
डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा
रायगडावर शिवरायांना शिवप्रेंमीची मानवंदना
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, असं म्हटलं की एकच नाव ओठांवर येतं, अभिमानाने मूठ हृदयावर ठेवली जाते ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. याच रयतेच्या राजाचा शिवरायांचा रायगडावर ६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज झाले. रायगडावर हा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा होतो. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा हा लोकोत्सव, शिवरायांचा पराक्रम आणि दृष्टिकोन यांना उजाळा देतो.
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने आज आपण त्यांच्या वेगळ्या पैलूचा विचार करणार आहोत. तो म्हणजे शिवरायांचा समुद्री पराक्रम आणि मराठा आरमाराची अजेय गाथा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे रयतेचा राजा, स्वराज्याचा पाया! भविष्यात शत्रू समुद्रीमार्गे हल्ला करतील याची जाणीव असणाऱ्या आणि दूरदृष्टी असणार्या शिवरायांनी अरबी समुद्रात आरमार उभारलं आणि मराठ्यांचा झेंडा फडकावला.

भारताच्या AMCA समोर आव्हान कुणाचं? F-47, Su-57 की J-35A?
मुंबई : युद्धात आधुनिक लढाऊ विमानं ही कोणत्याही देशाच्या सैन्याचं प्रतीक मानलं जातं. अमेरिकेचे F-47, रशियाचे Su-57 आणि चीनचं J-35A हे पाचव्या आणि सहाव्या पिढीची ...
१७व्या शतकात, जेव्हा मुघलांनी आरमार उभारणीकडे दुर्लक्ष केलं, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रावर स्वराज्याचा झेंडा रोवला. १६५४ मध्ये कल्याणजवळील खाडीत पहिलं मराठा जहाज बांधलं आणि आरमाराचा पाया घातला. शिवरायांनी कोकण किनारपट्टीवर गड - किल्ले उभारून सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रजांपुढे मोठं आव्हान निर्माण केलं. १६७९ मध्ये खांदेरी बेट ताब्यात घेऊन शिवरायांनी इंग्रज आणि सिद्दींना चांगलाच धडा शिकवला. शिवरायांचा पराक्रम पाहून पोर्तुगीजांनीही करार केला.
संभाजी महाराजांनी शिवरायांचा आरमाराचा वारसा पुढे नेला! १६८० ते १६८९ या काळात मायनाक भांडारी, दौलत खान आणि दार्या सरंग यांनी मोठे पराक्रम गाजवले. शिवरायांच्या आरमारात महत्त्वाचं स्थान आहे ते कान्होजी आंग्रे यांचं. कान्होजी हेच आंग्रे घराण्यातील सर्वात कर्तबगार पुरुष आणि आंग्रे घराण्याचे खरे संस्थापक होते. आपलं अखंड आयुष्य त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढण्यात घालवलं. त्यांनी १६९८ ते १७२९ दरम्यान मराठा आरमाराला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं. शिवरायांच्या दृष्टिकोनातून उभारलेल्या आरमारामुळे मराठ्यांनी समुद्रावर वर्चस्व राखलं. एकूण शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा हा त्यांचा पराक्रम, शौर्य, युद्धनीती आणि रयतेचा राजा याची साक्ष देणारा ठरतो. महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान रक्तारक्तात सळसळतो.