मुंबई डॉट कॉम: - अल्पेश म्हात्रे
जसे आपण आपल्या पूर्वीच्या भागात पाहिले की, बेस्टपुढे अजूनही खूप समस्या आहेत. त्या एक एक निकालात काढण्याचा पूर्ण प्रयत्न मा. खासदार नारायण राणे करत आहेत. बस भाडेवाढ, अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत यावर जर मार्ग काढला मात्र खरी जर का आस असेल तर मा. नारायण राणे यांच्याकडून ती म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बेस्ट प्रशासनाचा कारभार संशयास्पद आहे. बेस्टचे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना त्यांची संपूर्ण देणी पाच ते सहा वर्षे बेस्ट प्रशासनाकडून दिली जात नाहीत. काही सेवानिवृत्त कर्मचारी न्यायालयाची पायरी चढतात व देणे देण्याबाबत न्यायालयाकडून दहा टक्के व्याजासहित देणे प्रदान करावीत असे आदेश घेऊन येतात त्यावेळी बेस्ट प्रशासन तातडीने दहा टक्के व्याजासहित देणे प्रदान करतात; परंतु जे कर्मचारी न्यायालयात जाऊ शकत नाही त्यांना व्याज तर सोडा त्यांची मूळ देणी ही पाच ते सहा वर्षे मिळत नाहीत. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर हालाखीचे जीवन जगत आहेत. त्यांना या वयात आजारपण, औषधे, मुलांची लग्नकार्य अनेक समस्या भेडसावत आहेत. तसेच जे कर्मचारी बेस्ट वसाहतीत राहतात त्यांना देणी न मिळाल्यामुळे ते घर खरेदी करू शकत नाही. वसाहतीतील गाळे खाली करू शकत नाहीत. वसाहतीत गाळे रिकामी करावी लागत असल्यामुळे त्यांच्याकडून तिप्पट भाडे वसूल करण्यात येते व वसाहतीतील गाळे खाली करण्यासाठी तगादा लावला जातो अशा प्रकारे या कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जात आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारे कुटुंब पेन्शन रुपये २०० ते ४०० तुटपुंजी आहे. सेवानिवृत्त कर्मचारी आयुष्यभर ताठ मानेने, स्वाभिमानाने बेस्ट उपक्रमाची सेवा करत जगला, उपक्रमाचा वटवृक्ष वाढवला पण सेवानिवृत्तीनंतर लज्जास्पदरीत्या जीवन जगत आहे, ही बेस्ट कर्मचाऱ्यांची शोकांतिका आहे. यावर बरेच काही लिहिता येईल, पण समस्या काही सुटणार नाहीत असो...
बेस्टमधील सर्व आगारांमध्ये समर्थ बेस्ट कामगार संघटनेच्या शिष्टमंडळांनी स्वच्छतागृहावर प्रसाधनगृह याची पाहणी केली असता असे आढळून आले आहे की, स्वच्छतागृहे अतिशय गलिच्छ व दुर्गंधीयुक्त अवस्थेत आहे. एकीकडे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबवत असताना या देशाची आर्थिक राजधानी म्हणून तिची मुख्य रक्तवाहिनी बेस्ट असून यातील कर्मचाऱ्यांचे प्रसाधनगृह, स्वच्छतागृह, बेस्ट कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आणत आहेत. यामुळे बहुसंख्य कर्मचारी आजाराला बळी पडत आहेत. यासाठी समर्थ बेस्ट कामगार संघटनेने वारंवार पत्रव्यवहार करून देखील प्रशासन जाणिवपूर्वक लक्ष देत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. यामुळे बेस्टचे आजी-माजी कर्मचारी अधिकारी या बेस्ट उपक्रमाला संकटातून बाहेर काढण्यासाठी माननीय नारायण राणे यांच्या साहेबांकडे आशेने पाहत आहेत. कामगारांच्या हृदयातील देव नारायण राणे हे आपल्याला या संकटातून बाहेर काढतील अशी आशा नसून किंबहुना त्यांना ठाम विश्वास आहे. तसं पाहायला गेलं तर आज बेस्ट ज्या परिस्थितीला आली आहे त्या परिस्थितीला जबाबदार तरी कोणाला धरणार? बेस्ट कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले व बेस्टचे नाव नावारूपाला आणले, त्यात त्यांचा तरी काय दोष? मग दोषी तरी कोणाला धरायचं? आजच्या बेस्टच्या अवस्थेला राजकारणीही तेवढेच जबाबदार आहे. राजकारण्यांना बेस्ट म्हणजे आतापर्यंत अंडे देणारी कोंबडी वाटत होती. त्यामुळे बेस्टचा हवा त्या पद्धतीने आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करून घेण्यात राजकारणी धन्य राहिले म्हणून आज ही वेळ बेस्टवर आली. त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकारीही तेवढेच बेस्टच्या आजच्या परिस्थितीला जबाबदार आहेत. ते प्रशासकीय अधिकारी हा आपणासच सारे कळते या दिमाखात त्या खुर्चीवर बसतो आणि मग पूर्वीच्या अधिकाऱ्यांचे निर्णय फिरव तसेच राजकारणाच्या हातचे बाहुले बन अशा पद्धतीने वागतात मग ते कोणालाच जुमानत नाहीत.
कोणताही सारासार विचार न करता महाव्यवस्थापक पदी बसले की आपण बोलू ती पूर्व दिशा असेच अधिकाऱ्यांना वाटते मग कोणत्या अधिकाऱ्याला वाटले आपण बस ताफा वाढवावा. त्याने बस ताफा वाढवला. कोणा अधिकाऱ्याला वाटले आपण बस ताफा कमी करावा त्याने नुकसान कमी होईल, त्यांनी बस कमी केल्या, कोणाला वाटले कर्मचारी जास्त आहेत, तर कोणाला काही वाटले अजून काही मात्र अशा मध्ये बेस्टच्या नुकसान फायद्याचा विचार कोणीच केला नाही. आता तेही खरंच आहे की बेस्टशी जिव्हाळ्याचे नाते असलेले आज जुने कर्मचारी सेवानिवृत्त झाले. तसेच मुंबईची खडान खडा माहिती असणारे अभ्यासू अधिकारीही बेस्टमध्ये नाही. त्यामुळे अशा अनुभवी अधिकारी व कर्मचाऱ्यांची आज कमतरता जाणवत आहे, मात्र कारणे काही असोत, राजकारण्यांनी त्यांचा खेळ खेळावा. अधिकाऱ्यांनी त्यांचा इगो बाजूला ठेवावा, मात्र आज सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित असल्याने बेस्टच्या बाबत कोणतीही तडजोड नको असे सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे. माननीय खासदार नारायण राणे यांनी आता बेस्ट वाचविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळे बेेस्ट तुला पूर्वीसारखे दिवस प्राप्त होतील यात कोणतीच शंका नाही.