Sunday, June 8, 2025

बांधकामांचा सुकाळ अन् पाणीपुरवठा नियोजनाचा बट्ट्याबोळ

बांधकामांचा सुकाळ अन् पाणीपुरवठा नियोजनाचा बट्ट्याबोळ

आमदार संजय केळकर घेणार अधिकाऱ्यांची झाडाझडती


ठाणे :ठाण्यात एकीकडे पाण्याची कमतरता असताना दुसरीकडे नव्याने सुरू असलेल्या बांधकामांसाठी पाण्याची पळवा-पळवी सुरू आहे. पाणीपुरवठा नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला असून सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. तर वाढत्या बेकायदा बांधकामांचा मुद्दाही येत्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करून कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमांतर्गत आमदार संजय केळकर यांनी खोपट येथील भाजपा पक्ष कार्यालयात नागरिकांशी संवाद साधत नागरी समस्या ऐकून घेतल्या. पत्रकारांशी बोलताना केळकर यांनी ठाण्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत नाराजी व्यक्त केली. ३०-३५ बेकायदा बांधकामांची यादीच प्रशासनाला देण्यात आली असून त्यावर तक्रारदाराचे समाधान करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. न्यायालयाने कानउघाडणी केल्यावरच कारवाई केली जाते. येत्या अधिवेशनात याबाबत आवाज उठवून अशा बांधकामांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे केळकर यांनी सांगितले.


शहरात पाण्याची कमतरता असून आवश्यक तेथे बोअरही खणलेल्या नाहीत. अशावेळी बांधकामेही मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना बेसुमार पाणी पुरवठा केला जात आहे. याकरिता पाण्याची पळवा-पळवी करण्यात येत असल्याने अनेक भागात पाण्याची कमतरता भासत आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोसळले आहे.


सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा प्रश्न अधिवेशनात लावून धरल्याने राज्यातील सुमारे ५० हजार कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळाला. काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जाणीवपूर्वक लाभार्थ्यांना ऑर्डर देण्यात चालढकल होत असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला. अंबरनाथ नगरपालिकेतील ४७ लाभार्थ्यांच्या ऑर्डर काढण्यात येणार आहेत. इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ऑर्डर काढण्यासाठी मी पाठपुरावा करत आहे. ठाणे महापालिकेतील सफाई कामगारांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्वांना हा लाभ मिळेपर्यंत मी प्रयत्नशील राहीन, असे केळकर म्हणाले.

Comments
Add Comment