
पाणी टंचाईला जबाबदार कोण; नागरिक संतप्त
मोखाडा : तालुक्यातील गाव पाड्यांमध्ये जानेवारी महिन्यापासून सुरू झालेली पाणी टंचाईची समस्या जुन महिन्याचे दहा दिवस व्हायला आलेले आहेत तरी सुद्धा थांबलेली नाही.सद्यस्थितीत तालुक्यातील जवळपास ३७ गाव पाड्यांना १२ टँकरद्वारे पाणी पुरवीले जात आहे. त्यातभर की काय अजुनही पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाऊस पडायला सुरुवात झालेली नाही. यामुळे विहीरीनी तळ गाठलेला असून मागील वर्षी टँकर बंद व्हायला जुलै महिन्याची एक तारीख उजाडली होती यंदाही जुलै महिन्याचा पहीला आठवडा उजाडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे वर्षानुवर्षे मोखाडाकरांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या पाणीटंचाईला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
अतिदुर्गम डोंगराळ भागात असलेल्या मोखाडा तालुक्यातील आदिवासींना दरवर्षीच पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाणीटंचाईची समस्या तोंड वर काढत असून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यत टँकर सुरू असतात. तालुक्यात खोच, पळसपाडा, मारुतीची वाडी, कारेगाव, मोहाडा अशी मोठ मोठी पाच धरणे उशाला असून कोरड मात्र कायम घशाला अशी परिस्थिती आहे. आजच्या घडीला तालुक्यातील ३७ गाव पाड्यात पाणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली असून १२ टँकरद्वारे टंचाईग्रस्त नागरिकांना पाणी पुरवले जात आहे. यामुळे प्रशासनाला देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे. या पाणीटंचाईच्या मरणयातनेतून आदिवासी बांधवांची सुटका झालेली नाही. गावातील पाणी टंचाईची समस्या दूर व्हावी यासाठी शासनाकडून लाखो रुपये खर्च करून तालुक्यात ५५ नळपाणी पुरवठा योजना मंजूर होऊन प्रगतीपथावर आहेत.
तर ठक्कर बाप्पा योजना, लघु पाटबंधारे, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बंधारे, विहीरी मधील गाळ काढणे, शेततळे, वन विभागाचे बंधारे, सिंचन विहीरी आदीसह सेवाभावी संस्थानी बांधलेल्या बंधारे या कामावर कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला मात्र याचा फायदा किती? याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. दरवर्षीच पाणी टंचाई निर्मुलनासाठी होणारा करोडो रुपयांचा खर्च वाया जात असून जानेवारी महिन्यापासून सुरू होणारी पाणीटंचाई यंदाही जुन महिन्याचे दहा दिवस व्हायला आलेले असताना ही सुरूच आहे.