भारत यापुढे हे अजिबात सहन करणार नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत एस जयशंकर यांनी पाकिस्तानला इशारा दिला की, जर त्यांनी एप्रिल महिन्यात केलेली क्रूर कृत्ये थांबवली नाहीत, तर त्यांना भारताकडून प्रत्युत्तराला सामोरे जावे लागेल. दहशतवादी पाकिस्तानच्या आत असतील, तर आम्ही पाकिस्तानच्या आत जाऊन हल्ला करू असा इशारा त्यांनी दिला.
पाकिस्तान हा असा देश आहे, जो दहशतवादाचा वापर साधन म्हणून करतो. पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्या नाही, तर निश्चितच पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान युद्ध होऊ शकते. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताची लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तानी हवाई दलाचे बरेच जास्त नुकसान झाले आहे. याच कारणामुळे पाकिस्तानला भारतासमोर युद्धविरामासाठी हात जोडावे लागले. राफेल विमानांनी केलेली कारवाई किती यशस्वी झाली, याचा पुरावा पाकिस्तानचे नष्ट झालेले हवाई तळ असल्याचे जयशंकर यांनी सांगितले.