
रात्री भडकलेल्या दंगलीचे पडसाद आंतरराष्ट्रीय सीमेजवळच्या मोरेह पर्यंत दिसून आले. हिंसा आणखी पसरू नये म्हणून सर्वत्र दंगल प्रभावीत सर्व भागांमध्ये संचारबंदी अर्थात कर्फ्यू लागू करण्यात आली आहे. संपूर्ण बिष्णुपुर जिल्ह्यातही संचारबंदी आहे. दंगल करणाऱ्यांनी अटकेतील पाच जणांच्या सुटकेची मागणी करत क्वाकीथेल आणि उरीपोक येथे रस्त्यांवर टायर आणि जुने फर्निचर जाळले. जमाव मोठा असल्याचा आणि वाढत असल्याचा अंदाज येताच सुरक्षा पथकाने हवेत गोळीबार केला. गर्दी हटत नसल्याचे बघून दंगल आटोक्यात आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट गोळ्यांचा वापर करण्याचा निर्णय झाला आणि जमावाच्या दिशेने गोळीबार करण्यात आला.
तेंगोपाल जिल्ह्यातील एका कुकी व्यक्तीच्या अटकेला विरोध करण्यासाठी स्थानिक मोरेहमध्ये रस्त्यांवर आले. पण सुरक्षा पथक घटनास्थळी तातडीने आल्यामुळे हिंसा टळली. आंदोलकांनी अटकेतील व्यक्तीच्या सुटकेची मागणी केली. यामुळे मोरेहमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. भाजपा खासदार लीशेंबा सनाजाओबा यांनी नागरिकांना शांत रहाण्याचे तसेच कायदा - सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
- मैतेईशी संबंधित पाच जणांना अट, अटकेचे कारण समजले नाही. अटकेवरुन हिंसाचार
- जमावाने केली हिंसा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड, अनेक ठिकाणी लुटालूट
- आंदोलकांनी राजधानीत विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आणि राजभवनाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर केला रास्तारोको.
- जमावावर लाठीमार, जमाव पांगवण्यासाठी सुरक्षा पथकांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
- बिष्णुपुर जिल्ह्यात संचारबंदी अर्थात कर्फ्यू. इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, थौबल आणि काकचिंग व्हॅली जिल्ह्यांमध्ये संचारबंदी अर्थात कर्फ्यू.
- इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, थोबुल, बिशनपूर, काकचिंग या पाच जिल्ह्यांमध्ये पाच दिवस इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद
- शांतता राखा आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करा; भाजपाच्या राज्यसभा खासदार लेशेम्बा सानाजाओबा यांचे आवाहन
- अटकेचा निषेध म्हणून देण्यात आली बंदची हाक
- बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित तीन दहशतवाद्यांना अटक, स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्त
- पुढील निर्णयापर्यंत मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटच सुरू राहणार. फेब्रुवारी २०२५ मध्ये मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या राजीनाम्यानंतर मणिपूरमध्ये कोणीही सरकार स्थापन केले नसल्यामुळे केंद्राने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आहे.