Sunday, June 8, 2025

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन

ठाणे : ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि व्याख्याते दाजी पणशीकर यांचे शुक्रवार, ६ जून रोजी संध्याकाळी ठाण्यातील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कन्या, मुलगा, सून व जावई असा परिवार आहे. रामायण व महाभारत यांचे गाढे अभ्यासक आणि संतवाङ्मयाचे व्यासंगी असलेल्या पणशीकरांनी गेली पाच दशके समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या पार्थिवावर शनिवार, ७ जून रोजी सकाळी ९.३० वाजता ठाणे पश्चिम येथील जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या आजोबा वासुदेवशास्त्री पणशीकर यांच्याकडून मिळालेला हिंदू धर्मग्रंथांचा आणि परंपरांचा वारसा त्यांनी अभ्यासपूर्वक पुढे नेला.



देश-विदेशात त्यांनी सुमारे अडीच हजार व्याख्याने दिली होती. 'सोबत', 'मराठा', 'महाराष्ट्र टाइम्स' यांसारख्या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लेखन केले, तर ‘सामना’ या दैनिकात सलग १६ वर्षे लेखमाला लिहिल्या. त्यांच्या लिखाणाचा आणि विचारांचा ठेवा महाराष्ट्रासाठी मोलाचा आहे. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये महाभारत : एक सुडाचा प्रवास, कर्ण खरा कोण होता?, कथामृतम, कणिकनीती, स्तोत्रगंगा (२ भाग), अपरिचित रामायण (५ भाग), तसेच गानसरस्वती किशोरी आमोणकर – आदिशक्तीचा धन्योद्गार यांचा समावेश आहे. त्यांच्या ३० हून अधिक पुस्तकांच्या आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. विषयांचा गाढा व्यासंग, सखोल चिंतन, स्पष्ट मांडणी आणि परखड विश्लेषण ही त्यांच्या लेखनशैलीची वैशिष्ट्ये होती. गेल्या पन्नास वर्षांचा सांस्कृतिक इतिहास आणि विचारप्रवाह समजून सांगणारे एक प्रभावी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment