
मुंबईची विस्तारीत उपनगरे असलेल्या दिवा-मुंब्रा दरम्यान खचाखच गर्दीने धावणाऱ्या लोकलमधील दरवाजात उभे असणारे काही प्रवासी खाली पडले आणि त्यातच काहींचे बळी गेले तर काही जखमी झाले. सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस. या दिवशी मुंबईतील उपनगरी रेल्वेगाड्या तुडुंब गर्दीला घेऊन धावत असतात. मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकाजवळ दोन लोकल गाड्यांतील दरवाजात उभे असलेले प्रवासी एकमेकांना घासले गेले, त्यातूनच काही जण खाली पडले व ही दुर्घटना घडली अशी माहिती सुरुवातीला पुढे आली. नेमके किती मृत्युमुखी पडले किंवा नेमके किती जखमी झाले याची माहितीसुद्धा धड मिळत नव्हती. मुंबईच्या उपनगरी रेल्वेतून रोज पंचाहत्तर लाखांहून अधिक प्रवास करतात.
एवढ्या संख्येने प्रवाशांना घेऊन धावणारी क्षमता जगात कुठेही नसावी. रात्रीचे चार तास सोडले तर सीएसटी-चर्चगेटपासून कर्जत, कसारा, खोपोली, पनवेल आणि विरार, पालघर, डहाणूपर्यंत लोकल्स धावत असतात. मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावरील उपनगरी सेवा ही तर मुंबईची जीवनवाहिनी आहे. आता मेट्रो, मोनो मुंबईकरांची अत्यावश्यक सेवा बनली आहे. लोकल्स आणि मेट्रो हा मुंबईकरांचा श्वास आहे. मग ही सेवा चोवीस तास तत्पर व कार्यरत ठेवणे हे जसे रेल्वेला आव्हान आहे तर रेल्वेचे कर्तव्यही आहे. याच महामुंबईतून देशाच्या खजिन्यात सर्वात जास्त महसूल जमा होतो. याच महानगरातून देशाला सर्वात जास्त जीएसटी मिळतोय. त्या बदल्यात रेल्वे मंत्रालय ७५ लाख मुंबईकरांचा रोजचा लोकल प्रवास सुखाचा व्हावा म्हणून काय सेवा सुविधा देते?
मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कळवा, डोंबिवली, कल्याण तसेच अंधेरी, वसई-विरार या स्थानकांवर नेहमीच गर्दीचा कहर असतो. सीएसटीवरून कर्जत, कसारा, खोपोली, पनवेलला जाणाऱ्या व येणाऱ्या लोकल्स तुडुंब गर्दीने नेहमीच भरलेल्या असतात. कोंडवाड्यात जशी जनावरे दावणीला असतात, त्याहीपेक्षा लोकलमधील प्रवाशांची अवस्था वाईट असते. मुंब्रा येथे कसाराहून सीएसटीकडे जाणारी व सीएसटीहून कसाराकडे जाणारी या लोकल जात असताना दरवाजात उभे राहून लटकून प्रवास करणारे एकमेकांना घासले गेले व त्यातले डझनभर खाली पडले असे सांगण्यात आले.
धावत्या लोकलमध्ये प्रवाशांना स्वत:चा तोलही सांभाळता आला नाही, जे खाली पडले त्यांना धरून किंवा खेचून पुन्हा डब्यात आणणे इतरांना शक्य झाले नाही. या अपघातात कुणी किती जखमी झाले, कोणाचे हात-पाय मोडले, कुणाला जीव गमवावा लागला याचा तपशील नंतर येईलच, पण गर्दीने भरलेल्या लोकलमधील प्रवासी एकमेकांना घासून खाली पडले ही बाब अतिशय गंभीर आहे. ही वेळ त्यांच्यावर का आली, त्याला जबाबदार कोण? याचे उत्तर कोणी देणार नाही. देशात जिकडे तिकडे वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होत आहे. वंदे भारत ट्रेनची क्रेझ वाढत आहे. पण मुंबईतील लोकल्समधून रोज प्रवास करणारे लाखो प्रवासी मात्र वाऱ्यावर सोडले आहेत. रोज पोटापाण्यासाठी व रोजगारासाठी लक्षावधी मुंबईकर गर्दीने भरलेल्या लोकल्समधून दोन-अडीच तास प्रवास करीत कामावर पोहोचत आहेत आणि त्याच गर्दीतून सायंकाळी-रात्री घरी परतत आहेत.
गर्दीचे दुष्टचक्र संपणार कधी? लोकल प्रवाशांना दिलासा कधी? लोकलमधून मुंबईकरांना कधी सुखाने प्रवास करायला मिळणार? सर्वसामान्य लोक कोणीही हौस म्हणून लोकलने प्रवास करीत नाहीत. स्वस्तात व जलद प्रवास करता येतो म्हणून लाखो लोक लोकल्स प्रवासाकडे आकर्षित होतात. गेल्या दोन वर्षांत एअर कंडिशन्ड लोकल्स धावू लागल्या आहेत. जशी त्यांची संख्या वाढत आहे तसे विना एसी लोकल्स कमी होत आहेत. मुंबईत एसी लोकल्स हव्या आहेत, त्याला मागणीही बरीच आहे. एसी लोकल्समधून प्रवास करणारा वर्गही मोठ्या संख्येने आहे. पण सर्वसाधारण लोकल परवडते म्हणून त्या लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांवर अन्याय होता कामा नये याची दक्षता रेल्वे प्रशासनाने घेतली पाहिजे.
गेल्या वीस वर्षांत मुंबईत झालेल्या रेल्वे अपघातात ५१,८०२ लोकांचा मृत्यू झाला. मुंबईत रेल्वे अपघातात रोज सात ते आठ लोक मरण पावतात. पण त्याची कुठे बातमीही प्रसिद्ध होत नाही. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी मुंबईच्या उपनगरी रेल्वेची अवस्था झाली आहे. सन २०२५ या नवीन वर्षात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत मुंबईत रेल्वे अपघातात ६६३ लोक ठार झाले. त्यातले २७२ जण लोकलमधून खाली पडून मरण पावले, तर ३९१ जण रेल्वे रूळ ओलांडताना मृत्युमुखी पडले. दोन लोकलमधील प्रवासी एकमेकांना घासून खाली पडून मरण पावले किंवा जखमी झाले, असे प्रथमच घडले असावे. आता तरी राज्य सरकार, केंद्र सरकार व रेल्वे प्रशासन यांचे डोळे उघडणार आहेत की नाही? मुंबईतील लोकल प्रवासावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही? प्रत्येक ट्रेनमध्ये प्रत्येक लोकलच्या डब्यात विनातिकीट अनेक प्रवासी असतात.
प्रथम श्रेणीच्या डब्यातही विनातिकीट लोकांची अगदी महिलांचीही बरीच गर्दी असते. आपल्याला तिकीट कोणी विचारायला येणार नाही याची त्यांना खात्री असते. विनातिकीट प्रवासी हे दैनंदिन पासधारकांना रोजची डोकेदुखी असते पण धावत्या लोकलमध्ये डब्यात येऊन तिकीट तपासणी जवळपास बंदच झाली आहे. मध्य व पश्चिम रेल्वेचे टीसी जातात कुठे हा पासधारकांना रोज प्रश्न पडलेला असतो. भिखारी, फेरीवाले, विक्रेते, डब्यात गलिच्छ फडकी मारून सफाई केल्याचा आव आणणाऱ्यांची गर्दी भरपूर असते.
हातात तान्हे बाळ घेऊन भीक मागणाऱ्यांची संख्याही बरीच आहे. हे सारे लोक स्टेशनात तरी कसे येतात, लोकलमध्ये कसे चढू शकतात? यांना रोखणारी, हटवणारी, व कारवाई करणारी यंत्रणा कुठे दिसत नाही. लोकलधील खचाखच गर्दीमध्ये पाकीटमार व मोबाईल चोरांच्याही टोळ्या सावज शोधत असतात. पण कुठे रेल्वे पोलिसांचा त्यांना धाक आहे असे कुठे दिसत नाही. मुंब्रा येथे गर्दीत तोल न सावरता आल्यामुळे डझनभर प्रवासी खाली पडले, ही गर्दी नियंत्रित होणार नसेल तर पुढेही असे अपघात होत राहतील. मुंबईची जीवनवाहिनी सुरक्षित राहिली पाहिजे याची जबाबदारी रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलिसांची आहे.