चिनाब रेल्वे पूल, विकासाचे नवे पर्व

  51

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरला आता थेट रेल्वेने जाता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरमधील लाखो रहिवाशांचे स्वप्न पूर्ण केले. चिनाब नदीवर जगातील सर्वात इंच रेल्वे पूल उभारला आहे, त्याचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले आणि भारतातील पहिला केबल स्टेड ब्रीज असलेल्या अंजी पुलाचेही त्यांनी उद्घाटन केले. जम्मू आणि पीर पंजलमधील उंच टेकड्या ओलांडल्यानतंर रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर ३५९ मीटर उंच आणि १३१५ मीटर लांबीचा रेल्वे पूल उभारण्यात आला आहे. चिनाब रेल्वे पुलाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग, नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या उपस्थितीत काश्मीरला तब्बल ४४ हजार कोटींच्या विकास प्रकल्पांची भेट दिली. गेली अनेक वर्षे काश्मीर खोरे दहशतवादाच्या विळख्यात आहे.


गेल्या अकरा वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आल्यापासून दहशतवादाविरोधात सरकारने कठोर पावले उचलली. दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी पोलिसांना, सुरक्षा दलाला आणि निमलष्करी दलाला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. पुलवामा, उरी, पहलगाम अशा काही ठिकाणी दहशतवाद्यांनी हिंसाचार घडवला, रक्तपात केला पण भारताच्या सुरक्षा दलाने तेवढ्याच सडेतोडपणे त्याचा समाचार घेतला. पहलगाम हत्याकांडानंतर भारताने पाकिस्तानवर हवाई व क्षेपणास्त्रांचे हल्ले करून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. शंभर दहशतवादी यमसदनाला पाठवले. पाकिस्तानधील प्रमुख हवाई तळांचे प्रचंड नुकसान झाले. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता नांदली पाहिजे आणि काश्मिरी जनतेच्या उन्नतीसाठी विकासाच्या योजना राबवल्या पाहिजेत अशा दोन्ही आघाड्यांवर मोदी सरकार गेली अकरा वर्षे काम करीत आहे. चिनाब नदीवर उभारलेल्या रेल्वे पुलामुळे काश्मीरचा कायापालट होईल असा विश्वास पंतप्रधानांनी काश्मिरी जनतेला दिला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला उपस्थित होते. काश्मीर खोरे हे रेल्वेने देशाशी जोडले जावे अशी त्यांची मनापासून इच्छा होती, एवढेच नव्हे तर त्यांच्या लहापणापासून म्हणजेच ते सातवी-आठवीत असल्यापासून काश्मीर खोऱ्यात रेल्वे धावली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओमर अब्दुल्ला यांचे बालपणीपासूनचे स्वप्न उद्घाटनाच्या कार्यक्रमात जाहीरपणे बोलून दाखवले.


कटरा ते श्रीनगर या मार्गावर आता वंदे भारत ट्रेन धावू लागली आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला हे रेल्वेमार्गाचे स्वप्न तर पूर्ण होणारच आहे पण श्रीनगरवरून थेट नवी दिल्लीला येत्या ऑगस्ट-सप्टेंबरपासून थेट रेल्वे धावू लागेल. काश्मीर खोरे हे देशाच्या राजधानीशी रेल्वेने थेट जोडले जाणार आहे, त्याचबरोबर देशातील सर्व महत्त्वाच्या शहरांशी काश्मीर खोरे रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे ही भारताची प्रथमपासून भूमिका आहे. काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच मोदी सरकारने घटनेतील ३७० व्या कलमाचे सुरक्षा कवच काढून घेतले. मोदी सरकारच्या या निर्णयाला काश्मीरमधील व देशातील कट्टरतावादी संघटनांनी व नेत्यांनी जरूर विरोध केला पण गेल्या अकरा वर्षांत काश्मीरमध्ये मोदी सरकारने विकास प्रकल्पांचा जो धडाका लावला आहे, त्यात चिनाब नदीवर उभारलेला जगातील सर्वात उंच पूल हा शिरपेचातील तुरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हातात तिरंगा फडकवत चिनाब रेल्वेच्या पुलावरून चालत गेले तो क्षण देशाला अभिमान वाटणारा होता. आम्ही सारे एक आहोत ही भावना दृढ निर्माण करणारा होता.


काश्मीरमध्ये धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला तेव्हाही ते दृश्य टीव्हीच्या पडद्यावर बघणाऱ्या कोट्यवधी लोकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. फ्रान्समधील आयफेल टॉवर बघायला जगभरातून पर्यटक जात असतात, दुबईतील बुर्ज खलिफा बघायला रोज हजारो लोकांची गर्दी असते तसेच काश्मीरमधील चिनाब रेल्वे पुलावरून रेल्वे प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी देशातूनच नव्हे तर जगभरातून लाखो पर्यटक येतील व काश्मीरचे खोरे पुन्हा पर्यटकांच्या गर्दीने फुलून जाईल. कटरा ते श्रीनगर या रस्ते प्रवासाला साधारणत: दहा तास लागतात. आता रेल्वेने केवळ तीन तासांत श्रीनगरला पोहोचता येईल. वाटेत केवळ बनिहाल येथे वंदे भारत थांबणार आहे. नंतर मागणीनुसार अन्य थांबे ठरविण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरात भारतीय पर्यटकांची संख्या काश्मीर खोऱ्यात लक्षणीय वाढली होती. पहलगाम येथे झालेल्या हत्याकांडानंतर पर्यटकांच्या संख्येला एकदम ब्रेक लागला. आता पुन्हा काश्मीरकडे पर्यटक येऊ लागतील व भारताचे नंदनवन पुन्हा पर्यटकांनी बहरून जाईल. काश्मीरच्या निसर्गरम्य परिसरात चित्रपटांचे चित्रीकरण पुन्हा सुरू होईल आणि मैदानेही खेळाडूंनी गजबजलेली दिसतील. वेगवेगळ्या फुला-फळांनी बहरलेले बगीचे पर्यटकांना आकर्षित करतील. श्रीनगरपर्यंत थेट रेल्वे सुरू झाली आहेच पण वंदे भारत ट्रेनचा प्रवास हे आणखी आकर्षण आहे.


काश्मीर खोऱ्यात सध्या सर्वत्र इदचे वातावरण आहे. शिवाय अमरनाथ यात्रेचे वेध हिंदू भाविकांना लागले आहेत. नव्या रेल्वे मार्गामुळे श्रीनगरकडे जाताना कोणतीही अडचण राहिलेली नाही. बर्फ वृष्टी झाल्यावर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग अनेकदा बंद होतो. कधी कधी आठ ते पंधरा दिवस रस्ते वाहतून ठप्प राहते. आता ट्रेनमुळे प्रवासी, पर्यटक, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक यांना श्रीनगर गाठणे सोपे झाले आहे. ट्रेनचे तिकीटही वाजवी आहे. सफरचंद, चेरीसारखी फळे रेल्वेने दिल्ली व अन्य शहरांकडे पाठवणे आता सोयीचे झाले आहे. रेल्वे मार्गामुळे व्यापार व निर्यात यात विलक्षण वाढ होऊ शकते व त्यातूनच काश्मीरची समृद्धीकडे वाटचाल होऊ शकते.

Comments
Add Comment

विजयाच्या जल्लोषावर बंगळूरूमध्ये शोककळा

आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (आरसीबी)च्या विजयाचा जल्लोष साजरा करत असतानाच बंगळूरुमध्ये एक अत्यंत

आयपीएल विजयाची ‘विराट’ स्वप्नपूर्ती

मातब्बल १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएल चषकावर आपले नाव कोरण्याचा मान रॉयल चॅलेजर्स बंगळूरु संघाला मिळाला

लाडकी बहीण योजनेतील गैरफायदा चिंताजनक

राज्य सरकार जनतेच्या भल्यासाठी अनेक योजना आणते. तळागाळातील लोकांना त्यांचा फायदा व्हावा हा त्यामागील हेतू असतो.

बालगुन्हेगारी: मानसिक स्थिती आणि विकृती...

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल लहान मुले आणि तरुण पिढीमध्ये गुन्हेगारीची वाढती प्रवृत्ती, अवैध

बांगलादेशात हसीना यांची चोहोबाजूंनी कोंडी

आपला शेजारी बांगलादेशच्या निर्मितीत भारताचा महत्त्वाची भूमिका राहिली असून भारताने पाकच्या हडेलहप्पीविरोधात

पंतप्रधानांचा इशारा अन् पाकिस्तानचा थरकाप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकमाता अहिल्यादेवी होळकर महिला स्त्रीसशक्तीकरण महासंमेलनात भोपाळ येथे