
नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतरत्न देण्याची मागणी
मुंबई : भारतीय चळवळीचे जनक, रविवारच्या सुट्टीचे निर्माते नारायण मेघाजी लोखंडे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारासाठी राज्य शासनाने शिफारस करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे, कनेरसर, जि.पुणे येथील सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १८४८ रोजी झाला व निधन ९ फेब्रुवारी १८९७ रोजी झाले. भारतातील कामगार चळवळीचे प्रणेते म्हणून लोखंडे यांना ओळखले जाते. भारतावर ब्रिटीशांचे राज्य असताना कामगार हितासाठी आयुष्यभर कार्यरत राहिले.

मुंबई : मुंबईत खाडी किनारच्या इमारतींच्या दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. रहिवासी भीतीच्या छायेखाली जीव मुठीत घेऊन दिवस काढत असल्याचे ...
भारतीय मिल व इतर कामगारांना आठवड्यातील सातही दिवस काम करायला लागायचे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी रविवारच्या सुट्टीचा प्रस्ताव ब्रिटीश सरकारसमोर सन १८८३ मध्ये ठेवला; परंतु ब्रिटीशांनी तो धुडकावला. आठवड्यातून एक दिवस देशसेवेसाठी व समाजसेवेसाठी कामगारांना मिळायला हवा; त्या दृष्टीने रविवारची सुट्टी मिळावी या मागणीसाठी नारायण मेघाजी लोखंडे यांनी संघर्ष केला; सात वर्षांच्या संघर्षानंतर दि.१० जून १८९० रोजी ब्रिटीश सरकारतर्फे गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलंड यांनी भारतात रविवार हा सुट्टीचा दिवस घोषित केला.मुंबईत १८९३ मध्ये हिंदू-मुसलमान दंगलीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ब्रिटीश सरकारने रावबहाद्दूर ही पदवी बहाल केली.
रविवारच्या सुट्टीस १० जून २०२५ रोजी १३५ वर्षे पूर्ण होत आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी देशातील कामगार चळवळीसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. रविवारच्या सुट्टीचे निर्माते म्हणून लोखंडे यांना ओळखले जाते. दि. ३ मे २००५ रोजी भारत सरकारने रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याचा आढावा घेऊन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या शुभहस्ते त्यांच्या पोस्ट तिकीटाचे अनावरण केले होते. भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना त्यांच्या अलौकिक कार्यामुळे भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने केंद्रसरकारकडे भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस करावी अशी मागणी टाव्हरे यांनी निवेदनात केली आहे.