सातत्याने एकच गोष्ट खोट बोलत राहिलो की, तीच गोष्ट लोकांना खरी वाटू लागते. असेच तत्त्वज्ञान गोबेल्स या हिटलरच्या युद्ध विशारदाने वापरले होते. त्यामुळे हिटलरचा विजय झाला नाही, पण हिटलरच्या म्हणण्यात तथ्य आहे असे वाटू लागले. तीच गोष्ट राहुल गांघी यांची म्हणता येईल. राहुल यांना एकच गोष्ट वारंवार खोटे सांगण्याची सवय जडली आहे आणि प्रत्येक निवडणुकीत ते पराभूत होत जातात आणि तरीही भाजपावर आरोपांच्या फैरी झाडत जातात, पण त्यांचा काहीही उपयोग होत नाही उलट लोकांमध्ये हसू मात्र होते. राहुल यांनी ताज्या आरोपांमध्ये भाजपावर अत्यंत गंभीर आरोप केले आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की भाजपाने अलीकडच्या काही निवडणुकांत मोठा फ्रॉड केला आहे आणि त्याचा पर्दाफाश आपण करतो असा आव त्यांनी आणला आहे. पण निवडणूक आयोगाने परस्परच त्यांना चपराक दिली आणि त्यांचे आरोप किती खोटे आणि हास्यास्पद आहेत हे दाखवून दिले आहे. भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राहुल यांना उत्तर दिले आहे आणि तेही त्यांच्याच शैलीत. त्यांनी म्हटले आहे की राहुल यांनी ज्या आपल्या ताज्या लेखात आरोप केले आहेत ते त्यांच्या फेक नरेटिव्ह म्हणजे खोट्या कहाणीचा लेखाजोखा आहे. त्यातून त्यांची येणाऱ्या बिहार निवडणुकीत काँग्रेस आणि त्यांच्या साथीदार पक्षांना कशी निराशा येणार आहे त्याचे द्योतक आहे. त्यांनी राहुल यांच्या प्रत्येक फेक नरेटिव्हची चिरफाड केली असून त्यांच्या प्रत्येक मुद्याला उत्तर दिले आहे.
काँग्रेस निवडणुकीमागून निवडणुकीत पराभूत होत आहे आणि दरवेळेस काँग्रेस पक्ष त्यांना जबाबदार धरण्याऐवजी तिसऱ्याच कुणाला तरी जबाबदार धरत असतो. हे भारतातील जनतेने अनेकवेळा पाहिले आहे. पण जे पी नड्डा यांचे जाऊ द्या. ते तर प्रतिस्पर्धी आहेत, पण खुद्द निवडणूक आयोगाने राहुल यांच्या आरोपांना बेबुनियाद म्हटले आहे आणि आयोग तर कुणाचाच गुलाम नाही. त्यामुळे त्याचे म्हणणे राहुल मान्य करणार की नाही हे महत्त्वाचे आहे. राहुल गांधी यांनी भाजपावर जे आरोप केले होते ते मॅच फिक्सिंगचे त्या आरोपांचे खुद्द आयोगानेच खंडन केले आहे. त्यांचे म्हणणे तरी राहुल मान्य करणार की नाही की हाही विरोधकांचा म्हणजे काँग्रेस विरोधकांची खेळी आहे असे म्हणणार असा प्रश्न आहे. राहुल गांधी यांच्याकडे लोकांना देण्यासाठी काहीही आकर्षक कार्यक्रम नाही आणि घोषणाही नाही. त्यांच्याकडे लोकांना आपल्याकडे टिकवून ठेवण्यासाठी काहीही योजना नाहीत. काँग्रेसकडे पैसा नाही. नेत्यांकडे प्रचंड पैसा आहे पण पक्षाकडे एक रुपयाही नाही. पक्षाच्या कार्यक्रमाची बिले भागवण्यासाठीही त्यांच्याकडे पैसा नाही. अशा परिस्थितीत राहुल भाजपावर आरोप करतात म्हणजे त्यांच्या धाडसाची कमालच आहे. मतदारांनी तुम्हाला मान्य नाही असा निकाल दिल्यावर त्याची विल्हेवाट मॅच फिक्सिंग करण्याच्या आरोपावरून करणे याला निवडणूक आयोगाने जोरदार खडसावले आहे. एका राष्ट्रीय दैनिकात राहुल यांनी लिहीलेल्या लेखात आपले नेहमीचे आरोप केले आणि त्यावर आयोगाकडून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. भारतीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे की महाराष्ट्राच्या मतदार याद्यांवर केलेले आरोप हे पूर्णपणे चुकीचे तर आहेतच पण कायद्याच्या राजवटीचा अपमान करणारे आहेत. काँग्रेस पक्षाला दिलेल्या उत्तरात आयोगाने वारंवार यावर उत्तर दिले होते आणि हे दस्तऐवज अजूनही आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत असेही सांगितले आहे. पण राहुल यांना ते पाहायचे नाही आणि उगीच आरोप करत सुटायचे अशी सवय लागली आहे. शिवाय ते युवराज असल्याने त्यांना कुणीही पक्षात विचारू शकत नाहीत असा त्यांचा समज आहे. निवडणूक आयोगाशी तडजोड झाली आहे असा आरोप करणे म्हणजे लाखो आयोगाच्या कर्मचाऱ्यांना खोटे ठरवण्याचा हा प्रयत्न आहे अशा शब्दात राहुल यांना आयोगाने फटकारले आहे. राहुल यांच्या आरोपांना मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडे लोकांना देण्यासारखे काहीही नाही आणि त्यामुळे खोटे बोलून स्वतःला खोटी सहानुभूती करण्याचे त्यांचे हे प्रयत्न आहेत. राहुल यांचा हरियाणात आधी पराभव झाला. त्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आणि दरवेळी ते तीच तीच रेकॉर्ड वाजवत बसले आहेत त्यामुळे त्यांची आज जशी निवडणूक आयोगाने केली तशी गत बिहार विधानसभा निवडणुकीतही होणार आहे. पक्षाचे काम पाहावे, पक्षाला संजीवी द्यावी, पक्ष गतीमान पद्धतीने चालवाव तरच लोक काँग्रेसला मते देतील. पण ते सोडून राहुल केवळ भाजपावर खोटे आरोप करत बसले आहेत आणि त्याची परिणती त्यांच्या आणखी एका पराभवात होणार आहे हे निश्चित. राहुल यांचे हे फेक नरेटिव्ह सेट केल्याचे प्रकार पहिलेच नाहीत.
या अगोदरही राहुल यांनी हाच प्रकार केला होता आणि महाराष्ट्रात माती खाल्ली होती. कारण लोकांनीच त्यांना माती चारली होती. अजूनही राहुल हे नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या काळात वावरत आहेत त्यांच्या काळात एकमेकांना दुसऱ्यांची खोटी भीती दाखवून चालत होते आणि लोक काँग्रेसला मते देत. पण आज तशी स्थिती नाही. आज सारी माध्यमे जागृत झाली आहेत आणि समाजमाध्यमे कधी नव्हे ती आज प्रगत आहेत त्यामुळे कुणाचेही कितीही खोटे लोकांबरोबर समजते. राहुल यांना ते समजत नाही हीच काँग्रेसची शोकांतिका आहे. पण राहुल यांच्या आरोपांमध्ये यापेक्षाही जास्त गंभीर आहे ते म्हणजे त्यांनी मोदी यांच्यावर टीका करताना पाकिस्तानची भाषा बोलली आहे. ती खरोखरच निषेधार्ह आहे. तसेच आता महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींचा अपमान केला आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे. राहुल आपल्याकडे लोकशाही आहे म्हणून इतके बोलू शकतात आणि आरोप करू शकतात. तरीही मोदी सरकार विरोधकांचा आवाज दाबून टाकत आहे असा आरोप करण्यास राहुल मोकळे होतात. आता राहुल यांना आयोगानेच परस्परच तंबी दिल्याने त्यांची काही दिवस तरी बकबक शांत राहील अशी आशा आहे.