
महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांची मागणी
नाशिक : मुंबईला जाण्यासाठी दुहेरी टोल द्यावा लागत आहे. या दुहेरी टोलमधून एकच टोल घेण्यात यावा किंवा घोटी येथे घेतला जाणारा १४० रुपये टोल २५ रुपये करण्यात यावा. किंवा समृद्धी महामार्गावरील घोटी ते ठाण्यापर्यंतची टोलची रक्कम कमी करण्यात यावी अशी मागणी केंद्रिय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरतर्फे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी केली आहे. सदर पत्राची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आली आहे.
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे गुरुवार दि. ५ जुन २०२५ रोजी लोकार्पण झाले. इगतपुरी ते आमणे (ठाणे) असा हा ७६ किलोमीटरचा रस्ता आहे. समृध्दी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर अवघ्या ८ तासात पार करता येणार आहे. हा मार्ग जेएनपीटी बंदराला जोडला जाईल तसेच नव्याने होणाऱ्या वाढवण बंदराला हि जोडण्याची योजना आहे. यामुळे महाराष्ट्राच्या एकूण अर्थव्यवस्थेला आणि विशेष करून दळणवळण व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.
महाराष्ट्रामध्ये नाशिक हे वेगाने विकसित होणारे असे शहर आहे. समृध्दी महामार्गाने मुंबईला जाणे हे अवघ्या ३ तासात शक्य होणार आहे. नाशिकहून मोठ्या प्रमाणावर नाशवंत कृषीमाल व इतर उत्पादनांची निर्यात होत असते. या महामार्गामुळे कमी वेळात जेएनपीटी बंदराकडे माल वाहतूक होणार आहे. त्यामुळे वेळ आणि खर्चातील मोठी बचत सर्वांसाठी लाभदायक असणार आहे.
सध्या घोटी येथे टोल भरून जुन्या मार्गाने गोंदे ते वडपे पुढे जाता येते. ती टोलची रक्कम प्रवासी वाहनांसाठी १४० रुपये आहे. तर मालवाहतूक वाहनांसाठी ५०० हुन अधिक रक्कम द्यावी लागते. नवीन समृध्दी महामार्गाने गेल्यास टोलची ८० किलोमीटरसाठी २०० रुपये इतकी रक्कम आहे. तसेच मालवाहतूक वाहनांना ५०० रुपयांहून अधिक रक्कम द्यावी लागणार आहे. घोटी टोल नाका ते समृध्दी महामार्ग हे अंतर केवळ ३ -४ किलोमीटर असे आहे. त्यामुळे नाशिकहून समृद्धी मार्गे मुंबई अथवा जेपीटी येथे जायचे असेल तर डबल टोल टॅक्सचा भुर्दंड भरणे हे अन्यायकारक आहे.