
मुंबई - भारतीय संस्कृतीत विवाहित महिलांसाठी अनेक व्रतवैकल्यांची परंपरा आहे, परंतु काही व्रतं अशी असतात जी पतीच्या दीर्घायुष्याच्या प्रार्थनेसाठी विशेष मानली जातात. त्यातील एक म्हणजे वट सावित्री व्रत श्रद्धा, प्रेम आणि निष्ठेचं प्रतिक. हे व्रत दरवर्षी दोनदा साजरं केलं जातं. एक ज्येष्ठ अमावस्येला आणि दुसरं ज्येष्ठ पौर्णिमेला. विशेषतः महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि उत्तर भारतात हे व्रत मोठ्या श्रद्धेने साजरं केलं जातं.
२०२५ मध्ये वट पौर्णिमा कधी आहे?
वट पौर्णिमा २०२५ मध्ये १० जून रोजी साजरी केली जाईल. या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा तिथी सकाळी ११:३५ वाजता सुरू होईल आणि ती ११ जून दुपारी १:१३ वाजता संपेल. त्यामुळे व्रत १० जून रोजी पार पाडलं जाईल. ११ जूनला स्नान, दान आणि पारंपरिक कर्मकांड केलं जाईल.
पूजेसाठी योग्य वेळ (मुहूर्त)
वट वृक्ष पूजेचा मुहूर्त: सकाळी ८:५२ ते दुपारी २:०५ पर्यंत
स्नान व दानासाठी मुहूर्त: ११ जून रोजी पहाटे ४:०२ ते ४:४२
चंद्रोदय: संध्याकाळी ६:४५ वाजता
या दिवशी महिलांनी उपवास ठेवून विधीवत वटवृक्षाची पूजा करावी आणि आपल्या पतीच्या आरोग्यासाठी व दीर्घायुष्याच्या कामनेसाठी प्रार्थना करावी.
वट सावित्री व्रताचं धार्मिक आणि पौराणिक महत्त्व
वट पौर्णिमा व्रताचं मूळ सावित्री-सत्यवानाच्या पुराणकथेत आहे. सत्यवान हा राजपुत्र जंगलात लाकूड तोडताना बेशुद्ध पडतो, त्यावेळी त्याची पत्नी सावित्री त्याला वडाच्या झाडाखाली झोपवते आणि त्याला वाचवण्यासाठी यमराजाशी संघर्ष करते. तिच्या निष्ठा, प्रेम आणि समर्पणामुळे यमराज सत्यवानाचा प्राण परत करतो. ही कथा स्त्रीशक्ती, समर्पण आणि श्रद्धेचं प्रतिक आहे. म्हणूनच या दिवशी विवाहित महिला वटवृक्षाची पूजा करून सात प्रदक्षिणा घालतात. पूजा करताना त्या बांबूच्या पंख्याने झाडाला आणि नंतर आपल्या पतीला वारा घालतात.
बांबूच्या पंख्याचं खास महत्त्व
पूजेनंतर महिलांनी आपल्या पतीचे पाय धुऊन त्यांना बांबूच्या पंख्याने वारा घालावा, ही परंपरा सावित्रीच्या कृतीचं प्रतीक मानली जाते. पतीसाठी त्याग, सेवा आणि प्रेम दाखवणारी ही कृती विवाहित जीवनातल्या नात्याला अधिक बळकटी देते. या दिवशी बांबूचा पंखा वडाच्या झाडाला अर्पण करणं, नंतर पतीला पंखा लावणं आणि शेवटी तो दान करणं, हे सर्व व्रताच्या पूर्तीचं एक पवित्र रूप मानलं जातं.
वट पौर्णिमा एक प्रेमाची, श्रद्धेची आणि नात्याची गाठ
वट पौर्णिमा केवळ एक धार्मिक परंपरा नसून ती भारतीय स्त्रीच्या मानसिक शक्तीचा, नात्याच्या नाजूक पण मजबूत गाठीचा आणि भक्तीपूर्ण भावनेचा संगम आहे. या व्रतातील प्रत्येक कृती, उपवास, वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा, पतीसाठी प्रार्थना या सर्व गोष्टी एका आदर्श पतिव्रतेचं चित्र रेखाटतात.
१० जून २०२५ रोजी येणारी वट पौर्णिमा ही केवळ व्रत नव्हे, तर एका नात्याची जपणूक, एक परंपरेची आठवण आणि स्त्रीच्या श्रद्धेची अनुभूती आहे. या दिवशी नुसतं उपवास न करता, मनापासून भक्तीपूर्वक पूजा केल्यास त्या नात्यात प्रेम आणि समर्पण अधिक दृढ होतं.