
डॉ. प्रा. वैशाली वाढे
ती सकाळ काहीशी वेगळीच होती. रविवार असल्यामुळे जवळपास सर्वांच्याच घरी चिकन, मटण आणि विविध मांसाहार असा ‘भारी बेत’ होता. त्यामुळे मी देखील हा ‘खास बेत’ आखण्यासाठी चिकन शॉपमध्ये ‘चिकन’ आणण्यास गेले होते. तिथे साधारण अर्धा तास तरी मला रांगेत उभे राहावे लागणार होते. त्यामुळे मी सावलीत थांबण्यासाठी कोंबड्या असलेल्या पिंजऱ्याजवळ गेले आणि तिथे पिंजऱ्यात एका कोपऱ्यात बसलेली ‘ती कोंबडी’ मला दिसली. तिचं अंग थरथरत होतं. तिची नजर माझ्याकडे एकटक पाहत होती. जणू तिला माझ्याशी शेवटचं काहीतरी बोलायचं होतं. तिला बघून मला कसंतरीच वाटलं आणि मग जणू काळच थांबला आणि त्या कोंबडीने माझ्याशी बोलायला सुरुवात केली.
ती म्हणाली... नमस्कार ताई! मी एक सामान्य कोंबडी! मला नाव नाही. तुमच्यासाठी आमची ओळख ‘चिकन नंबर १’, ‘पाखरू’ किंवा ‘किलो’. माझं एक बालपण होतं. माझी आई होती. आम्ही १७ भावंडं होतो. लहानपणी उन्हात रेंगाळणं, आईच्या पंखाखाली बसून ऊब घेणं आणि भातशेतीच्या टोकावर फडफडत उडणं हेच आमचं सुख होतं. पण लवकरच तिथून आम्हाला उचलून एका कोंबडीपालन केंद्रात बंदिस्त केलं गेलं. तिथे फक्त भिंती, गंध आणि जेवण म्हणून ताटात दिलं जाणारं रसायन मिश्रित अन्न होतं. सूर्य दिसायचा नाही. मातीचा गंध आम्ही विसरलो होतो आणि तरीही आशा होती की एक दिवस बाहेर जायचं आणि मोकळा श्वास घ्यायचा! पण ताई, आम्हांला काय माहीत होतं की ती आशा, खऱ्या अर्थाने ‘शेवटच्या श्वासाची वाट पाहत होती!’
पुढे ती मला म्हणाली की, आम्ही तुमच्यावर हल्ला करत नाहीत पण तरीही तुम्ही आमच्या मागे लागतात... कधी भाकरीसोबत, कधी बिर्याणीत, कधी हॉटेलमध्ये, तर कधी उत्सवात एक ‘मेन्यू’ म्हणून! ताई, तुमचं हे पोट इतकं निर्दयी का आहे? आमचंही एक जीवन असतं. आम्हालाही जगायचं असतं. अगदी तुमच्यासारखं! जर तुमचं एखादं मूल चुकून हरवलं, सापडलं नाही किंवा कुणीतरी त्याला मारलं तर तुमच्या आईच्या ओठांवर शब्दच उरणार नाहीत, तुमच्या पित्याच्या डोळ्यांत पाणीही राहणार नाही, त्याचं तर अख्खं काळीज फाटेल. मग ताई विचार करा की मी ज्या आईच्या पंखांखाली वाढले, तिला माझं मरण कळालं तर तिच्या मनाला किती वेदना होतील? माझा बाप… जो दर सकाळी कोंबडा होऊन आरवायचा, त्याने मला मोकळ्या आकाशात उडताना पाहायचं स्वप्न पाहिलं होतं. पण मी आज एका माणसाच्या थाळीमध्ये संपणार आहे. खरंतर मी जन्मले होते एका शेतकऱ्याच्या अंगणात चिवचिवाट करण्यासाठी, माझ्या पंखांनी आकाश गाठण्यासाठी आणि निसर्गाचा एक भाग म्हणून मोकळं जग पाहण्यासाठी! पण माझं आयुष्य सीमित केलं गेलं. आज जेव्हा मला मरणाची चाहूल लागली आहे तेव्हा ताई, तुला माझी एकच विनंती आहे की माझ्या मरणातून किमान तू तरी शिक!
मी तिचे हे बोलणे ऐकून अवाक् होत चालले होते. पुढे ती मला म्हणाली... ताई, आमच्या छोट्याशा जीवाला देवासाठी बळी दिला जातो. पण ज्याक्षणी तुम्ही आमचं डोकं देवळात छाटता, त्या क्षणी खरंतर आम्हा प्राण्यांचा फक्त श्वास थांबत नाही तर थांबतो तो विश्वास... देवावरचा, माणुसकीवरचा आणि तुमच्यावरचा! देवाला खरंच रक्त हवं असतं का? श्रीकृष्णाने गायींचं रक्षण केलं, बुद्धांनी अहिंसेचा उपदेश दिला आणि संत तुकारामांनी ‘जीवहिंसा’ टाळण्याचा संदेश दिला. मग ताई, हे कोणते देव आहेत, ज्यांना आम्हां प्राण्यांचा शिरच्छेद पाहून समाधान मिळतं? आमचा गळा कापणं आणि तो ‘नैवेद्य’ म्हणून देवासमोर ठेवणं हे कितपत योग्य आहे. श्रीमद्भगवद्गीतेत तर स्पष्ट म्हटलं आहे की, “अहिंसा परमो धर्मः”. मग मनुष्याला हे कधी कळणार?
त्या छोट्याशा निष्पाप जीवाचे माझ्याशी हे कळकळीचे बोलणे ऐकून मी निःशब्द झाले होते. ती निरागस कोंबडी मला पुढे म्हणाली की, ताई!...माझं आयुष्य आता संपतय! माझ्या शेवटच्या क्षणात मी तुझ्या डोळ्यांत पाहते आहे... जिथे अजूनही एक संवेदना शिल्लक आहे! ताई, निदान तू तरी त्या संवेदनांचं ऐक आणि शाकाहारी हो... कारण माझ्या किंवा कुठल्याही प्राण्याच्या मृत्यूवरचं अन्न हे पवित्र असूच शकत नाही. ताई, तुला शक्य असेल तर आमच्यावर दया दाखवं आणि भविष्यात एकही कोंबडी, बकरी, गाय किंवा प्राणी तुझ्या चवीसाठी मारला जाऊ नये याची काळजी घे!...
त्या निष्पाप जीवाचे हे बोलणे ऐकून मी सुन्न झाले. माझे डोळे पाणावले. ती कोंबडी अजून काही क्षण होती …आणि मग शांत झाली... कायमची!
ती गेली!... पण तिचा संदेश मनात रुतून बसला... तिच्या भावनांचा आदर करत आणि तिला व तिच्यासारख्या बळी गेलेल्या असंख्य प्राण्यांसाठी त्यांना श्रद्धांजली म्हणून मी कायमची शाकाहारी झाले!
प्रिय वाचक मित्र व मैत्रिणींनो, जेवण हे पवित्र असावं… पण रक्ताच्या थेंबांवर नव्हे! शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या त्या कोंबडीचा हा “शेवटचा संदेश”... आपल्या सर्वांसाठी!