
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाने पंजाब किंग्जला हरवून तब्बल १८ वर्षांनंतर आयपीएलचा चषक जिंकल्यावर सर्व देशात फटाके वाजले. मध्यरात्रीपर्यंत देशातील कोट्यवधी क्रिकेट प्रेमी टीव्हीच्या पडद्यावर प्रत्येक चेंडूनंतर काय होणार हे मोठ्या उत्सुकतेने पाहत होते. अगदी शेवटच्या षटकापर्यंत ही उत्सुकता कायम होती. केवळ बंगळूरुच नव्हे तर महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छ. संभाजीनगर, अहिल्यानगरमध्ये जल्लोष झाला. दिल्लीपासून गल्लीपर्यंत क्रिकेटप्रेमींनी विराटचा जयघोष केला. आदल्या रात्री विजय मिळवला व दुसऱ्याच दिवशी बंगळूरुमध्ये विजयी टीमच्या जंगी स्वागताचा सोहळा ठरविण्यात आला. बंगळूरुच्या विधानसौध ते चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक, विधानसौधमध्ये सत्कार आणि स्टेडियमवर हजारो लोकांच्या साक्षीने विजयी सोहळा असा कार्यक्रम ठरविण्यात आला. मुळातच हा कार्यक्रम घाईघाईने ठरवला गेला. इतक्या कमी वेळात त्याचे नियोजन, सुरक्षा व्यवस्था व विजयोत्सवाची तयारी शक्य होती काय? याचा रॉयल चॅलेंजर्स, कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन आणि राज्यात सत्तेवर असलेल्या सिद्धरामय्या सरकारनेही कोणताच गांभीर्याने विचार केला नसावा. आपल्या राज्याचा संघ १८ वर्षांनी आयपीएल जिंकला, त्याच्या विजयाचे श्रेय आपणच घेतले पाहिजे, तेही झटपट आणि लगेचच असा विचार त्यांनी केला असावा. कारण या संघातील विराट कोहलीसह अन्य खेळाडूंना लगेचच कुठे ना कुठे बाहेर जायचे होते...
चिन्नास्वामी स्टेडियम हे बंगळूरुच्या अतिशय गजबजलेल्या भागात आहे. स्टेडियमची प्रेक्षकांची क्षमता पस्तीस हजार आहे. विराटची विजयी टीम तिथे येण्यापूर्वीच स्टेडियममध्ये साठ-सत्तर हजार लोक घुसले होते आणि स्टेडियमबाहेर किमान तीन ते साडेतीन लाखांची खचाखच गर्दी होती. तीन-चार लाख लोकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी तेथे केवळ चौदाशे पोलीस होते. आपल्या विजयी टीमला बघण्यासाठी आलेल्या महाप्रचंड गर्दीला कोणालाही आवरणे शक्य झाले नाही. स्टेडियममध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट लोक घुसल्यामुळे स्टेडियमचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते, त्याचा परिणाम दरवाजे तोडून लोकांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला. मग दुसरे काय होणार... तुफान चेंगराचेंगरी, तुडवातुडवी... त्यात अकरा जणांचा बळी गेला आणि पन्नासहून अधिक जखमी झाले. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाच्या विजयोत्सवाला गालबोट लागले. विजयोत्सवाचे शोकांतिकेत रूपांतर झाले...
भारताने पाकिस्तानवर हवाई व क्षेपणास्त्रांचे हल्ले करून एका रात्रीत दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले, शंभर दहशतवादी यमसदनाला पाठवले. पाकिस्तानच्या हवाई तळांचे प्रचंड नुकसान झाले, शस्त्रसंधी झाल्यावर भाजपाने देशभर ऑपरेशन सिंदूर यात्रा काढल्या, विजयोत्सव साजरा केला पण कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. युद्धातील विजयानंतर, निवडणुकीच्या निकालानंतर किंवा खेळातही चषक जिंकल्यानंतर देशात-विदेशातही विजयी मिरवणुका निघतात. विजयीवीरांना प्रत्यक्ष बघायला मिळावे म्हणून विजयोत्सव पाहण्यासाठी हजारो-लाखो लोक जमतात पण नियोजन नसेल किंवा गर्दीला उन्माद चढला असेल, तर त्याच विजयाला गालबोट लागते अशीही अनेक उदाहरणे आहेत. याच वर्षी उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे कुंभमध्ये संगमात स्नान करण्यासाठी कोट्यवधी भाविक आले होते. पण २९ जानेवारी रोजी लाखोंच्या चेंगराचेंगरीत ४० जणांचा मृत्यू झाला व ६० जखमी झाले. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला व १५ जखमी झाले. यातले बहुतेक प्रयागराजला जाणारे होते. दि. ३ मे २०२५ रोजी गोव्यात देवीच्या उत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू झाला व १०० जखमी झाले. गर्दीवर नियंत्रण ठेवता न आल्याने या दुर्घटना घडल्या.
अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने १९७१ मध्ये वेस्ट इंडिजच्या विरोधात कसोटी मालिका प्रथमच जिंकली. भारतीय टीम मुंबईत आली तेव्हा तिच्या स्वागताला सांताक्रूझ विमानतळावर भल्या पहाटे हजारो लोक जमले होते. या टीमची खुल्या बसमधून मिरवणूक निघाली व रस्त्यावर दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या हजारो मुंबईकरांनी आपल्या विजयीवीरांवर पुष्पवृष्टी केली.
कपिल देवच्या नेतृत्वाखाली १९८३ मध्ये भारतीय संघाने वन डे विश्वचषक जिंकला. तेव्हा भारतीय टीमची मुंबईत विजयी मिरवणूक निघाली होती. सन २००७ मध्ये महेंद्र सिंग धोनीच्या नेतृवाखाली भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकला, त्यानंतरही मुंबई विमानतळावरून वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक निघाली होती. सन २०११ मध्ये टीम इंडियाने मुंबईतच विश्व चषक जिंकला तेव्हाही मुंबईत क्रिकेट प्रेमींनी मोठा उत्सव साजरा केला होता. सन २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने
टी-२० विश्वचषक जिंकून मुंबईत परतल्यावर याच शहरात मोठी विजयी मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीत तर चार-पाच लाख सहभागी झाले होते. मरिन डाइव्हवर एवढी गर्दी होती की नेहमी दहा मिनिटांचे अंतर कापण्यासाठी टीम इंडियाला चार तास लागले. गर्दीत धक्काबुक्कीत काहींना किरकोळ दुखापत झाली किंवा काहींची श्वास कोंडला त्यांना त्वरित वैद्यकीय उपचार मिळाले. लाखोंच्या गर्दीतही एक रुग्णवाहिका जात असताना लोक वाट करून देत होते, असे व्हीडिओ व्हायरल झाले होते. मुंबईत सुरळीतपणे पार पडले ते बंगळूरुला का जमले नाही? मुंबई पोलीस, मुंबई क्रिकेट असोसिएशन, राज्य सरकार, मुंबई महापालिका यांच्यात असलेला समन्वय हा महत्त्वाचा होता. मग बंगळूरुमधील अशा यंत्रणांमध्ये परस्पर सुसंवाद, समन्वय नव्हता की फाजिल आत्मविश्वास सरकार, पोलीस व प्रशासनाला नडला?
बंगळूरु पोलिसांनी चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी रॉयल चॅलेजर्स बंगळूरु, डीएनए इव्हेंट मॅनेजमेंट प्रा. लि. आणि कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन यांच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहेत. रॉयल चॅलेजर्सच्या चार व डीएनए इव्हेंट कंपनीच्या तीन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी तर बंगळूरुचे पोलीस कमिशनर बी. दयानंद व चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक (इंटेलिजन्स) हेमंत निंबाळकर यांची तत्काळ बदली केली आहे. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव के. गोविंदराज यांना पदावरून मुक्त केले आहे. बंगळूरु दुर्घटनेचा तपास सीआयडीकडे सोपवला असून न्यायालयीन चौकशीचे आदेश निघाले आहेत.
विराट कोहलीच्या टीमच्या विजयी मिरवणुकीला व स्टेडियममधील विजयोत्सवाला हजर राहण्यासाठी किती लोक येतील याचा अंदाज पोलिसांना बांधता आला नाही. चार लाख लोक जमले याची कुणी कल्पनाही केली नव्हती. हे सर्व लोक, तरुण मुले, विद्यार्थी घरी किंवा ऑफिसमध्ये सांगून सवरून किंवा सुट्टी रजा घेऊन आले होते का? आपले कामधंदे सोडून ही लाखोंची गर्दी आपल्या हिरोंना बघायला जमते याचा दुसरा अर्थ काय? हे सर्व कामधंदे, नोकरी, नसलेले लोक होते का? बंगळूरु हे देशातील मोठे आयटी सीटी आहे.
कॉर्पोरेट कंपन्यांची तिथे मोठी गर्दी आहे. मग या शहराला किमान शिस्त, नियोजन, सुरक्षितता काहीच नाही का? आयपीएल चषक जिंकल्यावर बंगळूरुला घाईघाईने विजयोत्सव साजरा करण्याचा निर्णय कुणाचा? विजयी मिरवणूक व स्टेडियममध्ये विजयोत्सव कुणी ठरवला? पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज कुणी केला? पोलिसांनी विजयोत्सवाला व मिरवणुकीला नकार दिला असताना त्यांच्यावर दबाव कोणी आणला? दि. ३ जून बुधवार ऐवजी ८ जून रविवारी विजयोत्सव साजरा करावा अशी सूचना पोलिसांनी केली असताना पुन्हा ३ जून (वर्किंग डे) चा हट्ट कोणाचा? स्टेडियमवर विजयोत्सवासाठी मोफत पास वेबसाईटवर मिळतील असे आवाहन कोणी केले? स्टेडियमबाहेर तीन-चार लाख लोकांची अनियंत्रित गर्दी असताना विधानसौधमध्ये सत्कार समारंभ कसा चालू होता? पोलिसांची संख्या, रुग्ण वाहिका, औषधोपचार, वाहतूक नियंत्रण, ही सारी इव्हेंट मॅनेजमेंट कुठे होती? उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यामार्फत आरसीबीचे पदाधिकारी पोलिसांवर दबाव आणत होते हे खरे काय?
विजयोत्सवासाठी वेळ अपुरा आहे, असे पोलीस सतत सांगत असताना त्यांची सूचना धुडकावण्याचे काम सरकारमधील कुणाचे? निलंबित पोलीस कमिशनर यांनीच विधानसौधमध्ये कार्यक्रम घेऊन नये असे म्हटले होते, पण मुख्यमंत्री कार्यालयातून त्यांच्यावर दबाव आणला गेला हे खरे काय? श्रेय घेण्यासाठी अतिघाईने विजयोत्सव आयोजित करायचा व शोकांतिका घडल्यावर पोलीस व प्रशासनातील वरिष्ठांचा बळी द्यायचा असा हा प्रकार आहे.
आयपीएल हे निव्वळ क्रिकेट नसून हा बिझनेस आहे हे काही लपून राहिलेले नाही. सर्वाधिक पैसे व सर्वाधिक टीआरपी हाच उद्देश आहे. टीमचे मालक खेळाडूंना पैसे देऊन विकत घेतात आणि मैदानात चिअर्स गर्ल्सही पैसे घेऊनच नाचतात. या सामन्यांचे प्रक्षेपण करताना टीव्ही चॅनेल्समधील टीआरपीची जीवघेणी स्पर्धा असते. टी- शर्टस, टोप्यांपासून ते व्यापारी जाहिरातींची कोट्यवधींची उलाढाल असते. आयपीए हा खेळ आहे अशी कागदोपत्री नोंद असल्याने त्याच्या उत्पन्नावर कोणताही सरकारी कर नाही. ताकदवान राजकारणी व बडेबडे उद्योगसमूह यांचा आयपीएलशी संबंध असल्याने बाहेर काय घडते, याविषयी त्यांना कोण जाब विचारणार?
[email protected]
[email protected]