
नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष
कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या पालिकेच्या मैदानातून पाण्याचा निचारा होत नसल्याने, मैदानाचा तलाव झाला आहे. यामुळे मैदानात चालण्यासाठी येणारे नागरिक, फेरफटका मारणारे ज्येष्ठ नागरिक आणि खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांनी मैदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. गेले कित्येक वर्ष पावसाळ्यात मैदानात पाणी साचते, तरी देखील पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
कांदिवली पूर्वेला हुतात्मा राजगुरु उड्डाण पुलाकडे जाणाऱ्या मार्गांवर महापालिकेचे अशोक नगर मैदान आहे. अशोक नगरमधील नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी आणि मुलांना खेळण्यासाठी एकमेव मैदान आहे. या मैदानाच्या दुरुस्तीसाठी आणि सुशोभीकरण करण्यासाठी पालिकेने तसेच म्हाडाने लाखो रुपये खर्च केले आहे. मैदानाला दोन प्रवेशद्वार असून बाजूला दोन सुरक्षा चौक्या आहेत.
तसेच मैदानात माती ऐवजी रॅबिट, खडीचे प्रमाण जास्त आहे. गेली कित्येक वर्ष पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही उपाययोजना पालिकेकडून करण्यात आलेली नाही, यामुळे पावसाळ्यात मैदानात पाणी साचून तलाव निर्माण होते. प्रवेशद्वारासह मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने, पावसाळा कालावधीत जवळपास चार महिने नागरिकांसह मुलांना मैदानात जाता येत नाही. नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील पालिकेने ठोस उपाययोजना केली नसल्याने, नागरिकांनी मैदानात जाणेच बंद केले आहे.
रस्त्यावर वाहने, पद पथावर अनधिकृत फेरीवाल्यांचे बस्तान असल्याने, जेष्ठ नागरिकांना विरंगुळा अथवा पाय मोकळे करण्यासाठी पालिकेचे एकमेव मैदान आहे. मात्र पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने आम्हा जेष्ठ नागरिकांनी घराबाहेर जाणे बंद केले आहे.
- विक्रम वंडेकर, ज्येष्ठ नागरिक