Sunday, June 8, 2025

दंगल सुरू झाल्यामुळे मणिपूरच्या पाच जिल्ह्यांत पाच दिवस इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद

दंगल सुरू झाल्यामुळे मणिपूरच्या पाच जिल्ह्यांत पाच दिवस इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद
इंफाळ : राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयएने मैतेई ग्रुप आरंबाई टेंगोलच्या पाच जणांना अटक केली आहे. यातील एक स्थानिक स्वयंघोषीत कमांडर आहे. ही अटक होणार याचा अंदाज येताच मणिपूरच्या काही भागांमध्ये दंगल करायला सुरुवात झाली. पण सर्वत्र चोख बंदोबस्तामुळे आरोपींना पलायन करणे जमले नाही. अखेर रविवारी ८ जून २०२५ रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पाचही जणांना अटक करण्यात आली. या अटकेनंतर दंगल आणखी भडकली. दंगलीची तीव्रता वाढू नये म्हणून इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, थोबुल, बिशनपूर, काकचिंग या पाच जिल्ह्यांमध्ये पाच दिवस इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद करण्यात आले आहे.

रात्री भडकलेल्या दंगलीचे पडसाद आंतरराष्ट्रीय सीमेजवळच्या मोरेह पर्यंत दिसून आले. हिंसा आणखी पसरू नये म्हणून सर्वत्र दंगल प्रभावीत सर्व भागांमध्ये संचारबंदी अर्थात कर्फ्यू लागू करण्यात आली आहे. संपूर्ण बिष्णुपुर जिल्ह्यातही संचारबंदी आहे. दंगल करणाऱ्यांनी अटकेतील पाच जणांच्या सुटकेची मागणी करत क्वाकीथेल आणि उरीपोक येथे रस्त्यांवर टायर आणि जुने फर्निचर जाळले. जमाव मोठा असल्याचा आणि वाढत असल्याचा अंदाज येताच सुरक्षा पथकाने हवेत गोळीबार केला. गर्दी हटत नसल्याचे बघून दंगल आटोक्यात आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट गोळ्यांचा वापर करण्याचा निर्णय झाला आणि जमावाच्या दिशेने गोळीबार करण्यात आला.

तेंगोपाल जिल्ह्यातील एका कुकी व्यक्तीच्या अटकेला विरोध करण्यासाठी स्थानिक मोरेहमध्ये रस्त्यांवर आले. पण सुरक्षा पथक घटनास्थळी तातडीने आल्यामुळे हिंसा टळली. आंदोलकांनी अटकेतील व्यक्तीच्या सुटकेची मागणी केली. यामुळे मोरेहमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. भाजपा खासदार लीशेंबा सनाजाओबा यांनी नागरिकांना शांत रहाण्याचे तसेच कायदा - सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
Comments
Add Comment