Saturday, June 7, 2025

आधुनिक सावित्रीची अवहेलना, …जबाबदार कोण ?

आधुनिक सावित्रीची अवहेलना, …जबाबदार कोण ?

आरती बनसोडे : मानसिक समुपदेशक, मुंबई 


एकीकडे आज महिला सर्व क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम उंची गाठत, आपले कुटुंब, छंद अणि व्यवसाय यांची सांगड घालत आयुष्याला नवीन दिशा देत आहेत. मुलगा आणि मुलगी हा लिंगभेद आता जवळपास नष्ट झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी मुलींना आपल्या घरातील लक्ष्मीचे स्थान देत आनंदाने मुलीचा जन्म साजरा केला जातो. असे कोणतेच काम किंवा क्षेत्र नाही जिथे महिला नाहीत.


पण तरी देखील आज समाजात महिलांना बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला की नाही यावर शंका उपस्थित झाली आहे. वैष्णवी हगवणेची संपूर्ण घटना अभ्यासली तर खरंच खूप विविध अंगी प्रश्न पडतात की अजूनही मुली, कुटुंब, आपला समाज बुरसटलेल्या विचारांनी ग्रस्त आहे. आज वैष्णवीची घटना मीडियामुळे जगासमोर आली; परंतु गावोगावी, खेड्यापाड्यात अनेक उच्चभ्रू घरांमध्ये अशा कितीतरी वैष्णवी असतील ज्या जगासमोर येत नसतील. जर आजच्या एकविसाव्या शतकातील आधुनिक, सुशिक्षित अणि स्वतंत्र विचारांच्या मुलींचा आपल्या पसंतीचा मुलगा शोधून, आई-वडिलांच्या संमतीने लग्न करून देखील हुंडाबळीसारख्या प्रथेला सामोरे जाऊन त्यांचा जीव जात असेल तर खरोखरच विचार करावा


लागेल की खरंच महिलांच्या बाबतीत समाज आणि कुटुंबाची विचारसरणी बदलली आहे का?
आज मुलगी स्वतः शिकली आहे, कमावती आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे. तिची स्वतःची स्वप्नं देखील ती पूर्ण करत आहे. असे असताना केवळ भौतिक वस्तूंसाठी आणि पैशासाठी तिचा एवढा अमानुषपणे सासरच्या मंडळींनी छळ करावा इतकी हतबल आजची मुलगी असू शकते यावर विश्वास बसत नाही; परंतु वैष्णवीची घटना आपल्याला आज देखील मुलींवर होणाऱ्या घरगुती हिंसेचा बळी जातोय हे सत्य स्वीकारायला भाग पाडते.


नक्की या घटनेसाठी जबाबदार कोणाला समजायचे?
ज्या सासरच्या लोकांनी ज्यात तिची नणंद आणि सासू दोघी महिला आहेत अणि तरी त्यांनी तिच्यावर छळ केला, तिच्यावर इतक्या जखमा करून तिचा जीव घेतला त्यांना की तिच्या आई-वडिलांना ज्यांना मुलीची सगळी स्थिती माहीत असून देखील त्यांनी आपल्या मुलीला खंभीरपणे साथ न देता ‘जा मुली दिल्या घरी सुखी राहा’ म्हणत तिच्या लालची सासरच्या मंडळींचे लाड पुरवत होते, मुलीचा संसार तुटू नये म्हणून चुकीच्या गोष्टींना दुजोरा देत होते त्यांना. मुलीच्या जीवापेक्षा संसार महत्त्वाचा असतो का हा प्रश्न येथे निर्माण होतो. केवळ आपल्या मुलीचा संसार वाचावा अणि समाजात अब्रू जाऊ नये म्हणून मुलीला हाल अणि त्रास भोगत तिथेच राहा म्हणणारे पालक अजून देखील आहेत.


याचा अर्थ मग समाजाला आपण दोषी ठरवायचे का कारण तिच्या आई-वडिलांनी समाजाचा विचार केला की वैष्णवीने जर नवऱ्याचे घर अणि सासरची मंडळी सोडली आणि ती आई-वडिलांकडे राहू लागली, तर समाज काय म्हणेल या भीतीपोटी तिला तिथून बाहेर पडायला साथ देत नव्हते. आपला समाज हा इतका मागासलेल्या विचारांचा आहे की एखाद्या मुलीला त्रास होत असेल तरीही तिने नवऱ्याच्या घरी राहावे आणि मुलीच्या आई-वडिलांनी देखील आपली मुलगी सासरचे घर सोडून आली तर समाज काय म्हणेल या भीतीने ते त्यांच्या मागण्या पुरवत मुलीला त्या नरकामध्ये यातना सोसायला सोडत ठेवावे.


म्हणजे आपला समाज आज २१ व्या शतकात देखील हाच विचार करतोय की मुलीने मानसिक आणि शारीरिक त्रास होत असेल तरी सासरी राहावे अणि त्रास सहन करावा आणि मुलगी एकदा लग्न करून गेली की तेच तिचे घर असते. मग मुलींना स्वातंत्र्य देऊन, मुलींनी सुशिक्षित होऊन, स्वतःच्या पायावर उभे राहून नक्की बदल काय झाला? खरोखर वैष्णवीच्या घटनेने आपली विचार करण्याची पद्धती समाजाने बदलण्याची गरज आहे हे दाखवून दिले आहे.


आज त्याच घरातली आणखी एक सून जिला आई- वडील अणि भावाने समजून घेतलं, तिला सपोर्ट केला, तिच्या पाठीशी खंबीर उभे राहिले आणि पोलिसांमध्ये तक्रार केली. आज वैष्णवीची मोठी जाऊ या छळाला बळी न पडता स्वतःसाठी लढली आणि समाजाचा विचार न करता कुटुंबाने साथ दिल्यामुळे ती यातून वाचली आणि आपल्यात जिवंत आहे. स्वतःचं पोट भरत आपले जीवन सुधारू शकते इतपत ती गंभीरपणे जगाला आणि समाजाला सामोरे जाऊ शकते हे तिने सिद्ध केले; परंतु त्याच घरातली दुसरी सून वैष्णवी जी स्वतः तिथून सुटका करण्यात असमर्थ ठरली आणि जिच्या आई-वडिलांनी तिला समजून न घेता तिच्या सासरच्या मंडळींचे लाड पुरवले. तिला स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास न देता त्यांच्या मागण्या केवळ मुलीचा संसार तुटू नये म्हणून पूर्ण करत राहिले अाणि शेवटी मुलीचा जीव गेला.


या एकाच घरातल्या दोन घटना दोन कुटुंबांच्या आणि आपल्या समाजाच्या दोन पैलू दर्शवत आहेत. पण मला असं वाटतं या सगळ्या घटनेला जास्त जबाबदार कोण असेल तर ती म्हणजे मुलगी स्वतः कारण की जर आपण शिक्षण घेतो, स्वतःच्या पायावर उभे राहतो तर आपल्यावर अन्याय होत आहे ही गोष्ट समजताच वैष्णवीने स्वतःसाठी खंबीरपणे उभं राहायला हवं होतं. आई-वडिलांकडे पैसे न मागता सासरच्या मंडळींना नकार देऊन आई-वडिलांना जसे लग्न करून द्या म्हणून समजूत घालून तयार केले त्याचप्रमाणे माझा निर्णय चुकला म्हणून माफी मागत आई-वडिलांची मदत घेत नवरा आणि सासरच्या मंडळींना मोठ्या जावेप्रमाणे धडा शिकवायला हवा होता.


आज सुद्धा एकविसाव्या शतकात जिथे मुली काहीही करू शकतात हे सिद्ध झाले असताना मुलींना हुंडाबळीमुळे जीव गमवावा लागत आहे हे मन मानायला तयार नाही. या हुंड्यामुळे आणि घरगुती हिंसाचाराने कित्येक मुलींचे आणि त्यांच्या आई-बाबांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. अशा वातावरणामुळे मुलींच्या मानसिक स्वास्थ्यावर तसेच शारीरिक स्वास्थ्यावर देखील परिणाम होतो. शिवाय मुलींच्या घरच्यांना देखील त्रास सहन करावा लागतो. मुलींना शिक्षण देताना स्वरक्षणाचे धडे देखील समाविष्ट केले पाहिजेत. तिची मानसिकता सक्षम करून तिला स्वतःच्या पायावर उभे राहणे, लघु उद्योग करून घरच्या घरी कमाई करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याची मानसिकता विकसित करणे फार आवश्यक आहे म्हणजे अशा वैष्णवी बनणार नाहीत. आजच्या एकविसाव्या शतकात मुली किंवा स्त्रिया या स्वतंत्र विचारांच्या जरी असल्या तरी त्यांनी अति भावनाशील न राहता थोडा प्रॅक्टिकल विचार करत वागण्याचे धडे त्यांना घरातून दिले पाहिजेत.


लग्नापूर्वी मुलींनी स्वतः स्वतःच्या मेहनतीने आणि स्वतःच्या पैशाने कमीतकमी चाळीमध्ये एक रूम किचन घर घेऊन मग लग्न करा म्हणजे लग्नानंतर जर दुर्दैवाने अशी स्थिती उद्भवली तर सासरी किंवा माहेरी अवलंबून न राहता त्या त्यांच्या साध्या पण स्वतःच्या हक्काच्या घरात राहू शकतात. वैष्णवीच्या घटनेने हे दाखवून दिले की आई-वडिलांनी धुमधडाक्यात लग्न लावून पैसे वाया घालवण्यापेक्षा मुलीच्या नावाने बँकेत फिक्स डिपॉझिट करा जी तिला वेळ प्रसंगी उपयोगात येईल.


स्त्रिया या सर्व कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून नोकरी करतात त्यामुळे त्यांना ओझे न समजता घरच्यांनी सुद्धा पाठिंबा देत त्यांना समजून घेऊन त्यांची मदत केली पाहिजे तरच असे हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचार बंद होतील.


[email protected]

Comments
Add Comment