Monday, June 9, 2025

मुंबईत अवकाळी पावसाचा सुक्या मासळीला फटका

मुंबईत अवकाळी पावसाचा सुक्या मासळीला फटका

कोळी महिला व्यावसायीकांची सरकारकडे आर्थिक मदत देण्याची मागणी


मुंबई : अवकाळी पावसाचा फटका सुकी मासळीलाही बसला आहे. कोळी महिला व्यावसायीकांचे नुकसान झाले असून, शासनाकडून त्यांना पीक विमा योजनेचे सहाय्य मिळावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री आणि सचिवांकडे केली असल्याची माहिती त्यांनी दिली.


प्रत्येक वर्षी मच्छीमारांकडून ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी सातत्याने केली जाते. या मागणीचा फक्त विचार केला जातो, परंतु कोळी महिलांना कसलेच आर्थिक सहाय्य दिले जात नाही.


हातावर पोट घेऊन जगणाऱ्या या कोळी महिलांना आपला उदरनिर्वाह स्वाभिमानाने करण्यासाठी शेतकरी बांधवांना मिळणाऱ्या पीक विमा योजनेचे अर्थ सहाय्य देण्याची मागणी केल्याची माहिती तांडेल यांनी दिली. सुकी मासळीचा व्यवसाय करणाऱ्या कोळी महिला बंदरातून मासळी विकत घेऊन ते त्यांच्या गावातील हद्दीत असलेल्या सामूहिक जागेत मासळी सुकविण्याचा काम करत असतात. कोळी महिलासुद्धा सुक्या मासळीची लागवड करतात.


सूर्याच्या प्रकाशावर या मासळींना सुकविण्याची नैसर्गिक प्रक्रिया असून, अवकाळी पावसामुळे ही लागवड नष्ट झाली, असे समितीचे कार्याध्यक्ष बर्नाड डिमेलो यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा