Saturday, June 7, 2025

भिंत...

भिंत...

माेरपीस : पूजा काळे


कविता मानवी मनाचे प्रतिबिंब दर्शवितात. एखाद्या गोष्टीचा तळ गाठल्याने अंतर्मनाला जे उमगतं ते स्वच्छ पारदर्शक असतं, अन्यथा ठरवून लिहिता येण्यासारखं काही नसल्याने विषय भरकटतो. आज प्रवाहासोबत चालणाऱ्या मानवनिर्मित भिंतीना डावलून चालायचं नाही. त्यांनाही न्याय द्यायला हवा! क्वचित नियंत्रित पण डळमळलेली मनाची भिंत जमीनदोस्त होण्यापूर्वी क्षणात टेकू द्यायला हवा. सुरक्षिततेच्या दृष्टीने भिंतीच्या उपलब्धी निकालाची हमी देतीलही, पण इथं प्रत्येकाची दु:खाची जातकुळी वेगळी असल्याने दुःखाच्या रेषा छेदत जाणारी भिंत आतल्या आत घुसमट सहन करतेय. "एका छताखाली बहु दरवाजे... भिंती आड लपते दु:ख या थोर मानवाचे.


" प्रत्येक गोष्टीला स्वत:चे सौंदर्य असल्याने ते पाहण्याची नजर असावी लागते. कारण सद्यस्थितीत माणसांचे चेहरे, दिवसाउजेडी रात्रीच्या गूढ अंधाराचे भकास चित्र डोळ्यांसमोर उभे करतात. भिंतीपल्याड तिची आर्त हाक घुमत असताना, माझ्यातले सुप्त मन जागे होते, "भिंतींना आधार भरवशाचा, कोलमडण्यापूर्वी सावरण्याचा..." दोन देशांच्या, दोन धर्माच्या भिंतीपेक्षा कडेलोट करणाऱ्या मानवीय भिंती जास्त त्रासदायक असल्याने त्याच्या पलीकडे पाहायला हवं. एका कवितेनं मी आत्ममग्न झाले. आपण जगाच्यापुढे, कितीही गेलो तरी, अनामिक भिंत आपला पिच्छा सोडणार नाही..


नवनवीन अनुभव देणारा ट्रेनच्या प्रवासातला आजचा दिवसही तसाचं उत्साही. डब्यांच्या या चालत्या-बोलत्या विश्वात सुखदुःखाच्या सीमित रेषा पाहावयास मिळतात. संध्याकाळी परतताना भय्याकडून घेतलेल्या भेळेचा हा किस्सा...


भय्याकडून भेळ घेताना ती गुंडाळलेल्या कागदावर माझी नजर पडली. त्याला थांबवत म्हटलं... " ये भेळ बांधने के लिए तुझे कोई दुसरा कागद नही मिला क्या? काय झालं त्याला कळलं नव्हतं. माझ्या हिंदी भाषेने तो जास्तचं गोंधळात पडला आऽऽऽ वासून पाहत राहिला. अनामिक असलेली आणि बरोबर नावाच्या जागी फाटलेली मराठी कविता त्या कागदावर होती. मराठी साहित्य असं रद्दीत पाहिलं की दु:ख होतं मनाला, पार गलबलत. पेपरवरील कविता वाचल्या वाचल्या तिचा गर्भितार्थ समजू लागला. भिंत उजळू लागली. कवितेत प्रतिकात्मक रूपात वापरलेली भिंत म्हणजे ती आणि ती म्हणजे भिंत यातला वाच्यार्थ जाणवला. पुढे भावार्थ सोपा झाला समजायला. कवितेला भिंत हे शीर्षक देऊन मी स्वतः बाईच्या


आसपास असणाऱ्या तमाम भिंती चाचपडू लागले...
अनामिका कविता अशी होती...
भिंत! करत नाही कुठलाच विरोध तुमच्या मर्जीनुसार स्वत:ला सजवते,
तुमचं सुंदर घराचं देखणं स्वप्न भिंत तुमच्या सह मनात रुजवते...
भिंतीच्या गुळगुळीतपणावरून भिंतीच्या अंतरातल्या अनंत भेगा दिसत नाहीत  कुणाला वरून.
भिंत सोसते घाव, रूतणारे खिळे जेव्हा शिरतात आरपार...
नकोशी जळमटं अन् मृत तसवीरींवरचे प्रेम अपार..
अवचित तिचे पोपडे पडतात तेव्हा तात्पुरती डागडुजी अन् तसाच गिलावा...
टेकू लाऊन भिंत खचते सरताना मायेचा धरुन ठेवणारा ओलावा...
अवास्तवाचे ओझे खांद्यावर घेत अवजड भिंत काही उगाचंच खचत नाही...
ती आधार, हक्काची जागा आडोसाही. ती प्रेममाया, दिलासाही.
लक्षात ठेवा भिंत टिकून राहिली तरच उरतो कोनाडा. अन् कोनाड्यातच लागतो दिवा...


‘ती’च्या शोधार्थ निघालेली मी वळून माझ्यापाशीचं आले. म्हणजे एक स्त्री म्हणून समस्त स्त्रियांच्या भावना जवळपास सारख्याच होत्या. स्त्रीच्या जगण्याशी नितांत बांधिलकी जोपासणारी ही अतिउत्तम कविता. वाट्याला आलेलं दु:ख टाळता येणार नाही, ते सहन करता येण्यासाठी जगणं नित्य राखणही क्रमप्राप्त असल्याचं अमूल्य सूत्र मांडते. या भावकवितेत कवी कल्पनेला बहर येतो. कवितेत एकही अलंकार नाही, तरीही ती उजवी ठरते अगदी बाईच्या कर्तृत्वासारखी. शब्दांना भिंतीच्या कोंदणात बसवून हवे असलेले भाव अलवारपणे मांडत कविता पंख पसरते. तरलता आणून भावनांचे कल्लोळ उठवते. भिंतीसम स्त्रीत्वाच्या कंगोऱ्यांना हात घालत, विशिष्ट्य दालन उघडली जातात.


दया, माया, शांती, धीरोदत्त, लढाऊ, कर्तबगार, क्षमाशील स्त्रीतत्व अंगभूत रत्न लेखणीतून अवतरतात. भिंत प्रधान बाईला प्रसंगानुरूप लढण्याचं सामर्थ्य प्रदान करतात. त्यामुळे ही भावगर्भित कविता चौकटीतली न राहाता पाश ओलांडते. निर्व्याज मनाने उभी असलेली भिंत, घर स्वप्नातले मनात रुजवते. वरवर असलेल्या अंतरंगातल्या भेगा दिसत नाहीत कुणाला. सुखाच्या लिंपणामध्ये दुःखाची दुभंगलेली रेषा कळून येत नाही. मायेचा ओलावा धरून ठेवणारी भिंत म्हणजे ती घाव सोसते निमूटपणे. बाई काय किंवा भिंत काय!


कुठल्या जातीची, दगडाची, शेणकुडाची न राहाता, केवळ जोडण्याचं काम करते. त्यासम तिला म्हणजे भिंतीला बळ येते. चेहऱ्यावर भाव न दर्शवता, मायेच्या ओलाव्यात सगळी वेदना पुसून टाकते ती. ती आहे म्हणून चाललंय. जाता जाता बाईपणाच्या व्यथा भिंतीतून अधोरेखीत करत असताना ‘ती’चं असणं बरंच काही सांगून जातं. आई, ताई, माई, बायको, मुलगी नावाच्या बाळगुटी आयुष्याचा भाग असतात. हक्काचा आधार असलेला एक कोनाडा सोबतीला असल्याने तिथं कायमचं प्रेमाचं वास्तल्य पाहायला मिळतं, या वैशिष्ट्यांमुळे भिंतीपेक्षा ती निराळी नाहीच. अनामिका नावाने आलेली कविता उंची गाठते. एक भावोत्कट कविता जुन्याचं लव्याजम्यानिशी नव्या पेहरावात येताना आपल्या पसंतीस उतरते. संवेदना व्यक्त करताना, जगण्याचा आकांत सांगणं ही या कवितेची जमेची बाजू आहे. संकटात अभेद्य भिंत आणि घराला घरपण देणारी स्त्री कायमचं तटस्थ असल्याने तिच्यातल्या दृष्टीची, आपलेपणाच्या आंतरसंबंधाची अडगळ समृद्ध होताना दिसते.

Comments
Add Comment