
महाराष्ट्रनामा: सुनील जावडेकर
हिंदू धर्म आणि अध्यात्म यांचे ज्येष्ठ विचारवंत, रामायण महाभारत यासारख्या सनातनी हिंदू धर्मग्रंथांचे व्यासंगी अभ्यासक आणि विश्लेषक तसेच भाष्यकार पंडित दाजी शास्त्री पणशीकर यांचे नुकतेच ठाणे येथील त्यांच्या मुक्कामी दुःखद निधन झाले. लौकिक अर्थाने जरी दाजी गेले असले तरी त्यांच्या दांडग्या व्यासंगाचा, अभ्यासाचा, अभ्यासू व्याख्यानांचा आणि सर्वसामान्य जनतेसाठी तसेच सर्वसामान्य जनतेला समजण्यासाठी क्लिष्ट असलेल्या संस्कृत भाषेतील अध्यात्मिक धार्मिक स्त्रोत श्लोक यांचा गूढ गर्भितार्थ स्वतःच्या सोप्या सुटसुटीत भाषेत सर्वसामान्यांना समजावून सांगणारे दाजी हे खऱ्या अर्थाने सामान्य माणसांसाठी पंडित आणि शास्त्रीच होते.
गोवा राज्यातील पेडणे या गावातील पणशीकर हे श्रीरवळनाथ भगवतीचे उपासक. वेदविद्या संगोपन व संवर्धन करणाऱ्या घराण्यात मुंबईत १ मे १९३४ रोजी दाजी यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण आणि शालेय शिक्षण हे मुंबईतील ठाकूरद्वार परिसरात झाले. प्रकृती अस्वास्थ्य त्यामुळे त्यांना पुढील शिक्षण पूर्ण करता आले नाही मात्र त्यानंतर धार्मिक आणि विशेषतः सनातन हिंदू धर्मातील रामायण, महाभारत, आद्य शंकराचार्यांची स्तोत्रे, संतसाहित्य यांचा सखोल अभ्यास त्यांनी केला. पेडण्यातील श्रीदेवीभगवती रवळनाथ पंचायनात पुराण सेवा पणशीकर घराण्याचे कर्तव्य होय.
वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे दाजींनी श्रीदेवीभगवती चरणी पुराण सेवा सुरू केल्यानंतरच त्यांना आपला जन्म व्याख्याने देण्यासाठी आहे असा बोध झाला. त्यामुळे दाजींनी व्याख्यान हे उपजीविकेचे माध्यम न समजता ते एक व्रत म्हणूनच केले. त्यामुळे लेखनापेक्षा व्याख्याने देण्यात दाजींना विशेष रस होता.
दाजींचे मूळ नाव नरहरी पणशीकर असे असले तरी प्रत्यक्षात ते साहित्यिक, सामाजिक आणि राजकीय वर्तुळात देखील दाजी पणशीकर या नावानेच अधिक ओळखले जात होते. मुंबईतील ठाकूरद्वार येथील रात्र शाळेत त्यांनी शिक्षण घेतले आणि त्यानंतर काही काळ ते पौरोहित्यामध्ये रमले. त्यानंतर त्यांनी रामायण महाभारत यामधील व्यक्तीरेखा सर्वसामान्य माणसांसमोर अधिक सुलभ मराठी भाषेत व्याख्यान यांच्या माध्यमातून उलगडून सांगण्यास सुरुवात केली. दाजी पणशीकर यांच्या या व्याख्यानांना महाराष्ट्राबरोबरच परदेशातील भारतीयांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. देश-विदेशात मिळून दाजींनी जवळपास अडीच हजारांहून अधिक व्याख्याने दिली. दाजींची ही व्याख्याने म्हणजे हिंदू धर्माच्या अभ्यासकांना एक मोठा प्रेरणास्त्रोत आहे. तसेच ज्यांना ज्यांना रामायण, महाभारत आणि त्याच्यातील व्यक्तिरेखा या व्यक्तिरेखांचा समग्रभ्यास अंतरंगाने समजून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी दाजींची व्याख्याने आणि त्याचबरोबर दाजींनी यावर लिहिलेली विपुल ग्रंथसंपदा ही खरोखरच हिंदू धर्मासाठी, हिंदू धर्म ग्रंथांच्या अभ्यासकांसाठी मार्गदर्शनाचा चिरंतन असा वैचारिक अमूल्य ठेवा आहे.
दाजी पणशीकरांची ग्रंथसंपदा
महाभारत एक सुडाचा प्रवास, कर्ण खरा कोण होता? कथामृतम, कणिकनिती, अपरिचित रामायण पाच भाग, स्त्रोत्रगंगा दोन भाग, त्याचप्रमाणे गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यावरील आदिशक्तीचा धन्योदगार अशा लोकप्रिय आणि गाजलेल्या ग्रंथसंपदेसह अनेक ग्रंथांच्या तीसहून अधिक आवृत्ती त्यांच्या प्रकाशित झाल्या आहे. सलग दोन दशके ते लेखन मालिकेच्या माध्यमातून पौराणिक हिंदू धर्मग्रंथांवर चिंतन, लेखन सातत्याने करत होते. अखंड सकारात्मक ऊर्जेचा अदृश्य स्त्रोत हा दाजी शास्त्रींच्या धमन्यांमधून रक्ताबरोबरच सातत्याने प्रवाहित होत असे. दाजींच्या मूळ स्वभावाचे हे वैशिष्ट म्हणावे लागेल की त्यांनी हा सकारात्मक ऊर्जेचा अखंड स्त्रोत हा सातत्याने त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये सातत्याने तेवत ठेवला. दाजींचे मूळ पणशीकर घराणेच हे स्वरस्वतीचा वरदहस्त प्राप्त करूनच आले आहे. पणजोबा पंडित वासुदेव शास्त्री पणशीकर हे तब्बल ५०वर्षांहून अधिक काळ निर्णय सागर प्रकाशनाचे प्रधान संपादक होते. संस्कृत आणि मराठी भाषेत मिळून शंभरहून अधिक स्वसंशोधित पुस्तके वासुदेवशास्त्री पणशीकरांनी प्रकाशित केली आहे आणि जगभर त्यांचा अभ्यास केला जातो. व्याकरणाचार्य विष्णुशास्त्री पणशीकर हे दाजींचे वडील मुंबईतील ठाकूरद्वार येथील काळाराम मंदिरात विष्णुशास्त्री वेदपाठ शाळा चालवत असत. दाजींचे वेदा अध्ययन येथेच झाले. अर्थात दाजींच्या आयुष्यामध्ये जी कलाटणी मिळाली ती विमांसा तीर्थ श्रीपादशास्त्री किंजवडेकर यांच्या माध्यमातून. नात्याने श्रीपादशास्त्री हे दाजींचे मामा होते मात्र त्याचबरोबर ते दाजींचे गुरू देखील होते. त्यांच्या घरीच राहून दाजींनी शिक्षणाचे धडे घेतले. दाजी नेहमी असं म्हणायचे की नानांनी मला काही शिकवले नाही, मात्र माझ्यातील अहंकार नष्ट करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले आणि हेच सर्वात महत्त्वाचे आहे.
रामायण, महाभारत, आद्य शंकराचार्य कृत संस्कृत स्तोत्रांचे मराठीतून विश्लेषण, संत साहित्याचा समग्र व्यासंग आणि त्याचबरोबर समाजाला सातत्याने नवनवीन देत राहण्याची उपजत आणि अनोखी उर्मी हे दाजींच्या स्वभावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. दाजींना सातत्याने नाविन्याचा ध्यास असायचा. कोणताही नवीन उपक्रम असो किंवा कोणतीही नवीन योजना असो, कोणताही नवीन संकल्प असो तो दाजींकडे नेला की ते काम तडीस कसे जाईल आणि यशस्वी कसे होईल यासाठी दाजी त्या कामांमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून द्यायचे. ज्येष्ठ दिवंगत अभिनेते व दाजींचे मोठे बंधू प्रभाकरपंत पणशीकर यांच्या नाट्यसंपदा संस्थेचे दाजी हे प्रमुख व्यवस्थापक होते. त्यामुळे मराठी रंगभूमीशी आणि रंगकर्मींशी दाजींचा निकटचा संबंध आला.
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय तर होतेच. मात्र त्याचबरोबर शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे तसेच माजी कामगार मंत्री व अंबरनाथचे शिवसेनेचे आमदार स्वर्गीय साबिरभाई शेख यांच्याशी देखील दाजी यांचे स्नेहबंध घट्ट होते. त्यामुळेच सामाजिक कार्यात देखील दाजींचा सहभाग हा भल्याभल्यांना आश्चर्याचा धक्का देणारा ठरत असे. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांनी चांगल्या चांगल्या संस्थांची निर्मिती तर केलीच मात्र या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्य कशी सुरू राहतील आणि समाजाला विधायक कार्याची दिशा कशी मिळेल यासाठी देखील दाजींनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. गेल्या २८ एप्रिल रोजी देखील दाजींनी ठाण्यातील पाचपाखाडी येथील ज्ञानराज सभागृहात दोन तासांचे अखंड व्याख्यान दिले.
वयाची ९२ वर्षे गाठलेले मात्र मनाने आणि ऊर्जेने चिरतरुण राहिलेले दाजी पाण्याचा थेंबही तोंडात न पिता दोन तास अखंड व्याख्यान देतात हाच त्यांना सरस्वतीने दिलेला मोठा वरदहस्त म्हणावा लागेल. अगदी शुक्रवारी देखील ज्या दिवशी त्यांचे दुःखद निधन झाले त्या दिवशी सकाळी त्यांनी ग्रंथदूत या पुस्तकावर रवीप्रकाश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या लेखावर दाजींचे चिंतन सुरू होते. ग्रंथ प्रसारासाठी पडद्यामागून जी अनेक मंडळी अखंड परिश्रम घेत असतात त्यावर ग्रंथदूत हे पुस्तक प्रकाशित आहे. दाजींनी हा लेख वाचला आणि तत्काळ त्यांनी आपण सर्व ग्रंथदूतांचा एक मोठा सन्मान सोहळा आयोजित करून त्यामध्ये या ग्रंथदूतांचा सत्कार केला पाहिजे असे मत त्यांनी मांडले. केवळ मत मांडून ते शांत बसले नाहीत तर त्यांनी त्या दृष्टीने तयारी देखील सुरू केली होती. तथापि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.