
मुंबई :'म्हाडाच्या आणि सिडको यांच्यावतीने जी नविन घरे बांधण्यात येतील त्यामध्ये ५ टक्के आरक्षण डबेवाला कामगार यांना द्यावे. यामुळे डबेवाला कामगाराला आपण काम करतो त्या रेल्वे लाईनवर त्याला घर मिळेल ते त्याच्या सोईचे असेल. ज्या प्रमाणे गिरणी कामगाराला सरकारने मदत करून मुंबईत १० लाखात घर दिले आहे. त्याच धर्तीवर मुंबई डबेवाला कामगार यांना मुंबईत १० लाखात घर द्यावे', अशी मुंबई डबेवाला कामगार संघटनेची मागणी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच घोषणा केली की महाराष्ट्र शासनाच्यावतीने डबेवाला कामगार यांना दिवे अंजूर ता.भिवंडी येथे घरे उपलब्द करून दिली जातील. दिवे अंजूर ता.भिवंडी येथील घरे डबेवाला कामगार यांना गैरसोईची असणार आहेत आणि त्या घरांची किंमत २५ लाख रूपये ठेवली आहे. ती किंमत डबेवाला कामगाराला न परवडणारी आहे. डबेवाला कामगार हा प्रामुख्याने एमएमआरडीएच्या परिक्षेत्रात रहातो.
जर महाराष्ट्र शासनाने डबेवाला कामगाराला दिवे अंजूर ता. भिवंडी येथे घर उपलब्ध करून दिले तर विरार, बोरीवली, अंधेरी येथील डबेवाला कामगार याला ते गैरसोईचे होणार आहे, आणि विरार येथे महाराष्ट्र शासनाने घर उपलब्ध करून दिले तर ठाणे, डोंबिवली, घाटकोपर येथील डबेवाला कामगारांना ते गैरसोईचे होणार आहे. त्यापेक्षा सरकारला आमची विनंती आहे. म्हाडाच्यावतीने जेथे नव्याने घरे बांधली जातील. त्यामध्ये ५ टक्के आरक्षण डबेवाला कामगारांना द्यावे. अशी मागणी डबेवाला कामगार संघटनेनेकेली आहे.