
रात्री भडकलेल्या दंगलीचे पडसाद आंतरराष्ट्रीय सीमेजवळच्या मोरेह पर्यंत दिसून आले. हिंसा आणखी पसरू नये म्हणून सर्वत्र दंगल प्रभावीत सर्व भागांमध्ये संचारबंदी अर्थात कर्फ्यू लागू करण्यात आली आहे. संपूर्ण बिष्णुपुर जिल्ह्यातही संचारबंदी आहे. दंगल करणाऱ्यांनी अटकेतील पाच जणांच्या सुटकेची मागणी करत क्वाकीथेल आणि उरीपोक येथे रस्त्यांवर टायर आणि जुने फर्निचर जाळले. जमाव मोठा असल्याचा आणि वाढत असल्याचा अंदाज येताच सुरक्षा पथकाने हवेत गोळीबार केला. गर्दी हटत नसल्याचे बघून दंगल आटोक्यात आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट गोळ्यांचा वापर करण्याचा निर्णय झाला आणि जमावाच्या दिशेने गोळीबार करण्यात आला.
तेंगोपाल जिल्ह्यातील एका कुकी व्यक्तीच्या अटकेला विरोध करण्यासाठी स्थानिक मोरेहमध्ये रस्त्यांवर आले. पण सुरक्षा पथक घटनास्थळी तातडीने आल्यामुळे हिंसा टळली. आंदोलकांनी अटकेतील व्यक्तीच्या सुटकेची मागणी केली. यामुळे मोरेहमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. भाजपा खासदार लीशेंबा सनाजाओबा यांनी नागरिकांना शांत रहाण्याचे तसेच कायदा - सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.