
विशेष: मृणालिनी कुलकर्णी
समुद्र! पृथीवरील एक अनोखा खजिना! समुद्र सर्वांना नेहमीच आकर्षित करतो. किनाऱ्यालगतच्या वाळूतून, पाण्यातून चालताना येणाऱ्या लाटेचा स्पर्श, पायाखालची सरकणारी वाळू, लाटेबरोबर येणारे छोटे सागरी जीव, (आता कचरा) लांबवरून एकातएक मिसळून मोठी होत जाणारी लाट, कठड्यावर बसून दूरवर समुद्राच्या अनंताकडे पाहताना दिसणारे क्षितिज, क्षितिजावर उगवणारा सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी आकाशात फाकलेल्या रंगांच्या छटा, समुद्राची भरती, ओहोटी, कधी शांत, कधी रौद्र रूप! ही समुद्राची अगदी प्राथमिक रूपे पाहतानाही आश्चर्य वाटते. महासागराच्या अंतरंगातील खजिना हे तर जगातील आश्चर्य !
महासागर म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एक मोठा खाऱ्या पाण्याचा साठा. महासागर पृथ्वीचा ७१ टक्के भाग व्यापतो. खरा महासागर एकच; पारंपरिकपणे तो मोठ्या पाण्याच्या समूहामध्ये विभागला गेला. ते पाच महासागर! महासागरांत पृथ्वीच्या ९७ टक्के पाणी आहे. महासागर पृथ्वीच्या जलचक्राचा, अन्नामध्ये प्रोटीनचा प्राथमिक घटक असून अर्थकारणाचाही महत्त्वाचा घटक आहे. महासागर मानवी जीवनाच्या प्रत्येक भागावर प्रकाश टाकणारा जगातील सर्वांत मोठा चमत्कार आहे. महासागर गुंतागुंतीची प्रणाली असून तो हवामान नियंत्रित करण्यापासून ऑक्सिजन, अन्न, औषधापासून रोजगार देण्यापर्यंत आपणास आधार देतो. पृथ्वीवर ५० टक्के ऑक्सिजन महासागर निर्माण करतो. जो प्रामुख्याने सूक्ष्मजलचर वनस्पती शेवाल (फायटोप्लँक्टन)पासून मिळतो. त्यामुळे जागतिक तापमान वाढ कमी करण्यास मदत होते. महासागर पर्यावरण संतुलनासाठीही महत्त्वाची भूमिका बजावतो. महासागरातील प्रत्येक घटक मानवाला आधार देतो तरीही त्याच मानवाने महासागराची विपुलता कमी केली, खोली प्रदूषित केली, किनारे प्लास्टिकच्या कचऱ्याने अस्वच्छ केले, अति मासेमारीमुळे ज्याचा शोधही लागला नाही अशा अनेक परिसंस्था उद्ध्वस्त केल्या.
आज महासागर पुढील संकटाचा सामना करत आहे.
१) कचऱ्यासोबत दरवर्षी फेकले जाणारे प्लास्टिक समुद्र प्राण्यांना इजा पोहोचविते आणि अन्न साखळीतही मिसळते.
२) तापमान वाढीमुळे प्रवाळांच्या भिंतीचे नुकसान होते.
३) अतिमासेमारीमुळे काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
४) किनारपट्टीचा विकास, समुद्रात खोलवर उत्खननामुळे मॅन्ग्रोव्ह - समुद्री गवत या निवासस्थानांचा नाश होतो. हानिकारक मासेमारीच्या पद्धतीमुळे मत्स्य उत्पादनात घट.
५) महासागराचे अम्लीकरण, रासायनिक सांडपाणी, तेल तवंग; समुद्री जीवांना हानिकारक ठरतात.
६) समुद्र पातळी वाढीमुळे किनारपट्टीजवळचे शहर, गावे बुडण्याची समस्या.
१९८२ पासून कॅनडामध्ये महासागराच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय सागरासंबंधी विविध संस्था एकत्रितपणे काम करीत होत्या. इतर क्षेत्राच्या तुलनेने महासागराचे प्रश्न मागे पडत होते. १९९२ मध्ये रिओ दि जानेरो येथे झालेल्या पृथ्वी शिखर परिषदेत जागतिक महासागर दिनाचा प्रस्ताव मांडला गेला. २००८ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी अधिकृतपणे जागतिक महासागर दिनाला मान्यता देऊन “८ जून हा दिवस जागतिक महासागर दिन” म्हणून घोषित केला. हेतू हा जगभरातील महासागराविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. जा. म. दिनाचा मुख्य उद्देश -‘महासागराचे संरक्षण आणि संवर्धन करणे आणि जगभरातल्या लोकांमध्ये महासागराविषयी जागरूकता वाढविणे.’ यानिमित्ताने दरवर्षी महासागराला भेडसावणाऱ्या धोक्यांशी निगडित जागरूकतेसाठी वर्षभर काम करण्यासाठी एक विषय दिला जातो.
२०२५ ची थीम : “आश्चर्य : जे आपल्याला टिकवून ठेवते ते टिकविणे.” ही आहे. समुद्राच्या आतील खजिना पाहून खरोखरच आपण आश्चर्यचकित होतो. आश्चर्य ही शोधाची जननी आहे. तसेच आश्चर्य हा वैज्ञानिक ज्ञानाचा पाया आहे. हेच आश्चर्य आपल्याला महासागराविषयी काम करायला भाग पाडेल. महासागरातील आश्चर्य टिकविणे
म्हणजेच त्याच्या संरक्षणाची गरज अधोरेखित केली आहे. महासागराचे भविष्य ठरविताना त्या आश्चर्याकडे दुर्लक्ष होता कामा नये.
१) महासागरांत कोट्यवधी प्रजातीचे अस्तित्व आहे. त्यापैकी अनेक अद्यापही शोधल्या गेल्या नाहीत. प्रवाळ भित्ती (कोरलरीफ) ज्या समुद्रातील ‘पावसाळी जंगल’ म्हणून ओळखल्या जातात. त्या समुद्राच्या तळाचा केवळ १% भाग व्यापतात. तेथे सुमारे २५% समुद्री जीव राहतात. ही परिसंस्था अत्यंत नाजूक असून अतिशय समृद्ध असून किनारपट्टी संरक्षण, पर्यटन आणि मासेमारीसाठी महत्त्वपूर्ण आहे.
२) मॅारिशस भोवतालचा समुद्र प्रवाळ खडकांनी (कोरल रीफ) व्यापला आहे. हे कोरल रीफ जगातील सर्वात श्रीमंत सागरी खजिन्यांपैकी एक आहे. ते जगभरात अन्न आणि औषधांच्या स्रोतांसाठी प्रसिद्ध.
३) ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रीफ - मानवेतर प्राण्यांनी निर्माण केलेली विलक्षण पर्जन्यवन टेकडी. प्रवाळातील जीवांची जगातील सर्वात मोठी परिसंस्था. जैवविविधतेचा खजिना असलेले सगळ्यांत मोठे प्रवाळ बेट. येथील नैसर्गिक सौंदर्यामुळे स्कुबा डायव्हिंग हा पर्यंटन उद्योग लोकप्रिय.
जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महासागर खूप महत्त्वाचा आहे. मासेमारी, जहाज वाहतूक, पर्यटन आणि नूतनीकरण ऊर्जा यांसारख्या उद्योगांना तो आधार देतो. ॲागनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन ॲड डेव्हलपमेंटच्या मते महासागरावर आधारित अर्थ व्यवस्था २०३० पर्यंत ३ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. विशेषत: विकसनशील देशांतील किनारपट्टी भागातील लोक महासागरावर उपजीविकेसाठी अवलंबून आहेत. मासेमारी ३ अब्जांहून अधिक लोकांचे प्राथमिक प्रोटीनस्रोत आहे. जागतिक व्यापाराच्या सुमारे ९०% वाहतूक समुद्रमार्गे होते. समुद्र पर्यटन : जसे की क्रुझ ट्रिप, समुद्रातील खेळ. किनारपट्टीवरील हॉटेल्स अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना देतात.
महासागराच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी पुढील कृतीवर भर देऊ शकतो.
१) जैवविविधता जपण्यासाठी आणि परिसंस्था पुनरुजीवित करण्यासाठी समुद्री संरक्षित क्षेत्र वाढविणे.
२) कार्बन उत्सर्जन कमी करणे. नवीकरणीय ऊर्जा व शाश्वत वाहतूक वापरून महासागरातील दुष्परिणाम कमी करता येतील.
३) नवीन पर्यावरणपूरक तंत्रज्ञान प्रोत्साहित करणे. उदा. प्लास्टिकला पर्याय असलेल्या वस्तू, समुद्र कचरा संकलन प्रणाली.
४) मॅन्ग्रोव्ह व दलदलीचा भाग किनाऱ्याचे नैसर्गिकरीत्या संरक्षण करतात आणि कार्बन साठवितात. म्हणून किनारी परिसंस्थांचे पुनर्जीवन करावे.
मुले आणि तरुण पिढी महासागराच्या भविष्याची शिल्पकार आहेत. शिक्षण संस्थांनी ‘महासागर साक्षरता’ अभ्यासक्रमांत समाविष्ट करावी. महासागराची भूमिका समजल्यावर त्यांना जपण्याची जबाबदारीही समजेल. माणसांनी निर्माण केलेल्या समस्यांवर खरा उपाय मला वाटतो तो समुद्राला समजून घेणे. त्यासाठी समुद्रांना भेटी देणं. सातत्याने याविषयावर कार्यक्रम होणे आवश्यक आहे. नॅशनल जिओग्राफी पाहताना समुद्रांना अंतरंगाचे कुतूहल वाढते. टायटन सारख्या मोठ्या बोटी महासागरात गडप होतात. हे वाचताना त्या महासागराची खोली, व्याप्तीचे आश्चर्य वाटते.
जा. म. दिन म्हणजे ज्ञान मिळविण्याची, जबाबदारी स्वीकारण्याची, पर्यावरणपूरक शैली अंगीकारण्याची एक संधी आहे. आपण महासागराचे संरक्षण केल्यास हवामान बदलाशी तोंड देऊ शकतो. प्लास्टिकला दूर करा. या आपल्या छोट्या छोट्या कृतीच भविष्यात मोठा बदल आणू शकतात. शेवटी महासागराच्या अंतरंगातील आश्चर्य टिकवा आणि अभ्यासा.