मृदुला घोडके:माजी मराठी वृत्त विभाग प्रमुख आकाशवाणी,नवी दिल्ली
आपल्या समाजात अजूनही स्त्री - पुरुष समानता पाळली जात नाही. बहुतेक सर्वच क्षेत्रात आजची स्त्री गगनभरारी घेत असली तरी ही समानता, महिला सक्षमीकरण, तळागाळापर्यंत रुजवण्यासाठी भगीरथ प्रयत्न आवश्यक आहेत. तिच्यात उपजतच असलेली, दुर्दम्य इच्छा शक्तीची, भक्कम आणि स्थिर स्त्री मात्र कुठे तरी हरवलेली आहे. ती शोधण्यात आपण मदत करणार ना?
अलीकडे काही दिवसांत, अनेक प्रसार माध्यमांवर गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे “हुंडा प्रथा आणि हुंडा बळी” यावर जोरदार चर्चा सुरू आहे. वैष्णवी हगवणे हिच्यावर तिचा पती आणि सासरच्या मंडळींनी केलेले अमानुष अत्याचार आणि त्यातून तिने केलेली आत्महत्या हे काही दुर्मीळ प्रकरण नाही. एका खासगी संघटनेच्या आकडेवारीनुसार, गेल्या दहा वर्षांत १ लाख ८७ हजार ८७९ महिला हुंडा बळी ठरल्या आहेत. २०१७ ते २०२१ दरम्यान आपल्या देशात ३५ हजार ४९३ हुंडा बळी नोंदवण्यात आले. म्हणजे दररोज सुमारे २० मुलींना हुंड्याच्या लालसेपोटी आपला जीव गमवावा लागतो. समाजासाठी हे किती लाजिरवाणे आहे. हुंडा देणं किंवा घेणं हा कायद्याने गुन्हा असूनही हुंडा बळी किंवा कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.
खरंतर हुंडा किंवा दहेज ही प्रथा भारतीय समाजातच नव्हे तर जगात अनेक देशांमध्ये ती मुळावलेली आहे. विविध संस्कृतींमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. दहेज हा उर्दू शब्द “जहेज” या शब्दाचा अपभ्रंश असून तो अरेबियन देशांमध्ये प्रचलित आहे. मध्ययुगीन काळात युरोपमध्ये विवाहाच्या वेळी भेटीचं आदानप्रदान करण्यात येई. पोर्तुगीज राजाने, आपली बहीण कॅथरीन हिचा विवाह इंग्लंडचा राजघराण्यातील चार्ल्स द्वितीय बरोबर केला. त्यावेळी मुंबई बंदर आंदण म्हणून दिलं होतं. भारतामध्ये ही प्रथा कशी सुरू झाली? अनेक इतिहासकार आणि समाजशास्त्रज्ञ यांच्या मते, आपला देश कृषीप्रधान असून आपली अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे. त्यामुळे इतर संपत्तीपेक्षा जमिनीची मालकी मोठ्या प्रमाणावर होती. आपल्या समाजात पितृसत्ताक कुटुंब पद्धती रूढ आहे. त्यामुळे मुलगी सासरी जाताना, जमिनीचे वाटे करणे कठीण असल्यामुळे मालमत्तेचा वाटा म्हणून सोनेनाणे, विविध भेटवस्तू, कृषी उत्पादनाचा वाटा तिला स्वेच्छेने देण्यात येत असे. त्याला स्त्री धन म्हणायचे (अजूनही म्हणतात) आणि त्यावर सासरच्या कुणाचाही हक्क नसे. अतिशय चांगल्या हेतूने आचरणात असलेल्या या प्रथेला मात्र कालांतराने विकृत वळण लागलं. त्यामागचा तर्क आणि विचार विस्मरणात गेला. किती विचित्र आहे ना, मुलीच्या सुरक्षिततेसाठी सुरू झालेल्या या प्रथेची परिणती आज छळ, अत्याचार, हत्या आणि आत्महत्येत होत आहे. सत्य कटू असते... पण कायद्यामध्ये तरतुदी असूनही आपल्या मुलींना सुरक्षा देण्यात, जपण्यात आपण अपयशी ठरलो आहोत हे खरं आहे. आजच्या सुधारलेल्या समाजात ही कुप्रथा संपायला हवी होती पण उलट ती वाढतच चालली आहे. त्याची काय कारणे असावीत?
आपल्या समाजात अजूनही स्त्री - पुरुष समानता पाळली जात नाही. बहुतेक सर्वच क्षेत्रात आजची स्त्री गगनभरारी घेत असली तरी ही समानता, महिला सक्षमीकरण, तळागाळापर्यंत रुजवण्यासाठी भगीरथ प्रयत्न आवश्यक आहेत. सामाजिक, आर्थिक सबलीकरणाचे नारे देण्यात येतात... बरीच जागरूकताही केली जाते... पण अनेक महिलांना याविषयीचे कायदे माहिती नाहीत किंवा माहिती असूनही त्यांचा लाभ घेण्याची हिंमत तिच्यामध्ये आलेली नाही.
मानसिकदृष्ट्या स्त्री अजूनही झुंज देत आहे. किंबहुना रोजच्या जीवनातील या तणावाबाबत ती बधिर होऊन जाते... कदाचित ते तिच्या अंगवळणी पडतं... पण त्यामुळे होणाऱ्या परिणामांची झळ तिला आणि तिच्या मुलांना, माता-पित्याला नक्कीच पोहोचते. आपला पुरुषप्रधान समाजही कसा आहे नाही?... एका स्त्रीने, मुलीने कसं वागायचं, हे तो वारंवार वेगवेगळ्या प्रकारे सांगत असतो. समाज आपल्याला सांगतो की स्त्रीने सुंदर असलं पाहिजे... गोरा रंग पाहिजे... आणि गोरं असलं तरी ते सौंदर्य साधं पाहिजे आणि हो... संस्कारी सुद्धा. घरात लहान थोर व्यक्तींची देखभाल, पालनपोषण, त्यांच्यावर संस्कार याचीही जबाबदारी स्त्रीची. आता हे सगळं करत असताना आपल्या तब्येतीकडे थोडं दुर्लक्ष झालं तर एवढंही जमत नाही का म्हणून ठपका स्त्रीवरच.
घरात आणि ऑफिसमधल्या ताणाचं पर्यवसान चिडचिडीत झालं तर ‘किती कटकट करतेस’ म्हणून बोळवण केली जाते. घरातील स्वयंपाकपाणी, मोठ्यांची काळजी, सासू-सासऱ्यांचे टोमणे, नवऱ्याची मर्जी, मुलांचा अभ्यास, त्यांच्या भवितव्याचा विचार, ऑफिसची कामं, विकत घेतलेल्या घराचे हप्ते भरण्यात मदत, त्यामुळे जमा-खर्चाचं बिघडलेले गणित, स्वतःच्या आई - वडिलांचा विचार, रात्री दमून भागून पलंगावर पाठ टेकल्या टेकल्या दुसऱ्या दिवशीच्या तयारीचे विचार... एक नाही अनेक आव्हानं. सतत स्वतःला सिद्ध करण्याची तारेवरची कसरत. या सगळ्यांचा परिणाम आपल्या मानसिक स्वास्थ्यावर होत आहे हे तिच्या लक्षातच येत नाही.
हुंड्यासाठी अत्याचार होत असलेली स्त्री तर पूर्णत: मोडून गेलेली असते. बऱ्याच जणी बदनामी, भीती आणि आधार न मिळाल्याने गप्प बसून सहन करत राहतात. प्रेम विवाह असेल तर कदाचित एक दिवस सगळं ठीक होईल अशी आशा बाळगतात. इकडे आई- वडीलही मुलीला एक जबाबदारी मानत असतात. समाजात आपली नाचक्की होईल आणि त्याचा परिणाम दुसऱ्या अपत्यांवर होईल अशी भीती त्यांनाही वाटत असते. त्यामुळे ‘थोडं सहन कर, अशा छोट्या छोट्या गोष्टी चालतच असतात’ अशी समजूत काढून मुलीला माघारी पाठवलं जातं. शिवाय दिलेल्या हुंड्यासाठी काढलेलं डोंगराएवढं कर्जही फेडायचं असतं. वैष्णवीच्या बाबतीत हेच घडलं. या प्रकरणात तिचे
आई - वडील तितकेच दोषी असावेत का?
जेव्हा एखाद्या स्त्रीवर अत्याचार होतो तेव्हा त्याचे घाव तिच्या मुलांना, माता-पित्याला सोसावे लागतात. समाजात मुलींना सुखी, आनंदी आणि सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्याला... समाजाला आपली मानसिकता बदलावी लागेल. मुलींना एक स्वतंत्र, समान व्यक्तिमत्त्व म्हणून वागवावं, जोपासावं लागेल. त्यांना सर्वच दृष्टीने सुशिक्षित बनवावं लागेल. दुर्दैवाने वैष्णवी हगवणे सारखे एखादे प्रकरण समोर आले तर हिंसा घडताना, ‘त्यांच्या घरातील बाब आहे’ असं म्हणून आपली सामाजिक जबाबदारी झटकून टाकता येणार नाही. नवरा आणि सासरच्या लोकांकडून होणारा शारीरिक, मानसिक, लैंगिक छळ सोसून, चेहऱ्यावरचं हसू कायम राखणारी, रात्रीच्या अंधारात अश्रूंनी आपली उशी भिजवणारी, स्वतःचा हुंदका दाबून ठेवून घरची इज्जत राखणारी, दुःख, वेदना, निराशा, असहायता याच्या अग्नीत आतल्या आत जळणारी... अशा अनेक वैष्णवी आपल्या अवतीभवती अजून आहेत. तिच्यात उपजतच असलेली, दुर्दम्य इच्छा शक्तीची, भक्कम आणि स्थिर स्त्री मात्र कुठेतरी हरवलेली आहे. ती शोधण्यात आपण मदत करणार ना?