
प्रतिनिधी: सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी आहे. छोट्या छोट्या लघू कर्जदारासाठी आरबीआयने सरलतेचे दरवाजे खुले केले आहेत कारणही तसेच आहे. आता सोनेतारण कर्जासाठी आरबीआय (RBI) ने साधे सोपे सुटसुटीत नियम केले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोने तारण कर्जासाठी लोन टू व्हॅल्यू (Loan to Value Ratio) गुणोत्तर ७५ टक्क्यांहून वाढवत ८५ टक्क्यांपर्यंत केले आहेत. २.५० लाख रुपयांच्या कर्ज स्तरावर हा निर्णय लागू होणार आहे.ही मर्यादा वाढविल्याने बाजारात कर्जदारांना अधिक रकमेचे कर्ज घेणे शक्य होणार आहे.
एकूण सुवर्ण तारण कर्जाच्या एकूण पारित रकमेच्या ८५ टक्के मूल्याचे कर्ज आता घेता येणार आहे. यामुळेच बाजारात कर्जदाराची क्रयशक्ती वाढून बाजारात तरलता (Liquidity )वाढणार आहे. रेपो दर कपातीचा निर्णय घेतल्यानंतर आरबीआय गव्हर्नर यांनी हा निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा लघू कर्ज पुरवठा करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्या, लघू बँका, विना बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) यांना होणार आहे. निश्चितच अल्प उत्पन्न धारकांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी या कर्जाचा उपभोग घेता येईल.
याशिवाय जर सोने खरेदीची पावती उपलब्ध नसेल तरी स्वयंघोषित मालकीची प्राप्ती असल्यास या कर्जाचा उपभोग ग्राहकांना घेता येणार आहे. एकूण मुद्दल व रक्कम यांचा एकत्रित विचार करून ही २.५ लाखांची कर्ज मर्यादा यानिर्णया अंतर्गत निश्चित केली गेली.त्यामुळे आरबीआयच्या सगळ्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हे वित्त संस्थाना क्रमप्राप्त आहे. विशेषतः या कर्जासाठी तुमची भूतकाळातील आर्थिक कर्जाची पार्श्वभूमी म्हणजेच क्रेडिट स्कोरची (Credit Score) अट या कर्जाला असणार नाही. याचा सर्वाधिक फायदा ग्रामीण व निमशहरी भागातील ग्राहकांना होणार आहे.
सोने तारण कर्ज पद्धतीतील त्रूटी दूर करण्यासाठी तसेच मुबलक कर्जाचा योग्य पुरवठा करण्यासाठी हा निर्णय बँकेकडून करण्यात आला. विशेषतः लघू कर्ज पुरवठा करणाऱ्या लघू संस्थाचे बहुतांश कर्ज वाटप सोने तारण पद्धतीतील कर्जावर अवलंबून असते.आता यामुळे १लाख सोने मूल्यांकनावर ७५ टक्याऐवजी ८५ टक्के कर्ज वाटप या नियमाअंतर्गत करण्यात येईल. केंद्रीय अर्थमंत्रालयाने आरबीआयला याची संकल्पना सांगितल्याप्रमाणे आरबीआयने हा निर्णय घेतला. वित्त सुलभता हा या निर्णयामागील उद्देश आहे.
याशिवाय या कर्जपद्धतीत जाचक अटी व कागदपत्रे नसतील. केवळ मूलभूत कागदपत्रे जसे की आधार कार्ड, मतदान कार्ड , केवायसी या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. किती कर्ज कर्जदारांना मिळू शकते याचे मूल्यांकन गेल्या ३० दिवसातील सोन्याच्या सरासरी किंमतीवर किंवा शेवटच्या किंमतीवर निश्चित करण्यात येणार आहे.